जंगले, वृक्ष संवर्धन, या सारख्या निसर्गाशी जवळीक साधणार्या विषयांत विशेष रुची
असणार्या निसर्गप्रेमी मंडळींना ही बातमी वाचताना मधुर संगीत कानावर पडल्यासारखे
वाटले तर आश्चर्य वाटायला नको.
भारताच्या भूभागावर असलेल्या जंगलांच्या किंवा वृक्षछायेच्या
प्रदेशात प्रदेशात 5871 चौरस किमी. एवढी वृद्धी झाल्याचे उपग्रहाच्या सहाय्याने (The Satellite based remote sensing data) केलेल्या
पाहणीत आढळून आले आहे. पश्चिम बंगाल राज्याचा या वृद्धीमध्ये सिंहाचा म्हणजे 64 %
वाटा आहे. तेथे असलेला वृक्षछायेचा प्रदेश 3810 चौरस किमी वाढला आहे तर ओदिशा
राज्यामधील जंगले 1444 चौरस किमी तर केरळ मधील जंगले 622 चौरस किमीने वाढली आहेत.
बंगाल मधील वृद्धी ही कमी उंचीच्या झाडांची अतिशय दाट वाढ आणि जंगलामध्ये असