Showing posts with label पेशवे. Show all posts
Showing posts with label पेशवे. Show all posts

Thursday, 16 August 2018

पुणे 1790-95




(ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत असलेले एक ब्रिटिश अधिकारी सर जेम्स डग्लस (1826-1904)  यांनी मुंबई,  जवळपासची स्थळे आणि तत्कालीन परिस्थिती याबाबत अनेक लेख लिहिले होते. या लेखांचे संकलन करून त्यांनी  आपली पुस्तकेही नंतर प्रसिद्ध केली होती. या लेखांमधील त्यांचा सर चार्लस मॅलेट यांच्याबद्दलचा लेख चाळत असताना मला त्यात 1792 मधल्या पुण्याचे हे वर्णन सापडले. संपूर्ण लेखाचा अनुवाद करण्यापेक्षा पुण्याचे वर्णन जास्त रोचक ठरेल या कल्पनेने तेव्हड्याच भागाचा अनुवाद मी केला आहे.. वाचकांना हा अनुवाद आवडेल अशी अपेक्षा आहे.)

1790-95 हा कालखंड पुण्यासाठी मोठा खळबळजनक होता असे म्हटले तरी चालेल.  1791 मध्ये घाशीराम कोतवालावर झालेल्या दगडफेकीत तो ठेचला गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता. 1794 मध्ये महादजी शिंदे यांचे वानवडी येथे तापाने निधन झाले होते आणि 1795 मध्ये स्वतः श्रीमंत पेशवे यांचा शनिवारवाड्याच्या गच्चीवरून खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनांचे मधल्या तीन वर्षाच्या कालखंडाच्या पूर्व आणि पश्चात आलेली अकस्मात वादळे असे करणे योग्य ठरेल कारण मधला हा तीन वर्षांचा कालखंड पुण्यासाठी एक ऐतिहासिक आनंदपर्व होते असे म्हणणे फारसे चूक ठरणार नाही. हा आनंददायी कालखंड सुरू झाला होता जून 1792 मध्ये झालेल्या महादजी शिंदे यांच्या आगमनाबरोबर आणि संपला होता  फेब्रुवारी 1794 मध्ये झालेल्या त्यांच्या निधनाबरोबर!  

चर्तुदिशांहून आलेल्या अनोळखी लोकांच्या जमावांनी पुणे त्यावेळी गजबजलेले दिसत होते. या लोकांनी आपल्या थैल्या जरा जास्तच सैल सोडल्याने का होईना! बाजारांच्यात मोठे उत्सवी वातावरण होते. त्या वेळी दिल्लीमधील मुघल सम्राट हे पेशव्यांच्या हातातील एक बाहुले बनलेले होते. या मुघल सम्राटाच्या साम्राज्याचे सुभेदार म्हणून पेशव्यांना वस्त्रे प्रदान करण्याच्या समारंभासाठी महादजी शिंदे मुद्दाम पुण्याला आले होते. या समारंभाच्या दिवशी (हा समारंभ 11 जून 1792 मध्ये  झाला होता.) लोकांचा उत्साह पराकोटीला पोचला होता आणि संपूर्ण शहरच हर्षमय झाले होते. जूनचा महिना असल्याने दख्खःनच्या पठारांवर निसर्गाने आपला हिरवा गालिचा उलगडला होता व पक्षांचा चिवचिवाट सर्वत्र ऐकू येत होता. महादजी शिंद्याची राहुटी जरी संगमाजवळ उभी केलेली असली तरी पार खडकीपर्यंत त्यांच्या फौजेचे तंबू  सर्व उंच सखल प्रदेशामध्ये उभे राहिलेले दिसत होते. या भागात दिसणार्‍या सर्व झाडाझुडपांच्या सावलीला एकत्र बसून शिंद्याच्या फौजेतील जवान सुट्टी असल्याने मौजमजा करताना दिसत होते.

येणार्‍या प्रत्येक रात्री, शनिवार वाड्यातील गणेश हॉल दिव्यांच्या झगझगाटामुळे लखलखत होता. शेकडो नर्तकींचे नाच तिथे चालू असत. गणेश हॉलच्या एका बाजूला असलेले कारंजे व त्याच्या शेजारचे वाहते पाणी यांच्या आवाजाच्या साथीवर गाण्याचे कार्यक्रम होत होते. (आम्हाला हे गायन जरी एकसुरी आणि कंटाळवाणे वाटत असले तरी पौर्वात्य लोकांना ते स्वर्गसुखासमान वाटते यात शंकाच नाही.) हिराबागेचा वाडा त्याच्या वैभवात तळपत होता तर ताराबाग (Helen’s Isle, परीचे बेट) त्याच्या भोवती असलेल्या तळ्यामधे एखाद्या भिंगावर असलेल्या धुळीच्या कणाप्रमाणे दिसत होता. रस्त्याने नेले जाणारे हत्ती, वाघोबा या नावाने ओळखल्या जाणार्‍या दगडी वाघांना आमिष वाटत आहेत की काय? असे भासत होते. मुळा मुठा नद्यांवर अनेक लोक नौकांमध्ये सफर करून मौजमजा करत होते. रात्री याच नौका त्यांच्यावर केलेल्या आकाशकंदिलांच्या रोषणाईने नुसत्या झगमगत होत्या.

वस्त्रे प्रदान करण्याच्या समारंभाच्या दिवशी महादजी शिंद्यांच्या राहुटीपासून थोड्या अंतरावर उभारलेल्या  राहुट्यांच्या टोकाला एक सिंहासन किंवा तख्त उभारलेले होते.  हे सिंहासन म्हणजे दिल्लीच्या तख्ताची प्रतिकृती होती. अर्थात  हा आनंदोत्सव साजरा करणारे पेशवे आणि दिल्ली दरबार या दोन्हींना कल्पनाही नव्हती की थोड्याच काळात ही दोन्ही साम्राज्ये धुळीस मिळणार होती.
समरंभाच्या दिवशी पेशवे मिरवणुकीने येथपर्यंत आले होते व नंतर रिकाम्या तख्तापर्यंत पायी चालत आले होते. तीन वेळा तख्ताला कुर्निसात केल्यानंतर त्यांनी सिंहासनासमोर 101 सुवर्ण मोहोरा भरलेली थैली नझर म्हणून ठेवली होती. मुघल बादशहाच्या इराणी वझिराने मग पेशव्यांना खिलत (राजाचा अंगरखा),  रत्नजडित शिरपेच, तुरा, ढाल-तलवार, दोन मोरपिसे आणि “दोन चंद्रकोरी, दोन तारे, सूर्य आणि मासा यांची चित्रे असलेला” ध्वज हे सगळे प्रदान केले होते. हे सगळे घेऊन पेशवे जवळच्या राहुटीत गेले होते व थोड्याच वेळात बादशहाने पाठवलेले हे सर्व वस्त्रालंकार परिधान करून बाहेर आले होते. एका पालखीत बसलेले महादजी शिंदे आणि पेशव्यांचे इतर सर्व सरदार पेशव्यांचे, एकनिष्ठ सेवक असल्याचे दर्शवित त्यांच्या समोर एखद्या पंख्याप्रमाणे पसरलेले होते. नंतर तेथे जमलेल्या सर्व लोकांनी केलेल्या जयजयकाराच्या आवाजात, तोफांच्या गडगडाटात अणि तुतार्‍यांच्या ललकारींत, सातार्‍याच्या भोसल्यांनी पेशवे म्हणून घोषित केलेल्या, आणि स्वतःला तैमुरचे वंशज म्हणवणार्‍या मुघल बादशहाने सुभेदारकी दिलेल्या, या राजाने मराठी साम्राज्याची राजधानी असलेल्या व शिवाजीने स्थापना केलेल्या पुणे शहरात प्रवेश केला होता. ब्रिटिश रेसिडेन्सी शिंद्यांच्या तळाच्या अगदी जवळच असल्याने तेथे असलेल्या सर्व लोकांना या संपूर्ण उत्सवात भाग घेण्यासाठी आमंत्रण होते. नद्यांचा कोणताही संगम खरे म्हणजे एक  पवित्र जागा समजली जाते. परंतु ब्रिटिश रेसिडेन्सी ज्या ठिकाणी होती तो मुळा-मुठांचा संगम ही किती रम्य आणि सुंदर जागा आहे याची आज सुद्धा उत्तम कल्पना येऊ शकते.

1792 मधे असलेले पुणे कसे होते याची कल्पना आजमितीला करणे अतिशय सोपे आहे. परंतु यासाठी तुम्हाला काल्पनिक विध्वंसाचा मार्ग अनुसरणे आवश्यक आहे. प्रथम सर्व चर्चेस आणि कबरस्ताने तुमच्या नकाशातून काढून टाका. सर्व सैनिक छावण्या आणि इस्पितळे यांचीही वासलात लावा. त्याचप्रमाणे रेल्वे रूळ, तारेचे संदेशवाहक खांब, सुस्थितीतील रस्ते आणि पूल यांचीही तीच गत करा. 1792 मध्ये अर्थवट कुजलेला आणि धोकादायक असा एकच लाकडी पूल होता. तुमच्या मनातून असेम्ब्ली, कौन्सिल हॉल, गव्हर्नर आणि त्याच्याबरोबर बसणारे इतर सर्व अधिकारी काढून टाकून त्यांच्या जागी पेशव्यांहून सुद्धा जास्त सर्वशक्तीमान असलेले नाना फडणवीस यांची स्थापना करा. सर्व शाळा, कॉलेजे काढून टाका. ख्रिस्ती धार्मिक शिकवण देणारे पाद्री आणि इतर यांना वार्‍यावर उडवून द्या. पत्रकारांना फुंकर मारून उडवा. कोणालाही स्वत:चे असे म्हणता येईल असे काही देऊ नका व एखाद्याने कष्ट करून जमवलेले धन त्याच्याकडून काढून घ्या, कारण पेशव्यांच्या काळात हीच रीत बनली होती. संगमावरची रेसिडेन्सी सोडली तर उरलेला बाकी प्रत्येक इंग्लिश बंगला नष्ट करा. हे सगळे केल्यावर तुमच्या मनात दीड चौरस मैल (अंदाजे चार चौरस किमी) आकारमानाची एक जागा राहील. 

1792 मधल्या पुण्याचे चित्र पूर्ण करण्यासाठी या जागेत सध्याच्या बाजारपेठा, त्यातली उत्कृष्ट कारागिरीची घरे, बड्या आणि धनवान व्यापार्‍यांच्या टोलेजंग हवेल्या हे सर्व बसवा. संगमाजवळची सर्व मंदिरे, तेंव्हाची बांधकाम झालेली पर्वतीची टेकडी ही सुद्धा या चित्रासाठी निवडा. हे सगळे झाल्यावर त्या चित्रात सतत खरेदी विक्री करणारी, ओरडणारी आणि किंचाळणारी एक लाख वीस हजार ही लोकसंख्या बसवा म्हणजे तुमचे पुण्याचे चित्र पूर्ण होईल. एडवर्ड मूर आपल्या “सर्व देव सभा” (Hindu Pantheon) या पुस्तकात पुण्याचे वर्णन करताना म्हणतो. “पुणे शहर शोभिवंत किंवा देखणे दिसेल असे बांधलेलेच नाही.” पुण्याच्या आसमंताबद्दल बोलायचे तर तो आता जसा आहे तसाच तेंव्हाही होता. लकडी पुलावरून दिसणारा देखावा आतासारखाच तेंव्हाही भव्य दिसत होता. आतासारखेच पांढर्‍या ठिपक्यांसारख्या ढगांनी व्यापलेले निळेभोर आकाश तेंव्हाही दिसत होते. त्या पार्श्वभूमीवर दिसणारा पर्वतीचा डोंगर आतासारखाच तेंव्हाही कपाळावर एक हलकी आठी उमटवत होता. सिंगगडाला न ओळखणारा  पुण्यात कोण असणार?  तो आणि त्याच्या पलीकडचा निळ्या सुळक्यासारखा दिसणारा तोरणा हे तेंव्हाही दिसत होते. तोरणा शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला असल्याने त्यांचा आत्मा त्याच्या शिखरावर नक्कीच रेंगाळत असणार. गणेशखिंडीच्या बाजूला एकुलते एक असणारे देऊळ आतासारखे तेंव्हाही दिसत होते. भारतीय वास्तुकलेचे वैशिष्ट्य दर्शविणारे व दिल्ली ते कन्याकुमारी यामध्ये दिसणार्‍या प्रत्येक देवळाप्रमाणे असलेले हे देऊळ सुद्धा फुलात कधीच रुपांतर न होणार्‍या कळीप्रमाणेच तेंव्हाही दिसत होते. थोडीफार सुरूची झाडे वगळली तर पुण्याचा  सर्वच आसमंत  तेंव्हा जरासा उघडा बोडका व वृक्षहीन दिसत होता. आता दिसणारी लाखो आंब्याची झाडे तेंव्हा बाजीरावाने (दुसर्‍या) लावलेली नव्हती. 1792 मधले पुणे हे असे होते.  


16 ऑगस्ट 2018


Friday, 8 June 2018

माथेरान- भाग 1




(ईस्ट इंडिया कंपनीच्या व नंतर राणीच्या  सेवेत असलेले एक ब्रिटिश अधिकारी सर जेम्स डग्लस (1826-1904)  यांनी मुंबई,  जवळपासची स्थळे आणि तत्कालीन परिस्थिती याबाबत अनेक लेख लिहिले होते. या लेखांचे संकलन करून त्यांना आपली पुस्तकेही नंतर प्रसिद्ध केली होती. या लेखांमधील त्यांचा माथेरान बद्दलचा 1890 मधे लिहिलेला लेख मला मोठा वाचनीय वाटला त्या काळचे माथेरान मुंबईच्या गोर्‍या साहेबांना कसे दिसत होते याची एक झलक आपल्याला या लेखात दिसते. वाचकांना या लेखाचा हा अनुवाद आवडेल अशी अपेक्षा आहे.)


ऑक्टोबर महिन्याच्या एखाद्या संध्याकाळी, तिन्हीसांजा झाल्या असताना, माथेरानचा डोंगर चढून घनदाट वृक्षराईमधे दडलेल्या आणि एकमेकात गुंफलेल्या अरूंद गल्यांच्या चक्रव्यूहामधे असलेले आपले घर शोधण्याची तुमच्यावर कधी वेळ आलीच तर अशा वेळी, तुमच्या मनाची काही तयारी आधी झालेली नसली तर अचानकपणे नजरेसमोर येणारे माथेरानचे प्रथम दर्शन मोठे आश्चर्यजनक किंवा विस्मयकारी वाटते. माथेरानच्या डोंगराची खडी चढण चढल्याने शरीराला आलेला थकवा, सदसद्विवेकबुद्धीनुसार  वागणार्‍या एखाद्या माणसासारखी  इतकी गाढ निद्रा तुम्हाला देतो की सकाळी स्वतःच्या हाताचे बोट स्पष्ट दिसू शकेल एवढा उजेड तरी बाहेर होईपर्यंत जाग येण्याची शक्यताच नसते. जागृतावस्था आल्यावर अशा वेळी जर तुम्ही बाहेर डोकावलात तर आपण एका नव्याच आकाशाकडे आणि पृथ्वीकडे बघतो आहोत असे वाटत राहते. येथे येणारे लोक हे समोर दिसणारे दृष्य बघून ते एखाद्या कलाकाराने चित्रित केलेल्या चित्रासारखे दिसते आहे असे म्हणतात व ते खरेही आहे. एखादा कवी यावर म्हणेल की निसर्गासारखे चित्रण कोण मर्त्य मानव करू शकणार आहे? तर धर्मपंडित या समोर दिसणार्‍या  चित्राचे सर्व श्रेय परमेश्वराला देत त्याची आळवणी करतील की तुझी लीला अगाध आहे. तू निर्माण केलेले हे पृथ्वीचे वैभव अफाट आहे.  परंतु दुर्दैवाने माथेरान काही वेळा सर्वश्रेष्ठ भासत असले तरी बर्‍याच वेळा अगदी क्षुल्लक दिसते आणि वर उल्लेखिलेल्या आणि एखादी दैवी देणगी भासणार्‍या दृष्यासारखी दृष्ये तुरळक आणि अभावानेच आढळतात. उजाडणार्‍या  पहाटेस किंवा धुक्याची चादर लपेटलेल्या कातरवेळी, अस्पष्ट, अव्यक्त आणि विशाल भासणारा माथेरानचा आसमंत, चित्रकाराने समर्थपणे आपल्या चित्रात प्रकाश आणि सावल्या यांचा खेळ रंगवावा तसा काहिसा वाटत राहतो. दूर क्षितिजावर अंधूक दिसणार्‍या  टेकड्या, तुम्हाला आल्प्स पर्वतराजींची आठवण करून देतात तर समोरचा अस्पष्ट काळसर रिकामेपणा तुम्हाला मिल्टनच्या काव्यातील वृक्षराईची आठवण करून देतो. नजरेसमोर पसरलेले धुके समोर दिसणारी दरीखोरी अमर्याद्पणे विस्तारलेली आहेत की काय? असा भास निर्माण करतात. परंतु हे सगळे टिकते ते सूर्य वर येईपर्यंत! एकदा का त्याच्या रथाचे घोडे आकाशात वेगाने धावू लागले आणि तो माथ्यावरून आपले डोळे दिपवून टाकणारा प्रखर प्रकाश आकाशात आणि झाडांच्या शेंड्यांवर ओतू लागला की संपूर्ण परिसरच पिवळ्याधम्मक रंगात रंगवलेलला दिसू लागतो. समोरचे जगच मग बदलते. थोड्या वेळापूर्वी समोर दिसणारे व धुक्यात लपेटलेले, कोकणातले कोणा नदीचे खोरे, नदीचा चंदेरी प्रवाह आणि बाजूंना उभे असलेले रमणीय डोंगर हे सगळे अदृष्य होतात व समोर दिसू लागतो एक विस्तीर्ण उठावाचा नकाशा, किंवा मानवाच्या करमणूकीसाठी बनवलेले एक मोठे खेळणे! या आधी एखाद्या चर्चच्या मनोर्‍याप्रमाणे भासणार्‍या,  आसमंतात विखुरलेल्या आणि एकमेकावर रचल्या गेलेल्या पाषाण शिला, आणि या शिलांच्या दोन्ही बाजूंनी उतरत गेलेल्या पर्वतराजी, आता कागदी पुठ्यावर वेडेवाकडे कातरकाम करून निर्माण केल्यासारख्या विचित्र आकाराच्या वाटू लागतात.

समोरचा लांबी, रुंदी आणि खोली असलेला देखावा आता जरा हात लांब केल्यावर त्याला स्पर्श करता येईल इतका जवळ आहे असे वाटू लागते. सर्व  प्रकारचे आवाज (वाळलेया पानांच्यातून पळत जाणार्‍या सरड्याचा आवाज सुद्धा!, कोणतीही हालचाल, यासारख्या सजीवतेच्या खाणाखुणा एकदम नाहीशाच होतात.. रोजच्या मानवी व्यवहारांचे स्मरण करून देणारा दूरवर दिसणारा मुंबईतला घड्याळाचा मनोरा, अति उष्णतेने क्षितिजे झगमगत राहिल्याने दिसेनासाच होतो. आतापर्यंत तुम्हाला एवढी गौरवनीय भासणारी पर्वतराजी एखाद्या सांगाड्याचे रूप धारण करते. या सांगाड्याच्या फासळ्या आणि हाडे तुमच्यासमोरच्या सपाट जागेवर पसरली आहेत असे भासू लागते. आतापर्यंत नयनमनोहर आणि सुंदर भासणारे तुमचे नवे आकाश आणि पृथ्वी, याचे रूपांतर एखाद्या ज्वालामुखीतून आसमंतात पसरलेल्या धुळीत किंवा राखेत झालेले तुमच्या नजरेसमोर क्षणार्धात येते.

माथेरानला दिसणारे  निसर्गसौंदर्य ही बहुधा फक्त आधुनिक जगाची मालमत्ता असली पाहिजे कारण आधुनिक जगतातील लोकच फक्त माथेरानचे कोडकौतुक करताना दिसतात. या आधी या भागावर स्वामित्व असणार्‍या मुसलमान किंवा मराठ्यांना माथेरानची माहितीच बहुधा नव्हती आणि याबद्दल मला त्यांची कींवच कराविशी वाटते. तुघलक आणि त्याचे सैनिक यांना दख्खन म्हणजे एक अभेद्य तटबंदी असलेला दुर्ग वाटत होता. औरंगजेबाचा इतिहासकार खफि खान, दख्खनचे वर्णन नरकाचे एक उत्तम उदाहरण” या शब्दात मोठ्या नाखुषीने करतो. पण त्या गोष्टीला आता दोन शतके उलटली. एखाद्या वाचकाने, माथेरानची वसाहत फक्त पस्तीस वर्षांपूर्वीचीच आहे हे समजल्यावर असा प्रश्न आता विचारला की कां हो! स्वत:ला एवढे सर्वश्रेष्ठ मानणार्‍या इंग्रजांना, एवढ्या जवळ असलेल्या माथेरानला कां कधी जावेसे वाटले नाही? तर मला त्याचे फारसे आश्चर्य वाटणार नाही. कारण मुंबईला असलेले इंग्रज जरी गेली दोन शतके येथे (मुंबईला) राहून व्यापार करत असले, जेवणावळी उठवत असले आणि लग्नात मुंबई आंदण घेत असले तरी ही सत्य परिस्थिती आहे की गेल्या दोन शतकात, टोपी किंवा टोप घातलेल्या मुंबईच्या कोणत्याही इंग्रजाला, कोणत्याही निरभ्र आकाश असलेल्या दिवशी,  स्वतःच्या घराच्या खिडकीतून बाहेर डोकावल्यावर, समोर दिसणार्‍या माथेरानच्या डोंगरावर कधीच जावेसे वाटले नाही. बहुतेक इंग्रजांना, माथेरानचा डोंगर समोर दिसत असला तरी लंडन, पॅरिस किंवा स्कॉटलंड यापुढे दुसरे काही सुचतच नव्हते. नाही म्हणायला एलफिन्स्टनने मात्र खंडाळ्याच्या कड्याजवळ एक घरकुल बांधले होते. इंग्रज लोक तब्येत सुधारण्यासाठी किंवा हवापालट करण्यासाठी बाणकोटला जात.  1771 मध्ये जॉन मॅकडोनल्ड या एका व्हॅलेने लिहून ठेवले आहे की तब्येत सुधारण्यासाठी मुंबईहून बाणकोटला जाणे हे त्याच उद्देशाने लंडनहून लिस्बनला (पोर्तुगाल) जाण्यासारखे आहे. याच काळात काही इंग्रज नौसेनेचे अधिकारी, तानसा तलावाजवळ असलेल्या वज्रेश्वरीच्या उष्ण पाण्याच्या झर्‍यांजवळ दोन महिने जाऊन राहिले होते. अर्थात त्यांना त्या वेळी कल्पनाच नव्हती की भविष्यात एक दिवस मुंबईची पाण्याची गरज या तलावातूनच भागवली जाणार आहे.

मग इंग्रजांनी मुंबई बंदराजवळची खाडी कां कधीच ओलांडली नाही?. या प्रश्नाचे उत्तर अगदी स्पष्टपणे, खाडीच्या पलीकडचा भाग इंग्रजांच्या ताब्यात नधीच नव्हता, या शब्दात देता येते. कारंजा लाड (वाशी) इंग्रजांच्या ताब्यात 1775 मधेच आले होते. परंतु त्या पलीकडला पेशव्यांच्या ताब्यातील मुलुख इंग्रजांच्या   अंमलाखाली 1817 मधे आला. असे असले तरी मुंबईची खाडी आणि पलीकडचा किनारा हे  आंग्र्यांच्या अंमलाखाली होते आणि ते इंग्रजांच्या ताब्यात 1840 मध्ये आले. त्याच्या आधी आंग्र्यांच्या मुलुखात जाणे म्हणजे एक दिव्यच होते. पनवेलहून पुण्यापर्यंतचा प्रवास करणे त्यामुळेच  सोपे नव्हते. मिस्टर करजेनव्हेन हा एक इंग्रज व्यापारी, परवानगीशिवाय आंग्र्यांच्या मुलुखात शिरल्यामुळे, 10 वर्षे गोराई (साष्टी) येथे नजरकैदेत होता.

माथेरानच्या निसर्गसौंदर्याला दाद देण्यासाठी माथेरानची इत्यंभूत माहिती होणे गरजेचे आहे. पांढर्‍या शेवंतीला फुलांमध्ये जे स्थान अहे तेच स्थान माथेरानला गिरिस्थानांमध्ये आहे.  दख्खनमध्ये असलेल्या सर्व गिरिस्थानांमागे एक काहीतरी कथा असते. माथेरानच्या मागे कसलीही कथा नाही, कसलाही इतिहास नाही. इतिहासाच्या बाबतीत माथेरान संपूर्णतया मुके आणी बहिरे आहे. माथेरानच्या साधेपणाला कोणताही इतिहास परंपरा किंवा मर्दुमकी यांचा स्पर्शही झालेला नाही. त्यामुळेच पश्चिम भारताच्या इतिहासात कोणत्याही ऐतिहासिक घटनेचा संदर्भही नसलेल्या माथेरानला काही स्थानच नाही. माथेरानचा डोंगर दुरून पाहिल्यास सह्याद्री पर्वतराजीमधील अगदी सर्वसामान्य डोंगरांसारखा दिसत असल्याने त्याची मोहिनी कधी कोणावरही पडलेली नाही. हा डोंगर अप्रसिद्धीच्या पदराखाली इतका लपलेला होता की 1850 साली या डोंगराला शोधून काढावे लागले होते. माथेरानच्या डोंगराला कोणताही इतिहासच नसल्याने आनंदाची गोष्ट म्हणजे या डोंगरावर साहजिकपणे कोणतीही तटबंदी नाही. जर मराठे या डोंगरावर कधी आलेच असले तरी त्यांनी पाषाण चिर्‍यांतून बांधलेल्या इमारतींच्या भिंती, टाक्या, तळी, खंदकाच्या भिंती यापैकी काही म्हणजे काही मागे सोडलेले नाही. नाही म्हणायला माथेरानच्या पॅनोरामा पॉइन्टला कधी गेलात तर दरवर्षी अनेक वादळांना तोंड देत असूनही उंच मान वर काढलेला व सागरगडाची (अलिबाग तालुका, रायगड जिल्हा) छोटी प्रतिमा भासणारा समोरचा पाषाण बघितल्यावर, त्याच्या भोवती तटबंदी, खंदक, त्यावरचा पूल आणि पुढे वर-खाली सरकणारा लोखंडी चौकटींचा दरवाजा हे सर्व कधीकाळी असले पाहिजे अशी कल्पना कोणाच्याही मनात येणे सहज शक्य आहे. कल्पनाविश्वात हरवलेल्या अशाच कोणीतरी, कदाचित या पाषाणाचे नामकरण,  “ग़डाची सोंड” म्हणून केलेले असावे. नाहीतर एखाद्या खर्‍याखुर्‍या गडाची आठवण करून देणारे हे नाव पॅनोरामा पॉइन्टच्या पाषाणाला देण्याचे कोणतेही प्रयोजन मला तरी दिसत नाही. निरभ्र आकाश असलेल्या कोणत्याही दिवशी पॅनोरामा पॉइन्टवर उभे राहिले असताना समोर दिसणार्‍या चाळीस एक किलोमीटर्स त्रिज्येच्या परिघात, कर्नाळा, घनगड, विकटगड, मलंगगड आणि ज्यावर टाक्या, बुरुज खंदक या सर्वांचे भग्नावशेष दिसतात आणि ज्याला माथेरानची जुळा भाऊ म्हणता येते तो प्रबल किल्ला (शिवाजी महाराजांच्या अंमलाखाली हा मुलुख येण्याच्या अगोदर कल्याणचा सुभेदार या किल्ल्यावर आपला उन्हाळा घालवत असे.) या सारखे, अगदी अनपेक्षित स्थानांवर उभे असलेले, निदान पन्नास तरी गड सहजपणे दिसू शकतात. असे अनेक गड या परिसरात  विखुरलेले आहेत. मराठ्यांच्या अंमलात यापैकी प्रत्येक गडावर शिबंदी तैनात केलेली असे. या सर्व गडांना एक इतिहास आहे. मात्र माथेरानच्या डोंगरावर तुम्हाला इतिहास असलेली एखादी विहिर, भुताटकी साठी कुप्रसिद्ध  असलेला एखादा वाडा, कोण्या मर्दाने मर्दुमकी गाजविल्यामुळे पावन झालेले किंवा कोण्या क्रूरकर्म्याच्य हिंसेमुळे भ्रष्ट झालेले एखादे स्थान यातले काहीही औषधाला सुद्धा सापडणार नाही, सह्याद्रीच्या कडेकपारींच्या आसपास असलेल्या या परिसराला, खरे तर बौद्ध पंथियांनी पाषाणकड्यांवर खोदलेल्या लेण्यांचे आगर म्हणता येईल इतकी लेणी माथेरानच्या जवळपास (कार्ले, भाजे, कोंडाणे वगैरे) आहेत परंतु माथेरानच्या पाषाणकड्यांवर कोणतेही भव्य खोदलेले लेणे तर सापडत नाहीच पण त्या शिवाय इतर अनेक डोंगरावर दिसतात तशा एखाद्या शिकाऊ शिल्पकाराने  लेणी खोदण्याच्या चुकतमाकत केलेल्या प्रयत्नाच्या खाणाखुणाही कोठे आढळत नाहीत. माझी तर खात्रीच आहे की माथेरानच्या अनाघ्रात जंगलांमध्ये पाषाणावर खोदकामाच्या छिन्न्या चालवण्याचा आवाज कधी घुमलेलाच नाही. हिंदू धर्मिय देखील माथेरानच्या वाटेला बहुधा कधी गेलेच नाहीत. रायगड किंवा इर्शालगड चढत असताना पाषाणात खोदलेल्या आणि त्यावर शेंदूर लेपलेल्या मारुतीच्या प्रतिमा जशा दिसतात तशा माथेरानच्या डोंगरावर कोठेही बघायला मिळत नाहीत.

लुइझा पॉइन्टच्या टोकाला नैसर्गिक रित्या आकार मिळालेला, मानवी डोक्याच्या आकाराचा एक पाषाण दिसतो. विलक्षण गोष्ट म्हणजे या डोक्याच्या आकाराच्या पाषाणाच्या खालच्या बाजूस जो दुसरा पाषाण आहे तो अस्पष्टपणे मानवी खांद्याच्या आकाराचा दिसतो. येथे अशी एक दंतकथा सांगतात की हे मानवी डोके खोदण्याच्या प्रयत्नाची सुरूवात इजिप्तमधून येथे आलेल्या कोण्या शिल्पकाराने केली होती. दुर्दैवाने या परिसरात असलेल्या बौद्ध लेण्यामध्ये इजिप्त मधील  शिल्पकारांनी आपली कला प्रदर्शित केल्याचा काहीच पुरावा कधीही मिळालेला नाही. त्यामुळे या दंतकथेला भाकडकथाच म्हटले पाहिजे. परंतु माझी खात्री आहे की जर इजिप्तमधील स्फिंक्स किंवा मेमनॉनची भव्य मूर्ती साकारणारे शिल्पकार मोठ्या संख्येने माथेरानला आले असते तर इजिप्तमधील या दोन्ही शिल्पांना लाजवणारे किंवा नगण्य ठरवणारे अतिविशाल शिल्प या शिल्पकारांनी लुइझा पॉइटच्या पाषाणातून साकारले असते. 

माथेरानला इतिहास नसला किंवा येथे कोणत्याही पुराणवस्तू सापडत नसल्या तरी दुसरे एक गुणवैशिष्ट्य माथेरानमधे विपुलतेने आढळते व ते दाखवून देण्याचे श्रेय मी डेव्हिड लिव्हिंग्स्टन (1813-1873) या शास्त्रज्ञाला कृतज्ञतापूर्वक देऊ इच्छितो. सन 1865 मध्ये या शास्त्रज्ञाने माथेरानला भेट दिली होती. त्यावेळी त्याला  त्याच्या बरोबर प्रवास करणार्‍या एका मित्राकडून (डी. ओवेन) अशी विचारणा केली गेली होती की पॅनोरामा पॉइन्टवर उभे राहिले असता जो देखावा दिसतो त्याच्यापेक्षा जास्त सुरेख  देखावा त्याने आपल्या प्रवासात कोठे बघितला आहे कां? या प्रश्नाला  लिव्हिंग्स्टनने अगदी सरळपणे आपण याच्यापेक्षा जास्त सुरेख देखावा आपल्या प्रवासांच्यात कधीच न बघितल्याचे कबूल करून टाकले होते. लिव्हिंग्स्टनच्या भेटीनंतर दोन-तीन वर्षांनंतर रिचर्ड फ्रान्सिस बर्टन (1821-1890) या सुप्रसिद्ध लेखकाने सुद्धा माथेरानला भेट दिली होती. या भेटीच्या दरम्यान, पॅनोरामा पॉइन्टवर  असताना, बर्टनला, लिव्हिंग्स्टनने पॅनोरामा पॉइन्टवरून दिसणार्‍या देखाव्याबद्दल काय उद्‌गार काढले होते ते कोणीतरी सांगितले होते. तेंव्हा त्याने काय उत्तर दिले असावे? तो म्हणाला होता की “लिव्हिंग्स्टनने कुठे काय जग बघितले आहे? त्याने फक्त स्कॉटलंड आणि थोडीफार आफ्रिका फक्त बघितली आहे.” आता यावर काय बोलणार?  कोणाला काय आवडेल आणि आवडणार नाही? ते सांगता थोडेच येणार आहे. असे सांगतात की आफ्रिकेतील माल्टा देशाच्या एका  रहिवाशाने इंग्लंडहून आपल्या देशाला परत गेल्यावर असे उद्‌गार काढले होते की “येथे असणार्‍या हिरव्यागार उसाच्या शेतांचा त्याच्या डोळ्यांना फार त्रास होतो आहे.” लंडनधील “दि स्टॅन्डर्ड” या वर्तमानपत्राचा वार्ताहर जे. ए. कॅमरॉन याला माथेरान मध्ये भटकंती करायला खूप आवडत असे व प्रत्येक भेटीनंतर तो गॅझेट मध्ये त्याबद्दल लिहित असे.

क्रमश:

8 जून 2018



Tuesday, 20 January 2015

शनिवारवाड्याची पुनर्बांधणी – एक भ्रामक संकल्पना



 कृष्णा आणि गोदावरी या नद्यांमधील दुआबाच्या प्रदेशाला दख्खन या नावाने सर्वसाधारणपणे ओळखले जाते. या दख्खनमध्ये इस्लामिक सत्ता प्रथम स्थापन झाली ती 1294 मध्ये, जेंव्हा दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दिन खिलजी याने देवगिरीच्या यादव राजांचा पराभव केला तेंव्हा! या नंतर 1347 मध्ये बहामनी राज्याची स्थापना झाली आणि अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली की दख्खनचे इस्लामीकरण आता पूर्णत्वास जाणार. मात्र याच वेळी सांगमा राजघराण्यातील दोन हिंदू राजे, हरिहर आणि बुक्का यांनी तुंगभद्रा नदीच्या किनार्‍यावर 1336 मध्ये एका हिंदू राष्ट्राची स्थापना केली आणि पुढची 200 वर्षे तरी दख्खनच्या इस्लामीकरणाची प्रक्रिया थोपवून धरली. यानंतर 5 दखखनी सलतनतीच्या सुलतानांनी मिळून विजयनगरच्या सैन्याचा पराभव केला आणि या भव्य आणि नेत्रदीपक अशा नगराची अक्षरशः राखरांगोळी केली. या नगरीतील एकापेक्षा एक सरस अशा स्थापत्यांच्या जागी फक्त भग्नावशेष आणि दगडांच्या राशी एवढेच उरले. तरी सुद्धा जे काही उरले आहे ते इतके प्रेक्षणीय आणि भव्य आहे की जगभरातले हजारोंनी पर्यटक हंपीला भेट देण्यासाठी रोज येथे येत असतात. या भग्नावशेषांमध्ये असलेल्या प्रसिद्ध बालकृष्ण मंदिराच्या निकट, 2 छोटी मंदिरे आहेत. यापैकी एक मंदीर आहे क्रोधित नृसिंहाचे! या मंदिराचा काही वर्षांपूर्वी पुरातत्त्व विभागाने जीर्णोद्धार केला होता. जुन्या दगडी स्थापत्याला सिमेंट कॉन्क्रीटची मलमपट्टी लावली होती. परंतु नंतर पुरातत्त्व विभागाच्याच हे लक्षात आले की हा जीर्णोद्धार आपल्याच 80 किंवा 90 वर्षांपासून अंमलात असलेल्या धोरणाविरुद्ध केला गेलेला आहे. यानंतर पुरातत्त्व विभागाने केलेली मलमपट्टी चक्क तोडून टाकली व मंदिराचे भग्नावशेष परत गेली 500 वर्षे होते त्याच स्थितीत पुन्हा आणले.
हे सगळे जरा जास्तच बारकाईने मी लिहिले आहे याचे कारण मला वाचकांच्या लक्षात एक महत्त्वाची बाब आणून द्यायची आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याने 1920 साली प्रसिद्ध केलेल्या प्राचीन अवशेषांच्या निगराणी बद्दलची एक कार्यपुस्तिका प्रसिद्ध केली होती. या पुस्तिकेत हे अगदी स्पष्ट केलेले आहे की प्राचीन भग्नावशेषांचा जीर्णोद्धार करणे पुरातत्त्व विभागाला मान्य नाही व या भग्नावशेषांची (मग ते भग्नावशेष असोत किंवा इतस्ततः पडलेले पाषाण असोत) फक्त निगराणी आणि संरक्षण करणे हेच या विभागाचे अधिकृत धोरण आहे. या कार्यपुस्तिकेमध्ये काही बदल नुकतेच करण्यात आले मात्र वर निर्देश केलेले मुलभूत धोरण आहे तसेच ठेवण्यात आलेले आहे.

आता आपण पुण्याकडे वळूया. पुण्यामध्ये ऐतिहासिक कालातील सर्वात महत्त्वाचे आणि अजूनही जमिनीवर उभे असलेले स्थापत्य म्हणजे शनिवारवाड्याची तटबंदी आहे याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे काहीच कारण नाही. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी बांधून घेतलेले हे स्थापत्य किती भव्य आणि दिमाखदार असले पाहिजे याची थोडीफार झलक आपल्याला या तटबंदीमुळे अजूनही पहायला मिळते हे आपले भाग्यच म्हणता येईल. आपल्या तलवारीच्या जोरावर मध्य आणि उत्तर हिंदुस्थानचा बहुतांशी भाग आपल्या अंमलाखाली आणणार्‍या या पेशव्याने आपल्या सामर्थ्याला साजेशी अशी आपली राजधानीची जागा असली पाहिजे या विचाराने शनिवार वाड्यात अतिशय सुंदर दिसणारे आणि सागाचे लाकूड वापरून बांधलेले 7 मजली भव्य महाल उभारलेले होते. हे सर्व महाल 1817 मध्ये ब्रिटिशांनी शेवटच्या पेशव्याचा पराभव करून सत्ता काबीज केल्यानंतरची 10 वर्षे पर्यंत तरी शाबूत होते. पण त्या नंतर अचानक आग लागून हे सर्व महाल भस्मसात झाले. त्या नंतर तटबंदीच्या आत उरली आहेत ती फक्त दगडी बांधकाम केलेली इमारतींची जोती. या जोत्यांवरून या महालांच्या आकाराची मात्र कल्पना येऊ शकते.

सर्व मराठी माणसांचे हे दुर्दैव म्हणावे लागेल की या दुर्घटनेनंतर, पेशव्यांच्या या राजधानीची, इंग्रजांचे प्रतिनिधी म्हणून भेट देणार्‍या अधिकार्‍यांनी लिहून ठेवलेली वर्णने सोडली, तर हा वाडा आणि त्यातील महाल कसे होते हे पुढच्या पिढ्यांना कळू शकेल असे कोणतेही चित्र, छायाचित्र किंवा इमारतीचा आराखडा आता कोठेही उपलब्ध नाही. त्यामुळे तटबंदीच्या आतील महाल, त्यांची स्थापत्य वैशिष्ट्ये आणि त्यांचा दिमाख कसा होता हे कळणे आता अशक्यप्राय आहे. हे महाल कसे दिसत असत? त्यांचे बांधकाम कसे केलेले होते? वगैरे सारखे प्रश्न आता अनुत्तरितच राहणार आहेत.
या अडचणीमुळे जरी या महालांची पुनर्बांधणी करू असे कोणी ठरवले तरी कोणतेच आराखडे, तैलचित्रे किंवा छायाचित्रे उपलब्ध नसल्याने पुनर्बांधणी केलेले महाल जुन्या महालांप्रमाणेच आहेत असे खात्रीलायकपणे कोणालाच सांगणे शक्य होणार नाही. त्याच प्रमाणे पुरातत्त्व विभागाची धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे यांनुसार शनिवार वाडा ही महत्त्वाची राष्ट्रीय वारसा वास्तू समजली जात असल्याने हा विभाग अशी काही पुनर्बांधणी शनिवारवाड्याच्या तटबंदीच्या आत करू देईल याची सूतराम शक्यता दिसत नाही.

या सगळ्या पार्श्वभूमीवर, पुण्याच्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीने शनिवारवाड्याची पुनर्बांधणी करण्याचा ठराव संमत करणे जरा आश्चर्यजनक वाटतेहा ठराव मांडणार्‍या आणि मंजूर करून घेणार्‍या नगरसेवकांना एकतर वस्तुस्थिती काय आहे याची माहिती तरी नसावी किंवा ते एखादी राजकीय खेळी खेळू इच्छित आहेत असे वाटले तर नवल वाटावयास नको. मागे जिजामाता उद्यानातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा जसा हलवला गेला किंवा आता शनिवारवाड्याजवळील बस थांब्याला लाल महाल बस थांबा असे नाव देण्यात यावे अशी काहीतरी गर्भित अर्थ असणारी एक मागणी करण्यात आली आहे असे माझ्या नुकतेच कानावर आले आहे. त्यातलाच काहीतरी हा प्रकार असावा असा संशय मनात येणे स्वाभाविक आहे.
या ठरावानुसार पुनर्बांधणीचे कार्य बॉलीवूडच्या चित्रपटांसाठी भव्य दिव्य असे कार्डबोर्डचे सेट उभारणार्‍या एका प्रसिद्ध कला दिग्दर्शकाला देण्यात यावे असेही या ठरावात नमूद केलेले आहे. हे कला दिग्दर्शक मोठे नामवंत व प्रतिभाशाली आहेत व त्यांनी उभारलेले काही सेट मनाला थक्क करून सोडणारे आहेत याबाबत काही शंका वाटत नाही. परंतु शनिवारवाड्याचे कोणतेही तैलचित्र, छायाचित्र किंवा आराखडा उपलब्ध नसताना या कला दिग्दर्शकांनी उभारलेली कोणतीही वास्तू, मग ती कितीही भव्य किंवा दिव्य असली तरी ती एखाद्या फिल्मसेट सारखी त्यांच्या कल्पनेतीलच फक्त असणार आहे. या वास्तूला कोणतेच ऐतिहासिक महत्त्व असू शकणार नाही.
मला आशा आहे की महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा या कारणांसाठी हा ठराव फेटाळून लावील. अर्थात जरी या सभेने असा काही ठराव संमत केला तरी पुरातत्त्व विभाग शनिवारवाड्याच्या तटबंदीच्या आत अशी काही वास्तूबांधणी करण्यास परवानगी देणे अशक्यच वाटते. त्यामुळे हा पुनर्बांधणी केलेला काल्पनिक शनिवारवाडा तटबंदीच्या बाहेरच साकारू शकतो. त्यामुळे इतिहासाशी संबंध नसलेली एक प्रेक्षणीय वास्तू एवढेच फक्त त्याचे महत्त्व असू शकेल.
28 सप्टेंबर 2013

Saturday, 18 October 2014

दक्षिणा फेलोशिप

महाराष्ट्र शासन दरवर्षी पदवी परिक्षा,. पदव्युत्तर परिक्षा, यांच्यात अच्चुत्तम यश मिळवणार्‍या किंवा उच्च दर्जाचे संशोधन करणार्‍या संशोधकांना दक्षिणा फेलोशिप नावाची एक शिष्यवृत्ती देत असते. ही शिष्यवृत्ती मिळालेले संशोधक आपल्या बायो-डेटा मधे आपण दक्षिणा फेलो आहोत हे मोठ्या गर्वाने सांगतात. सध्या जरी ही शिष्यवृत्ती कोणत्याही क्षेत्रात कार्य करणार्‍या अभ्यासकाला मिळत असली तरी मुळात ही शिष्यवृत्ती संस्कृत वाङ्‌मय किंवा तत्वज्ञान या विषयांच्या अभ्यासकांना देण्यात येत असे. या शिष्यवृत्तीला हे असे असाधारण नाव का देण्यात आले आहे असे कुतुहल कोणासही वाटल्यावाचून रहाणार नाही. पण या नावामागे अडीचशे वर्षांचा तरी इतिहास आहे.


पहिल्या किंवा बाजीराव बाळाजी या पेशव्यांनी, 1731 मधे त्र्यंबकराव दाभाडे यांच्याबरोबर झालेल्या युद्धात विजयश्री प्राप्त झाल्यानंतर, दख्खन, कर्नाटक, आणि भारतातील इतर ठिकाणे, येथून पुण्यात येणार्‍या, ज्ञानी, व्यासंगी, निर्मळ चारित्र्याच्या व आपले ज्ञान व व्यासंग यांचा मान राखणारे वर्तन असलेल्या ब्राम्हणांना, दर वर्षी श्रावण महिन्यात, दक्षिणा देण्याची प्रथा सुरू केली होती. नंतर या दक्षिणा वाटपासाठी, बाजीराव पेशव्यांचे पुत्र, बाळाजी बाजीराव किंवा नानासाहेब पेशवे यांनी, पुण्यातील पर्वतीच्या पायथ्याशी. एक मोठा कक्ष बांधून घेतला होता. या कक्षाला रमणा असे नाव होते.


.. 1737 मधे वाटण्यात असलेली एकूण दक्षिणा 17731/- रुपये असली तरी थोड्याच वर्षात जसजसे मराठी साम्राज्याचे वैभव वाढू लागले तसतशी दक्षिणेची रक्कम लाखात पोचली. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात 5 लाख रुपये दक्षिणा म्हणून वाटण्यात आले. या दक्षिणेसाठी पार तंजावर ते बनारस, मथुरा येथून शास्त्री पुण्यात येत असत. आलेल्या पंडितांच्यात वैदिक ब्राम्हण, व्याकरणकार, ज्योतिषी, कवी, वेदांत ज्ञानी, तर्कतीर्थ, वैद्य आणि साधू या सर्व प्रकारचे ज्ञानी पंडित असत. आलेल्या पंडितांना पुण्यातील प्रभुणे शास्त्री, बाळ शास्त्री, आर्य शास्त्री आणि काशिनाथ शास्त्री यांच्या समोर आपल्या ज्ञानाची परिक्षा द्यावी लागत असे. त्या नंतर त्यांचा व्यासंग व ज्ञान यानुसार त्यांना दरबारात किंवा रमण्यात पाचारण करण्यात येई त्यांना भोजन विडा व दक्षिणा देण्यात येत असे.


रमण्याच्या कक्षाला चार द्वारे होती व या चार द्वाराजवळ स्वत: पेशवे, नाना फडणवीस, प्रभुणे शास्त्री व अमृतराव त्यांच्या शरीर संरक्षकांसमवेत बसलेले असत व दक्षिणा वाटत. दक्षिणा मिळालेल्या प्रत्येक पंडिताच्या कपड्यांवर किंवा अंगावर लाल रंगाची खूण करण्यात येत असे. दक्षिणा वाटण्याचे कार्य तसे खूप जिकिरीचे व धोक्याचे होते. परंतु पुण्यातील पेशव्यांचे पोलिस दल व मराठी सैन्य यांच्या कडक बंदोबस्ताखाली ते सुलभतेने पार पाडण्यात येई. पुण्याच्या या दक्षिणा समारंभाची ख्याती एवढी पसरली होती की ब्रिटिश रेसिडन्सी मधले गोरे अधिकारी हा समारंभ बघण्यास येत असत.
1797 मधे कॅप्टन मूर या ब्रिटिश अधिकार्‍याने आपल्या काही सहकार्‍यांबरोबर हा दक्षिणा समारंभ पाहण्यासाठी रमण्याला भेट दिली. त्याने या दक्षिणा समारंभाचे मोठे तपशीलवार वर्णन लिहून ठेवले आहे. दुसर्‍या बाजीरावाच्या कारकिर्दीपर्यंत हा दक्षिणा समारंभ चालू राहला. पण त्या वेळी पंडितांची परिक्षा घेणे वगैरे गोष्टी बंद होऊन आलेल्या सर्व ब्रम्हवृंदाला दक्षिणा वाटप करण्यात येऊ लागले. 1818 नंतर इंग्रज सरकारने दक्षिणा समारंभ बंद केला. परंतु थोड्याच दिवसात त्यांना या दक्षिणा समारंभामुळे राज्यातील व राज्याबाहेरच्या ज्ञानी व पंडितांना पेशवे दरबार केवढे प्रोत्साहन देत होता याची कल्पना आली. 1821 मधे माऊंट स्ट्यूअर्ट एल्फिस्टन याने लिहून ठेवलेल्या एका पत्रात या दक्षिणा समारंभाचे महत्व त्याने मान्य केले. या समारंभामुळे, भारतातील ज्ञानोपासकांना मोठे प्रोत्साहन मिळत होते हे त्याने मान्य केले. हा समारंभ बंद केल्याने पुण्यातील ब्राम्हण समाजाचे, इंग्रज सरकारबद्दलचे मत आणखीनच कलुषित होते आहे व नाराजी पसरत चालली आहे याची जाणीवही त्याला झाल्याचेही तो मान्य करतो.
दुसर्‍या बाजीरावाच्या कारकिर्दीत दक्षिणा समारंभावर जेवढा खर्च होत असे तेवढीच रक्कम इंग्रज सरकारने दक्षिणा ग्रॅन्ट म्हणून देण्यास सुरवात केली. या दक्षिणा ग्रॅन्ट मधून एक संस्कृत पाठशाला चालू करण्यात आली शिष्यवृत्या देण्यात येऊ लागल्या व संस्कृत भाषा व तत्वज्ञान याच्या अभ्यासासाठी व प्रचारासाठी हे पैसे खर्च केले जाऊ लागले.
इंग्रज सरकार नंतर मुंबई सरकारने व नंतर महाराष्ट्र शासनाने दक्षिणा ग्रॅन्टची परंपरा चालूच ठेवली व त्याचेच सध्याचे स्वरूप दक्षिणा फेलोशिप हे आहे.पेशवे दरबार, आपल्या राज्यात शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्हावा, ज्ञानी व पंडितांचा योग्य आदर राखला जाऊन त्यांच्या चरितार्थाची सोय व्हावी या साठी किती प्रयत्नशील होता याची या दक्षिणा समारंभाच्या वर्णनावरून योग्य कल्पना आल्याशिवाय रहात नाही.

10 मार्च 2010

पुण्याच्या पेशव्यांचा होळी महोत्सव

पेशवे दरबारात दर वर्षी तीन सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात. या पैकी पहिले दोन उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि दसरा. याशिवाय अतिशय मोठ्या स्वरूपात व धूमधडाक्यात साजरा केला जाणारा तिसरा महत्वाचा सण म्हणजे होळी. फाल्गुन महिन्याच्या पोर्णिमेला सुरू होणारा हा महोत्सव पुढचे पाच दिवस अतिशय उत्साहाने व आनंदाने साजरा केला जात असे. दरबारात साजर्‍या होणार्‍या या सणात, प्रत्यक्ष पेशवे सरकार, अतिशय रुचीने व आनंदाने भाग घेत असल्याने पुण्याच्या सर्वच नागरिकांचा आनंद द्विगुणित होत असे व तेही अतिशय उल्हासाने आपापल्या घरी हा सण उत्साहाने साजरा करत. थोड्याच दिवसांनी येणार्‍या वसंत ऋतूच्या स्वागतासाठी हा सण आहे असे मानले जात असे. सर्व दर्जाच्या आणि वयाच्या लोकांना हा सण मोकळेपणे आणि मर्जीनुसार साजरा करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असल्याने निरनिराळ्या प्रकारांनी लोक स्वत:ची करमणूक करून घेत.


या उत्सवाच्या दरम्यान, पेशव्यांच्या शनिवार वाड्यात, अनेक नृत्य, गायन व संगीताच्या मैफिली होत असत आणि पुण्यातील नागरिक या कार्यक्रमांना भरपूर दादही देत असत. भवाई गुजराथी आणि वेंकट नरसी हे त्या कालातील दोन प्रसिद्ध गायक होते. आतासारखी संपूर्ण नाटके तेंव्हा होत नसत. परंतु काही नट छोटे छोटे विनोदी प्रसंग पेशव्यांच्या समोर सादर करीत व चांगली बिदागी मिळवीत. .1785 मधल्या पेशव्यांच्या दैनंदिनीत, श्री. बाललिंग नाईक आणि लक्ष्मण गुरव या सुपे येथील दोन नटांना, दशावताराचे चांगले सोंग काढल्याबद्दल रुपये 30/- व पोषाख अशी बिदागी दिल्याची नोंद सापडते.


हा उत्सव पाचव्या दिवशी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी समाप्त होत असे. या दिवशी केशर व पलाश फुले या पासून तयार केलेले रंग, पिचकार्‍या व मातीची भांडी यांचा वापर करून, एकमेकावर मोक़ळेपणाने टाकण्यात येत असत. स्वत: पेशवे सरकार हिराबाग येथील सुख महालात रंग खेळत. यावेळी शिंदे, भोंसले, होळकर वगैरे सारखे सरदार व सेनाप्रमुख यांना पेशव्यांचे खास आमंत्रण असे.


ग्वाल्हेरच्या शिंदे दरबारात असलेल्या ब्रिटिश रेसिडेंटचे शरीर रक्षक मेजर ब्रॉउटन हे एका अशा रंगपंचमीला हजर होते. त्यांनी या प्रसंगाचे मोठे सुंदर वर्णन लिहून ठेवले आहे. ते म्हणतात की
असा प्रसंग मी माझ्या आयुष्यात यापूर्वी कधी अनुभवला नव्हता आणि पुन्हा कधी अनुभवीन असे वाटत नाही. कल्पना करा की तुमच्या समोर सोने आणि चांदी यांच्या झिरमिळ्यांनी सजलेले अतिशय रंगीबेरंगी कपडे परिधान केलेल्या अनेक नृत्यांगनांचे समुह नाच करत जात आहेत. या नृत्यांगनांचे अंग व कपडे गुलालाने माखलेले आहेत व सभोवतालून होणार्‍या रंगाच्या पिचकार्‍यांनी त्यांचे सर्व कपडे भिजलेले असून त्यातून पाणी ठिपकत आहे.या नृत्यांगनाच्या चारी बाजूस, डफ, तुणतुणी, तुतार्‍या, सारंगी सारख्या अनेक वाद्यांचा कोलाहल चालू आहे व या वाद्यांच्या तालावर त्या नृत्यांगना खास होळीसाठी रचलेली गाणी म्हणत आहेत. मधूनच पेशवे सरकार आपल्या पिचकारीतून या नृत्यांगनांच्या अंगावर रंग उडवतात. या वेळी या नृत्यांगनांचे चित्कार व बाकी बाजूंना उभे असलेले इतर सर्व लोकांचा जल्लोश व टाळ्या वाजवणे यामुळे सर्व वातावरण मोठे आल्हाददायक व प्रसन्न बनले आहे. गुलाल उडवणार्‍यांचे हास्य व ज्यांच्या अंगावर तो गुलाल उडवला जातो आहे त्यांच्या न उडवण्याबद्दलच्या विनवण्या ऐकू येत आहेत. या प्रसंगाचे जर कोणी चित्र काढले तर त्याला फक्त गुलाबी आणि पिवळ्या रंगातच हे चित्र काढावे लागेल. हा प्रसंग इतका असामान्य आणि अफलातून आहे की माझ्याजवळ त्याचे वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीत.”


उत्तर पेशवाईत पुढेपुढे म्हणजे दुसर्‍या बाजीरावाच्या कालखंडात, या होळीच्या महोत्सवाची गुणवत्ता कमी होत गेली व त्याला अनौचित्यपूर्ण, बीभत्स व अश्लील असे स्वरूप प्राप्त होऊ लागले. या कालखंडात, पेशवाई राज्याची राजधानी पुणे हे हळूहळू एक नीतिमूल्यांचा र्‍हास व लोप पावत असलेले असे एक decadent आणि degenerating शहर होत चालले होते. त्या पार्श्वभूमीवर पेशव्यांच्या या होळी उत्सवाचेही स्वरूप बीभत्स व अश्लील झाले असले तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही.
27 फेब्रुवारी 2010

(लेखात घातलेल्या चित्रांचा होली उत्सवाशी तसा काही संबंध नाही, तत्कालीन पुण्याची ही तैलचित्रे आहेत.)

Tuesday, 16 September 2014

पेशवेकालीन पुण्यातला दसरा

दुर्गा भवानी माता ही भोंसले कुलाची इष्टदेवता असल्याने, सातार्‍याच्या शाहू महाराजांच्या हयातीत, नवरात्रीचे नऊ दिवस व त्यानंतर येणारा दसरा असा दहा दिवसाचा सण, मोठ्या थाटामाटाने, सातार्‍याला मराठी राज्याचा सण म्हणून साजरा होत असे. शाहू महाराजांच्या निधनानंतर, बाळाजी बाजीराव किंवा नानासाहेब पेशव्यांनी हा सण तितक्याच थाटामाटाने पुण्यात साजरा करण्यास सुरवात केली. या प्रसंगी अनेक धार्मिक विधी करण्यात येत असले तरी पेशव्यांची मिरवणूक व नंतर भरवण्यात येणारा खास दरबार हे या सणाचे विशेष वैशिष्ट्य होते.
दसर्‍याच्या दिवशी सकाळी श्रीमंत पेशवे व त्यांचे सर्व सरदार हे एका मिरवणूकीने पुणे शहराबाहेरच्या एका छावणीकडे जाण्यास निघत. या प्रसंगी सर्व सरदारांच्या तुकड्या  स्वत:च्या रंगीबेरंगी आणि फडफडणार्‍या ध्वजाच्या किंवा निशाणांच्या मागे आपापल्या सर्वोत्तम घोड्यांवर स्वार झालेले असत. प्रत्येकाच्या अंगावर उत्कृष्ट कपडे व दागदागिने असत. त्यांची शस्त्रे घासूनपुसून अगदी चकचकीत केलेली असत. सर्व घोडे, उंट व हती हे त्यांच्या अलंकारांनी सजवलेले असत.

पुण्यातील जवळजवळ सर्व नागरिक मिरवणूकीत भाग घेणारे किंवा प्रेक्षक म्हणून या मिरवणूकीबरोबर चालत येत असत. ही अतिशय भव्य अशी मिरवणूक, आधी ठरवलेल्या एका शमी वृक्षापाशी येऊन थांबत असे. यानंतर श्रीमंत पेशवे या शमी वृक्षाची पूजा करत असत. ती झाल्यावर पेशवे या शमी वृक्षाची काही पाने तोडून घेत असत. त्या वेळी सैनिकांच्याजवळच्या सर्व तोफा व बंदुका डागण्यात येत व सर्व आसमंत दुमदुमुन जात असे. या नंतर या प्रसंगासाठी मुद्दाम विकत घेतलेल्या एका ज्वारी किंवा बाजरीच्या शेतात पेशवे जात व पिकाची एक दोन कणसे तोडून घेत. या क्षणी परत एकदा सैनिक बंदुका डागत, काहीजण धनुष्य़ाने बाणांचा वर्षाव करत. व अत्यंत आनंदाने व जल्लोशाने सर्वजण त्या शेताकडे धाव घेत व जमेल तेवढी कणसे खुडून घेण्याचा प्रयत्न करत व घरी परतत. उरलेल्रा सर्व दिवस हर्ष उल्हासात घालवण्यात येत असे. काही मराठा सरदार या प्रसंगी शेळी किंवा बैलाचा बळी देत असत. बळीचे रक्त अतिशय विधीपूर्वक घोड्यांच्या अंगावर शिंपडण्यात येत असे व ते अत्यंत शुभ मानले जाई. बळी जनावराचे मांस आपल्या हाताखालच्या, ब्राम्हण सोडून इतर, सर्व सैनिकांमधे, प्रसाद म्हणून वाटण्यात येत असे. काही मोठे सरदार हाताखालच्या लोकांना, बळीची जनावरे विकत घेण्यासाठी पैसे देत असत व बळी देऊन त्या बळीचे मांसभक्षण करणे हा दसर्‍याचा सर्वात मुख्य विधी मानला जाई.

सीमोल्लंघनाच्या स्वारीवरून परत आल्यावर शनिवारवाड्यातल्या दरबार महालात एक खास दरबार भरवला जात असे. या दरबारात सेनापती, सरदार व शिलेदार पेशव्यांना नजराणा पेश करत व पेशवे दरबारकडून सर्वांना त्यांच्या त्यांच्या स्थानाप्रमाणे मानाची वस्त्रे मिळत. हे मानाचे वस्त्र मिळणे हे त्या काळी अतिशय सन्मानाचे मानले जाई. इ. स. 1794 मधे पेशव्यांनी रुपये 2 लाख वीस हजार एकशे चव्वेचाळीस एवढ्या किंमतीची मानाची वस्त्रे मान्यवरांना दिली होती. त्यातील प्रमुख काही असे होते.


सातार्‍याचे राजे त्यांचे कुटुंब व सरदार:- रु. 27383/-
पंत प्रतिनिधी, कुटुंब व सरदार :- रु. 1283/-
पंत सचीव व कुटुंब:- रु. 603/-
चिंतामणराव पटवर्धन:- रु. 1238/-
परशुराम रामचंद्र :-रु. 1089/-
तुकोजी पवार:- रु. 789/-
खंडेराव विंचुरकर :-रु.2756/-
कृष्णराव बळवंत:- रु 2398/-
हणमंतराव दरेकर रु.:- 827/-
दौलतराव घोरपडे :- रु. 604/-
रघुजी भोंसले :- रु 6440/-
हैद्राबादचे निझाम:- रु.5888/-
चिंतामणराव फडके;- रु 1120/-
दौलतराव शिंदे :- रु. 11297/-
अलीबहादुर:- रु. 2015/-


या शिवाय घोडदळाच्या अधिकार्‍यांना रु. 34033/- व शिलेदारांना रु. 79703/- एवढ्या किंमतीची मानाची वस्त्रे दिली होती. इंग्रज रेसिडेंट व त्याचा वकील यांनाही मानाची वस्त्रे देण्यात आली होती. सर्व सैनिक व इतर अधिकारी यांना ही मानवस्त्रे मिळवण्याचा हक्क होता. मजेची गोष्ट म्हणजे राघोबा पेशव्यांच्या अंगवस्त्रांचीही नावे या यादीत होती.

दसर्‍याच्या निमित्ताने सैनिकांचे स्पर्धात्मक खेळ आयोजित केले जात असत व नंतर इंग्रजांच्या काळातही ही प्रथा चालू होती.

मानवस्त्रे देण्याची प्रथा पेशवाईचा अंत होईपर्यंत तर चालू होतीच पण नंतरही इंग्रजांनी ती अनेक वर्षे चालू ठेवली होती. काही वर्षांनी ही मानवस्त्रे दसर्‍याला न देता इंग्रज राजाच्या वाढदिवशी देण्याची प्रथा सुरू झाली व या वेळी इंग्रज एजंट, दरबारही भरवत असे.

या सर्व प्रथा कधी बंद झाल्या कोण जाणे? पेशवे दरबारने ज्या काही रूढी सुरू करून त्यांचे जतन केले होते त्यापैकीच एक हा दसर्‍याचा समारंभ होता. ज्या सैन्याच्या जिवावर मराठी सामार्‍ज्य उभे होते त्या सैनिकांचा व अधिकार्‍यांचा दसर्‍याच्या निमित्ताने सत्कार करण्याची पद्धत अतिशय योग्य होती यात शंकाच नाही.


24 सप्टेंबर 2009

Thursday, 11 September 2014

पेशव्यांचा गणेशोत्सव

पेशवेकालीन पुण्यात साजर्‍या केल्या जाणार्‍या सार्वजनिक उत्सवांत, तीन प्रमुख असत, दसर्‍याचे सीमोल्लंघन, गणेशोत्सव आणि होळी. हे तिन्ही उत्सव अतिशय भव्य प्रमाणात आणि मोठ्या उल्हासाने साजरे केले जात. या उत्सवांचा सर्व खर्च पेशव्यांचा दरबारातून होत असे. या वेळी होणार्‍या कार्यक्रमांच्यात खेळ आणि करमणूकीचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जात असत. या निमित्ताने अनेक व्यायामपटू, नर्तक, नट, गायक, शाहिर पुण्यात जमा होत असत.

दर वर्षी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंतचे 10 दिवस, पेशव्यांच्या महालात गणेशोत्सव साजरा होत असे. या निमित्ताने, गणपती रंग-महाल अतिशय सुंदर रित्या सजवला जात असे आणि सर्व कार्यक्रम येथेच होत असत. भिंतींच्यावर लावलेली नयन मनोहर तैल-चित्रे आणि आरसे, छतावर टांगलेली स्फटिकांच्या लोलकांची झुंबरे आणि हंड्या यांत या सगळ्या सजावटीची अनेक प्रतिबिंबे दिसत आणि संपूर्ण महाल प्रकाशमय होऊन जात असे. मध्यभागी ठेवलेली पेशव्यांची मसनद त्यावरील सोन्याच्या जरीकामामुळे झगमगत असे. मसनदीच्या दोन्ही बाजूंना वरिष्ठ अधिकारी, सरदार, शिलेदार, दरबारी आपले सर्वोत्तम रत्नजडित कपडे परिधान करून त्यांच्या हुद्द्यांप्रमाणे बसत असत. भालदार, चोपदार यांनी ललकारी दिल्यावर पेशवे अतिशय रुबाबदारपणे महालात प्रवेश करत असत व आपल्या पदाला साजेश्या पद्धतीने, आसनास्थित होत असत. सर्व दरबार हा निरनिराळे रंग आणि जमलेल्या लोकांची वैशिष्ट्यपूर्ण वैविध्ये, यामुळे मोठा खुलून दिसत असे. सर्वांच्या करमणुकीसाठी आयोजित केलेले, नर्तन, गाणी व संगीत, कथा-कीर्तन आणि इतर कार्यक्रम या नंतर सुरू होत असत.

peshwa1790


1795 या वर्षांत पेशवे दरबारापुढे, किती कलाकारांनी आपली कला प्रस्तुत केली आणि त्यांना किती बिदागी दिली गेली याचा हिशोब बघितला तर या उत्सवाची भव्यता लक्षात येईल. त्या वर्षी 181 कीर्तनकारांनी कथा सांगितल्या होत्या व त्यांना कपड्यालत्त्याशिवाय 2155 रुपये बिदागी दिली होती. 39 गायकांना 329 रुपये बिदागी मिळाली होती. 43 नर्तकींच्या पथकांना 1026 रुपये बिदागी मिळाली होती. 43 पखवाजांना 121 रुपये तर 25 वाजंत्रीवाल्यांना 240 रुपये देण्यात आले होते.

शनिवारवाड्यातील सर्व सेवक वर्ग या गणेशोत्सवात अगदी मनापासून भाग घेत असे व उत्सव उत्कृष्ट रितीने साजरा करण्यात त्यांचा मोठा भाग असे. या सर्वांना पेशव्यांकडून मिठाई आणि बक्षिसे मिळत असत. या उत्सवाच्या निमित्ताने वाड्यावर अनेक ब्राम्हणांना भोजन घालण्यात येई आणि गरीबांना मिठाई वाटण्यात येत असे.

10 दिवसानंतर, या उत्सवासाठी मुद्दाम तयार केलेल्या, शाडूच्या मातीच्या गणपतीच्या प्रतिमेचे विसर्जन करण्यासाठी, पेशवे जातीने एका फुलांची सजावट केलेल्या नावेतून नदीमधे जात असत व सर्व औपचारिक धार्मिक विधी पार पाडून, प्रतिमेचे विसर्जन करत असत.

हे सगळे वर्णन वाचून असे वाटले की हा पेशव्यांचा अतिशय औचित्यपूर्ण, आपल्या इतमामाला साजेसा आणि गुणी कलावंतांना, सजावट करणार्‍या कलाकारांना, प्रोत्साहन देणारा गणेशोत्सव कुठे? आणि आज त्याचे काय झाले आहे?


24 ऑगस्ट 2009

Tuesday, 9 September 2014

शनिवारवाडा

शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज हे सन 1707 मध्ये मोगलांच्या कैदेतून सुटून महाराष्ट्रात आले व इ.स. 1713 मध्ये त्यांनी बाळाजी भट यांची, पंतप्रधान पेशवा म्हणून नियुक्ती केली. इ.स. 1817 मध्ये शिवाजी महाराजांचे वंशज, सातार्‍याचे प्रतापसिंह महाराज हे इंग्रजांच्या स्वाधीन झाले व त्यांच्याच सांगण्यावरून प्रतापसिंह महाराजांनी त्या वेळचे नियुक्त पेशवे, बाजीराव रघुनाथराव यांना पेशवेपदावरून दूर केले. या दोन घटनांमधील 104 वर्षांच्या कालखंडात, मराठी राज्याची सर्व सत्ता, बाळाजी भट व त्यांच्या घराण्यातील 5 पिढ्यांच्यातील पुरुष, यांच्याच हातात पेशवे म्हणून एकवटली होती. आपल्या कर्तुत्वाने पेशव्यांनी, अटकेपर्यंत आपले झेंडे लावले आणि सर्व उत्तर हिंदुस्थान आपल्या अंमलाखाली आणला होता. या कालात सर्व सत्ता सूत्रे पुण्यातून हलत असल्याने पुणे हे हिंदुस्थानचे सत्ता केंद्र झाले होते.

800px-Shaniwarwada_Pune

दिल्ली दरवाजा


मराठ्यांच्या या सत्तेला, वैभवाला साजेशी त्यांची गादी असली पाहिजे या हेतूने थोरले बाजीराव पेशवे यांनी, पुण्यामध्ये मुठा नदीच्या काठावर एक भव्य आणि सुरक्षित वास्तू बांधायचे ठरवले व 10 जानेवारी 1730 रोजी त्यांनी या वास्तूचा भूमिपूजन समारंभ केला. अशी दंतकथा आहे की या ठिकाणी बाजीराव पेशव्यांनी एका सशाला कुत्र्याचा पाठलाग करताना पाहिले. हे पाहिल्यावर बाजीरावांच्या असे मनात आले की या जागेत काहीतरी विशेष असले पाहिजे व त्यांनी ही जागा पेशव्यांच्या गादीसाठी मुक्रर केली. ही जागा त्यावेळी पुणे कसब्यात मोडत होती व या जागेभोवती मातीची भिंत बांधलेली होती. त्यावेळी या जागेत फक्त काही कोळी व कोष्टी वास्तव्य करून असत. बाजीराव पेशव्यांनी या लोकांना, मंगळवार पेठेत पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्या व 5 एकर क्षेत्रफळाची ही जागा आपल्या ताब्यात घेतली.

ShaniwarWada

उपग्रहातून शनिवारवाडा


बाजीराव पेशव्यांच्या स्वभावानुसार त्यांनी ही वास्तू बांधून घेण्याचे काम अतिशय जलद गतीने पूर्ण करून घेतले व फक्त 2 वर्षात मराठी सत्तेला व वैभवाला साजेसा होईल असा आतल्या बाजूस 3 चौक असलेला एक दुमजली आलिशान प्रासाद तयार झाला. याच वर्षात म्हणजे शनिवार 22 जानेवारी सन 1732 रोजी बाजीरावांनी या वास्तूचा वास्तुपूजन समारंभ साजरा केला. हा प्रासाद बांधण्यासाठी 16110 रुपये खर्च आला व वास्तुपूजेनिमित्त 15 रुपये आठ आणे ब्राम्हणांना दक्षिणा देण्यात खर्च करण्यात आले. बाजीरावांच्या जीवनशैली प्रमाणे हा प्रासाद साधा पण उठावदार होता. फक्त दिवाणखाना मात्र शोभिवंत वस्तूंनी सजवलेला होता. बाजीराव पेशव्यांचे चिरंजीव बाळाजी बाजीराव यांनी 1750च्या आसपास या प्रासादात बरेच बदल केले व अनेक नवीन इमारती बांधल्या. हे करताना त्यांनी किती पैसा खर्च होईल किंवा वेळ लागेल याचा विचार केला नाही. या बदलांनंतर शनिवारवाडा एका भव्य आणि सौंदर्यपूर्ण दिमाखाने ओळखू जाऊ लागला. आपली सत्ता व वैभव यांचे हा वाडा एक साक्ष आहे या कल्पनेने या पेशव्यांनी वाड्यातील बदलांच्यात जातीने लक्ष घातल्याने, शनिवारवाडा अत्यंत प्रेक्षणीय व देखणी अशी एक वास्तू बनला. नंतर 1780 च्या सुमारास सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात नाना फडणवीस यांनी नवीन खोल्या, दिवाणखाने, गॅलर्‍या व टॉवर आणि कारंजी बांधली व शनिवारवाडा, महाराष्ट्र आणि हिंदुस्थानावर सत्ता गाजवणार्‍या पेशव्यांच्या रुबाबाला व इतमामाला साजेसा होईल, याचे जातीने प्रयत्न केले.

800px-ShaniwarWada_Balcony

आतील भाग, जुन्या इमारतींची जोती अजून दिसतात.


शनिवारवाड्याचा मुख्य प्रासाद हा सहा मजली उंच होता. असे म्हणतात की आळंदीच्या देवळाचा कळस सहाव्या मजल्यावरून दिसत असे. पेशव्यांच्या मेघडंबरी या महालाच्यावर असलेल्या गच्चीतून पर्वती वरील देउळ आणि पुणे शहर याचे मोठे सुंदर विहंगम दृष्य दिसत असे. अजून अस्तित्वात असलेल्या दिल्ली दरवाजाच्यावर असलेल्या नगारखान्याच्या उंचीवरून या सहा मजली प्रासादाच्या उंचीची कल्पना येऊ शकते. 5 एकर आवार (कॅम्पस) असलेल्या या शनिवारवाड्यात प्रवेश करण्यासाठी 5 प्रवेशद्वारे होती. ही प्रवेशद्वारे अशी होती. उत्तरेला असलेला दिल्ली दरवाजा, कसबा गणपतीच्या देवळाजवळ असलेला गणेश दरवाजा. जांभूळ दरवाजा, खिडकी दरवाजा आणि मस्तानी दरवाजा. नाना फडणवीसांनी नंतर मस्तानी दरवाज्याचे नाव अली बहादूर दरवाजा असे बदलले. अली बहादूर हे मस्तानीचे नातू होते. त्यांनी पुढे बुंदेलखंड जिंकून तिथे बंडा या जहागिरीची स्थापना केली. दिल्ली दरवाजा हे शनिवारवाड्याचे प्रमुख प्रवेशद्वार होते. ते बांधत असताना शाहू महाराजांनी ते उत्तराभिमुख असल्याने दिल्ली बादशहाचा अवमान होतो असे वाटल्याने त्याचे काम थांबविण्याची बाजीरावाना विनंति केली. ती मानून बाजीरावांनी काम थांबवले. पुढे बाळाजी पेशव्यांनी शाहू महाराजांच्या निधनानंतर ते काम पूर्ण केले. हा दरवाजा अजूनही उत्तम स्थितीत आहे. व त्याच्यावरून वाड्याच्या एकूण कारागिरीची कल्पना येऊ शकते.

shaniwar wada spiked gate

दिल्ली दरवाजा


वाड्याच्या बाहेर असलेल्या दोन बाजूच्या भिंती 200 फूट लांब आणि 20 फूट उंच आहेत तर उरलेल्या दोन बाजू 150 फूट लांब व 20 फूट उंच आहेत. पायाला दगडी बांधकाम व वर वीटकाम केलेले एकूण 9 बुरुज या बाहेरील भिंतीमध्ये आहेत. हे बुरुज व भिंती यावर कोणत्याही वेळी 275 सैनिक कडा पहारा करत असत. वाड्यात 4 प्रशस्त चौक होते व 8 महत्वाचे दिवाणखाने, महाल किंवा स्टॆट-रूम्स होते.

1. ग़णपती रंग महाल- मुख्य दरबाराचा महाल
2. नाचाचा दिवाणखाना
3. आरसे महाल
4. जुना आरसे महाल
5. दादासाहेबांचा दिवाणखाना- रघुनाथ बाळाजी यांचा दिवाणखाना
6. थोरल्या रायाचा दिवाणखाना- पहिल्या पेशव्यांच्या नावाचा दिवाणखाना
7. नारायणरावाचा महाल
8. हस्तीदंती महाल

याशिवाय पेशवे कुटुंबातील इतरजणांना रहाण्यासाठी, अनेक दालने व सदनिका शनिवारवाड्यात होत्या. हा भव्य प्रासाद अतिशय शिस्तबद्ध आणि सुनियंत्रित प्रशासनाच्या पूर्ण नियंत्रणाखाली चालत असे. जवाहिरखाना, जिन्नसखाना, तिजोरीची खोली, भांडार, वाचनालय, औषधालय, शस्त्रास्त्रांची खोली, दस्तऐवज ठेवण्याची खोली आणि चित्रशाला अशी निरनिराळ्या उपयोगांसाठी असलेली स्वतंत्र दालने होती. व त्या प्रत्येक दालनावर त्या विभागाच्या कार्यासाठी व नियंत्रणासाठी एक अधिकारी नियुक्त केलेला असे.

या एवढ्या मोठ्या घराच्या संरक्षणासाठी, 1779 मधल्या दस्त ऐवजाप्रमाणे 3144 कर्मचारी तैनात केलेले होते. त्यांची वर्गवारी अशी होती. खाशांचे संरक्षक-480 ,पुरंदर संरक्षक- 229, कानडी सैनिक- 325, घोड्यांच्या पागेसाठी रिसालदार-34, खाशांचे घोडेस्वार- 82, पायसैनिक (इनफन्ट्री)- 224, सेवकवर्ग- 76, शिलेदार व बारगीर- 1690 या शिवाय 300 घोडेस्वार सैनिक कोणत्याही क्षणी जय्यत तयार असत. ही संख्या नंतर 500 पर्यंत वाढविण्यात आली होती. पेशव्यांच्या प्रासादाची शासनयंत्रणा किती प्रभावी होती याची यावरून कल्पना येऊ शकते.

बहुतेक महाल किंवा दिवाणखाने एकाच नमुन्याचे होते. हा नमुना तेंव्हा वापरात असलेल्या शाई आणि बोरू ठेवण्याच्या पात्रासारखा दिसत असल्याने त्याला कलमदानी म्हणत असत. या नमुन्यात मध्यभागी, एक छोटे विभाग केलेला पण आयताकृती आणि सपाट छत असलेला असा, एक महाल असे. याच्या चारी बाजूंना उतरते छप्पर असलेल्या चार पडव्या असत. मुख्य महालाला आधार देत असलेले सुरूच्या झाडासारखे दिसणारे खांब, कोरीव काम केलेले असत. हे खांब एकमेकाला अत्यंत सुंदर असे कोरीव काम केलेल्या कमानींनी जोडलेले असत. छतावर लाकडी तक्तपोशी बसवलेली असे व त्यावर, पाने, फुले, वेलबुट्टी यांची नक्षी किंवा रामायण महाभारतातले प्रसंग चित्रित केलेले असत. जयराज नावाचा जयपूरहून मुद्दाम आणलेला एक कारागीर हे काम करत असे. खांबांच्या मधे रेशमी पडदे टांगलेले असत व जरूरीप्रमाणे ते खाली घेत असत किंवा बांधून ठेवण्यात येत. काही ठिकाणी अरुंद अशा खिडक्याही ठेवण्यात येत.

गणेश रंग-महाल किंवा मुख्य दरबाराचा महाल हा बाळाजी पेशव्यांनी 1755 मध्ये गणेशोत्सव भव्य प्रमाणात साजरा करता यावा म्हणून मुद्दाम बनवून घेतला होता. हा महाल अतिशय भव्य असाच होता. एका वेळी 100 नर्तकी सुद्धा यात नाच करू शकत असत. एका टोकाला सोन्याचा पत्रा चढवलेली संगमरवरी गणेशमूर्ती ठेवलेली असे. या मूर्तीच्या भोवती पुराणातील प्रसंगांचीच सजावट केलेली असे. महालाच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या एका पाण्याच्या छोट्याशा तलावात सतत थुईथुई उडणारी कारंजी बसवलेली होती. या कारंज्यांच्या दुसर्‍या बाजूसच एक अतिशय सुंदर अशी फुलबाग होती. या फुलांचा येणारा सुगंध व कारंज्यांचा आवाज त्यामुळे या महालात बसणे हा मोठा सुखद अनुभव असे. पेशव्यांची बैठक किंवा मसनद म्हणजे एक चार ते पाच इंच उंचीची गादी असे, यावर पांढरी शुभ्र चादर अंथरलेली असे. सोन्याच्या जरीचे भरतकाम असलेल्या गर्द हिरव्या रंगाचे अभ्रे घातलेल्या 3 उशा या गादीवर ठेवलेल्या असत.

peshwa1790

गणेश रंग महाल


महालांच्या बाहेर असलेल्या  चौकांच्यात कारंजी बांधण्यात आलेली होती. विशेष कारणप्रसंगी ही चालू करण्यात येत असत. गणपती रंगमहालाच्या पश्चिमेला ‘हजारी कारंजे’ या नावाने ओळखले जाणारे एक विशेष कारंजे होते. 80 फुटाचा परिघ असलेले एक 16 पाकळ्यांचे कमळ या कारंजात बनविण्यात आले होते. यातल्या प्रत्येक पाकळीवर पाणी उडणार्‍या 16 तोट्या बसवलेल्या होत्या. हे कारंजे सुरू झाल्यावर अतिशय अप्रतिम व नयनरम्य असे दृष्य दिसत असे. या कारंजात उडणार्‍या पाण्यावर सूर्यप्रकाश पडला की शेकड्यांनी इंद्रधनुष्ये दिसत असत. या शिवाय आणखी जरा खोल असलेल्या एका जलाशयाच्या भिंतीवर पाण्याच्या तोट्या इतक्या बेमालूमपणे लपवून बसवलेल्या होत्या की या तोट्यांच्यातून वहाणारे पाणी खडकामधून वहात असताना धबदब्यातून पडणार्‍या पाण्यासारखे किंवा एखादी पांढरी चादर झाल्यासारखे दिसत असे. या पाण्याच्या चादरीमागे रंगीबेरंगी दिवे लावत असत. विशेषत: रात्रीच्या वेळी या पाण्याच्या चादरीचे दृष्य़ अतिशय नेत्रदीपक असे वाटत असे. या कारंजाला पाण्याची चादर या नावानेच ओळखले जाई.

दिवाणखाने किंवा दरबार महाल हे अतिशय सुंदर फर्निचर व पडदे यांनी सजवलेले असत. जिन्नसखाना या महालात, परदेशी व मुगल पद्धतीची तैलचित्रे, निरनिराळ्या परदेशी व देशातल्या लोकांकडून मिळालेल्या भेटवस्तू कलात्मक रित्या मांडून ठेवलेल्या असत. या शिवाय निरनिराळी घड्याळे, खेळणी, दुर्मिळ हत्यारे वगैरे वस्तूही नीट जपून ठेवलेल्या असत. हे सगळेच महाल इतके सुंदर सजवलेले असत की ते पहाणारा दर्शक विस्मित होत असे. मराठी दफ्तरात दुर्दैवाने या प्रासादाबद्दल फारसे काही लिहिलेले नाही. परंतु पेशव्यांना भेटायला आलेल्या काही युरोपियन पाहुण्यांनी पेशव्यांचा थाटमाट आणि वैभव कसे होते आणि आपण काय पाहिले याचे बारकाईने वर्णन करून ठेवलेले असल्याने आज आपणाला त्याची थोड्या प्रमाणात कल्पना येऊ शकते.

पेशव्यांचा हा अत्यंत सुंदर व भव्य शनिवारवाडा,  1827 मध्ये लागलेल्या एका महाभयंकर आगीत जळून पूर्णपणे नष्ट झाला. ही आग 7 दिवस भडकलेली होती. एरवी सर्व बाबतीतील रेकॉर्ड अतिशय अचूकरित्या ठेवणार्‍या इंग्रज राज्यकर्त्यांनी या बाबतीतील कोणतीही माहिती कधीच जाहीर केली नाही. ही आग कशामुळे लागली? ती विझविण्याचे काय प्रयत्न केले? या संबंधी कोणतेही रेकॉर्ड अस्तित्वात आहे असे वाटत नाही. शनिवारवाडा, पेशवे यांच्याबद्दल पुष्कळ लिखाण उपलब्ध आहे. परंतु या कोणत्याही पुस्तकात या आगीचे कोणतेही कारण कधीच देण्यात येत नाही.

माझ्या लहानपणी म्हातार्‍या माणसांच्या तोंडून मी असे ऐकले होते की शनिवार वाड्याला आग इंग्रजांनीच लावली. आधीची 150 वर्षे स्वराज्यात, स्वातंत्र्य अनुभवलेल्या, महाराष्ट्रातील व विशेषत: पुण्यातील जनतेला, इंग्रजी अंमल व पारतंत्र्य हे कधीच सहजपणे मान्य होण्यासारखे नव्हते. आपला अंमल चालू झाल्यावर दशक उलटले तरी मराठी माणूस इंग्रजी अंमलाच्या विरुद्धच आहे याची पुण्यातील इंग्रज शासनाला बहुदा जाणीव असावी. पेशव्यांच्या मराठी साम्राज्याची आठवण जोपर्यंत शनिवारवाडा दिमाखाने उभा आहे तोपर्यंत मराठी मनातून कधीही जाणार नाही हे त्यांनी ओळखले असावे आणि म्हणूनच अत्यंत गुप्तपणे त्यांनी मराठ्यांच्या अस्मितेची ही खूण, नष्ट करण्याचा डाव आखला असावा.

पेशव्यांची ही अत्यंत सुंदर, दिमाखदार आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची असलेली वास्तू, जळून नष्ट होण्याचे दुसरे कोणतेही कारण मला तरी दिसत नाही.

16 ऑगस्ट 2009

Monday, 8 September 2014

पेशव्यांचे मराठी सैन्यदल

लहान असल्यापासून आपण सर्वजण, मराठ्यांचा इतिहास ऐकतो आणि वाचतो. ज्या मराठी सैन्याने दिल्लीपर्यतचा प्रदेश पादाक्रांत केला होता व नंतर ज्या सैन्याला इंग्रजांकडून पराभव पत्करावा लागला होता, ते मराठी सैन्य होते तरी कसे? त्याची अधिकार-साखळी (Chain of Command) कशी असायची? त्यांची शस्त्रे काय असत? ते दिसत कसे असे? त्यांचे कच्चे दुवे कोणते होते? या बद्दल मला नेहमीच जबरदस्त कुतुहुल होते व त्याबद्दल माहिती करून घेण्याचीही इच्छा होती.


मला सैनिकी आयुष्याची थोडीफार आवड तशी प्रथमपासूनच असल्याने, मी शाळा कॉलेजात असताना N.C.C.चा कॅडेट चार पाच वर्षे तरी होतो. N.C.C.च्या या शिक्षणात, परेड करणे, रायफल व मशिन गन चालवणे, मॅप रिडिंग करणे यासारख्या सैनिकी कला, थोड्याफार आत्मसात करण्याची संधीही मला मिळाली होती. तसेच वर्षातून एकदा दहा बारा दिवस होणार्‍या कॅम्प्समधे मी सैनिकी जीवनही अनुभवले होते. त्यामुळेच आधुनिक भारतीय सैन्याबद्दल, मला प्राथमिक तरी माहिती आहे असे नक्कीच म्हणता येईल. सैन्य किंवा सेनादल म्हटले की साधारणपणे आपल्या डोळ्यासमोर, 26 जानेवारीच्या परेडमधे शिस्तबद्ध रितीने चालणारे जवान उभे रहातात. त्याच वेळी बहुदा ती जवानांची तुकडी कोणत्या पथकातील आहे? त्यांनी कोणत्या लढायांच्यात मर्दुमकी गाजवली वगैरेची वर्णने आपल्याला रेडियो किंवा टीव्हीवर ऐकायला मिळतात.


आधुनिक भारतीय सैन्यदले जरी कितीही प्रभावी आणि शक्तीशाली असली तरी त्यांची मूळ बैठक ही इंग्रजांनीच बसवलेली आहे हे नाकारणे शक्य नाही. त्यांच्या सर्व जुन्या तुकड्या, मराठी सैन्यासकट इतर अनेक सैन्यांबरोबर इ.स. 1700 ते 1800 मधे लढलेल्या आहेत. त्यामुळेच आधुनिक भारतीय सैन्याबद्दल कितीही माहिती असली तरी त्यावरून मराठी सैन्याची कल्पना करणे केवळ अशक्य आहे. मध्यंतरी मला एक जुना संदर्भग्रंथ सापडला आणि माझ्या बर्‍याच दिवसांच्या या कुतुहलाचे समाधान झाले.


जेम्स फोर्ब्स या सोळा वर्षाच्या इंग्रज तरुणाला, इ.स 1764मधे, कंपनी सरकारच्या मुंबई किल्यात, लेखक म्हणून नोकरी मिळाली. तो चित्रेही उत्तम काढत असे. इ.स 1784मधे जेम्स इंग्लंडला परत गेला. तो सैनिक कधीही नव्हता. त्या काळची परिस्थिती, सैन्याच्या मोहिमा, वगैरे गोष्टींबद्दलचे रेकॉर्ड लिहिण्यासाठी त्याची नेमणूक झाली होती. या काळात काही वर्षे त्याला इंग्रजी सैन्याबरोबर रहावे लागले. या कालात इंग्रजी सैन्य बर्‍याच वेळा मराठी सैन्याबरोबर, हैदर अली, टिपू सुलतान, निझाम यांच्या सैन्यांविरूद्ध लढले. याच कारणामुळे, जेम्सला मराठी सैन्य जवळून बघता आले. या कालातील मराठी सैन्य, सेनापती, आणि मराठी शासनयंत्रणा या बद्दलचे त्याचे निरिक्षण, सत्याला बरेच धरून असावे असे म्हणूनच मला वाटते.


मराठी सेनादल


मराठी सेनादल हे अनेक धर्मांच्या आणि अनेक देशांच्या सेनांचे मिळून बनलेले असते. त्यामुळे त्याच्यात एकसंधीपणाच नाही असे कोणाला वाटल्यास नवल नाही. त्यांना एक ठराविक असा गणवेश दिलेला नसतो आणि त्यांच्या एकंदरीत वागण्यावरून त्यांच्यात फारशी शिस्त नसावी असेच बघणार्‍याला वाटते. चिलखतधारी सैनिक खूपच वैशिष्ट्यपूर्ण दिसतात. त्यांच्या डोक्यावरचा जिरेटोप कानावरून असतो व जवळ जवळ खांद्यापर्यंत येतो. अंगरखा कापसाच्या जाड रजईसारखा बनवलेला असतो व याच्यावर लोखंडी साखळ्यांची जाळी बसवलेली असते.

B000GBB0I4.01-A2HVZT81H1J2HN._SS500_SCLZZZZZZZ_V65169937_

मराठा सैनिक


सेनादलातील तुकड्या


हिंदुस्तानातील ज्या जातिजमातींचे लोक लढवय्ये म्हणून ओळखले जातात, असे सर्व हिंदू व मुसलमान लोक, सैन्यात पराक्रम गाजविण्यासाठी मोठे उत्सुक असतात. पेशवे स्वत: ब्राम्हण असले तरी त्यांनी सैनिकी पेशा पूर्णपणे अंगिकारलेला आहे. त्यांचेच अनुकरण करून अनेक ब्राम्हण कुटुंबांनी अगदी साध्या सैनिकाच्या हुद्यापासून हा पेशा स्वीकारलेला दिसतो. सैनिक किंवा सरदार यांना समाजात जो मान मिळतो तो राजकारण किंवा इतर कोणत्याही पेशातल्या व्यक्तीला मिळत नाही.

देशातील सर्वसाधारण हिंदू किंवा मुसलमान सैनिकापेक्षा उत्तरेकडून आलेले व्यावसायिक सैनिक जास्त कडवे वाटतात. या उत्तरेकडून आलेल्या सैनिकात, समरकंदकडून आलेले मुघल, इराणच्या व कंदहारच्या बाजूने आलेले पठाण व कास्पियन समुद्राजवळचे तुर्की या सर्वांचा समावेश होतो. यातले खूपसे सैनिक स्वत:चे हत्यार व घोडा घेऊन सैन्यात येतात. व युद्ध करण्याशिवाय त्यांना इतर काही रस नसतो. यातले काही पायी चालणारे सैनिक स्वत:ची बंदुक घेऊनही येतात यांना नजीब म्हणून ओळखले जाते. या सैनिकांनी युरोपियन सैन्यांची शिस्त अंगिकारली असल्याने त्यांना सैन्यात लगेच नोकरी मिळू शकते.

या शिवाय पेशव्यांच्या सैन्यात, रजपूत सैनिकांच्या स्वत:चा ध्वज असलेल्या तुकड्या असतात. रजपूत लढवय्यांच्यात, इतर सैनिकात अभावानेच दिसणारे, शौर्य, उदारपणा व खाल्या मिठाला जागण्याची वृत्ती हे गुण भरपूर असल्याने ते अतिशय सुप्रसिद्ध आहेत. हे सैनिक अजमेरच्या आजूबाजूच्या प्रदेशातून येतात व स्वातंत्र्याची महति यांच्याइतके दुसरे कोणीही जाणत नसतील. पूर्वेकडून आलेले पुरभय्ये सैनिकांच्याही स्वत;च्या तुकड्या असतात. हे सर्व व्यावसायिक सैनिक असल्याने यांच्यात नियमितपणा आणि त्यांना नोकरी देणार्‍या पेशव्यांच्याबद्दल संपूर्ण निष्ठा हे गुण आढळतात.

या लढवय्या सैनिकांखेरीज, मराठा सैन्यातील एक महत्वाचा घटक म्हणजे पेंढारी आणि बाजारबुणगे. या लोकांच्या हातात ठराविक हत्यार असे नसते. एकदा मुख्य सैन्याने एखादा प्रदेश काबीज केला की त्या प्रदेशात लूटमार करणे हे या लोकांचे काम असते. घराच्या कड्या, कुलपे, बिजागर्‍यांपासून ते साठवून ठेवलेले धान्य यापर्यंत सर्व गोष्टींची हे  लूट करतात. त्यांना पगार मिळत नाही पण मिळालेल्या लूटीत वाटा मिळतो.
सैन्य व अधिकारी वर्गाच्या सामानाची हलवाहलव करण्यासाठी उंटदलाचा वापर केला जातो. या साठी सैन्याच्या छावणीत एक उंटदल तयार असते.

B000GB9GHG.01-A2HVZT81H1J2HN._SS500_SCLZZZZZZZ_V65148326_

रघुनाथराव पेशवे


घोडदल


मराठ्यांच्या सैन्यातले घोडदल तीन वर्गांत विभागलेले असते. पहिल्या वर्गातले घोडेस्वार सैनिक, हुजुरत किंवा खाशीपागा या नावाने ओळखले जातात. हे घोडदल पेशव्यांचे स्वत:चे असते व त्यातील सैनिक अत्यंत वरिष्ठ दर्जाचे लढवय्ये असतात. दुसर्‍या वर्गातील घोडदल हे जहागिरदारांचे व मनसबदारांचे असते तर तिसर्‍या वर्गाच्या घोडदलात मुसलमान, पुरभय्ये वगैरे व्यावसायिक लढवय्ये मोडतात. घोड्यांची निगा राखणारे साईस या दलात दिसत नाहीत व सैनिकच स्वत: घोड्यांची निगा राखतात. जेंव्हा घोड्यांना खाण्यासाठी गवत किंवा इतर गोष्टी मिळू शकत नाहीत तेंव्हा हे सैनिक गवताची जमिनीत असलेली मुळे खणून काढतात व स्वच्छ धुवून घोड्यांना खायला देतात. मराठी सैनिक घोडे आणि रत्नसंपत्ती यांनाच सर्वात जास्त मान देताना दिसतात. अतिशय  उमदे असे अरबी घोडे जरी पागेत असले तरी मराठा सैनिक त्यांच्या भीमथडी तट्टांनाच युद्धासाठी प्राधान्य देतात.




अधिकार साखळी व अधिकारी वर्ग


मराठी सैन्यात कुशलता किंवा ज्येष्ठता यावर आधारित अशी अधिकार साखळी नसते. महत्वाच्या अधिकार्‍यांना मनसबदार म्हणतात. या अधिकारी किंवा सरदारांचे एका ठराविक संख्येच्या घोडेस्वार सैनिकांवर अधिपत्य असते.(उदा. पाच हजार, पाचशे). युरोपमधल्या जुन्या सरंजामशाही मधल्या सरदारांसारखी ही प्रथा आहे. या सरदारांना त्यांची वतने किंवा जहागिरी असतात, व या जहागिरीत ते स्वतंत्र्यरित्या कारभार चालवतात. जेंव्हा कधीही त्यांना पेशव्यांचा हुकूम होतो तेंव्हा आपल्या हाताखालचे इतर दुसरे सरदार व सैनिक घेऊन या जहागिरदारांना, पेशव्यांच्या सैन्यामधे सामिल व्हावे लागते. या व्यवस्थेमुळे युरोपियन सैन्यात जी अधिकार साखळी व शिस्त दिसते त्याचा काहीसा अभाव मराठी सैन्यात दिसतो. त्यामुळे कधी पहिली गोळी झाडायची किंवा कधी ताशे बडवायचे याची शिस्त लावणे हे सेनापतीसाठी मोठे कठिण काम बनते.

सेनादलातील तुकड्यांना स्वत:चे ध्वज असतात. पेशव्यांचा ध्वज हा त्रिकोणी आकाराचा व जांभळ्या रंगाचा असतो व त्यावर सोनेरी जरीचे काम केलेले असते. बहुतेक ध्वज लाल रंगाचे असतात. काही तुकड्या ते उंच उभारतात तर काही मध्यम उंचीवर असतात. अतिशय वरिष्ठ अधिकार्‍यांच्या घोड्यांचे खोगिर व डोके यावर तिबेटहून आणलेले तिबेटी गाईंच्या केसांची झालर लावलेली असते. या सरदारांच्या एका बाजूला असलेल्या एका सेवकाने त्यांच्या डोक्यावर जरीचे काम केलेली मखमली छत्री धरलेली असते तर दुसर्‍या बाजूचा सेवक चवरी ढाळत असतो. सेनापती त्यांना मिळालेल्या एखाद्या मानसन्मानाच्या बिरुदाने ओळखले जातात.
पेशवे आणि इतर अतिशय वरिष्ठ अधिकारी युद्धाच्या आणि इतरही वेळी हत्तींचा वापर करतात. या साठी एक हत्तीदल तयार ठेवले जाते.

maratha1

सवाई माधवराव पेशवे व मंत्री



निर्णय घेण्याची पद्धत


युद्धक्षेत्रावर असले तरी पेशव्यांची राज्यकारभार चालविण्याची पद्धत पुण्यातून चालणार्‍या कारभारपद्धतीसारखीच असते. रोज संध्याकाळी सर्व महत्वाचे अधिकारी आणि मंत्री पेशव्यांच्या दरबारात जमतात. राजकारण, युद्धाची हालहवाल, व इतर महत्वाच्या बाबतींवर चर्चा होते व पुढच्या दिवसासाठी फर्माने सोडली जातात. तक्रारी ऐकल्या जातात, अन्याय दूर केले जातात व न्यायही दिला जातो.
मराठ्यांच्या सैन्याची मला नवीन समजलेली एक व्युहरचना म्हणजे जेंव्हा शत्रुचे एखादे गांव काबीज करावयाचे असते त्या वेळी त्या गावाभोवती दिलेला वेढा. या व्युहामधे वेळ खूप लागत असला तरी एकदाही बंदुक न झाडता तुम्ही विजय मिळवू शकता.

Musket

ठासणीची बंदुक


शस्त्रे व हत्यारे


एका तुकडीतल्या सर्वांच्याकडे सारखीच हत्यारे कधीच नसतात. काही सैनिकांकडे ढाल तलवार असते. ठासून भरण्याच्या दारूच्या बंदुका(Musket) काही जणांकडे असतात. या शिवाय धनुष्य-बाण, भालाधारक सैनिकही दिसतात. काही जण अग्निबाण उडवण्यातले तज्ञ असतात. काही जणांजवळ परशु (Battle Axe) असतो. परंतु सर्व सैनिकांजवळ तलवार (Sabre) ही असतेच. तलवारी नेहमी धारदार व उत्तम रित्या परजलेल्या असतात. तुर्की किंवा इराणी सैनिक बहुतांशी वक्री(Curved Blade) तलवार वापरतात. घोडेस्वार मराठा सैनिकांना दुहेरी धारेची, सरळ तलवार पसंत असते. या तलवारीला ते ‘अल्मन’ (German) म्हणतात व दमास्कसवरून येणार्‍या या तलवारींसाठी ते कोणतीही किंमत मोजण्यास तयार असतात. त्यांची ही तलवार चालविण्याची कुशलता अतिशय उत्तम असते.

आम्हाला अतिशय त्रासदायक वाटणारे मराठ्यांचे अग्निबाण म्हणजे 2 इंच व्यासाची व 8 ते 10 इंच लांबीची एक लोखंडी नळी असते. ही नळी एखाद्या भाल्याला बांधली जाते. नंतर या नळीत दारू भरून ती वातीच्या सहाय्याने पेटविली जाते. हा अग्नीबाण जर योग्य दिशा देऊन सोडला तर शत्रूपक्षात मोठा गोंधळ आणि घबराट उडवून देतो. मात्र मराठ्यांना उखळी तोफेचे ज्ञान नसावे असे वाटते.

जेम्स फोर्ब्सची मराठी सैन्याबद्दलची वरील निरिक्षणे बघितले की दोन गोष्टी प्रामुख्याने जाणवतात. हिंदुस्थानावर कबजा करायचा असला तर एक ना एक दिवस, शेवटचे युद्ध आपल्याला मराठ्यांच्याच सैन्याशी करावे लागणार आहे, हे इंग्रज सेनानी पूर्णपणे जाणून होते. त्यामुळे शत्रूची बलस्थाने कोणती? त्याचे नाजुक अंग कोणते? याची संपूर्ण माहिती इंग्रज जमा करत होते. त्यासाठीच जेम्स फोर्ब्ससारखा कुशाग्र निरिक्षण करणारा त्यांनी 17 वर्षे फक्त निरिक्षण करणे आणि चित्रे काढणे यासाठी नोकरीवर ठेवला होता. याच्या उलट इंग्रज सेनेची अधिकार साखळी, शिस्त हे सगळे डोळ्यासमोर दिसत असून व त्याचे परिणाम सतत भोगायला लागत असून (पराभवांच्या रूपाने) पेशव्यांसकट सर्व मराठी सेनान्यांनी आपल्या सैन्यात व युद्धनीतीत काहीही बदल किंवा सुधारणा केली नाही. कदाचित अखेरीस झालेल्या त्यांच्या दुर्दैवी पराभवाचे एक कारण हा निष्काळजीपणाही असू शकेल.



6 ऑगस्ट 2009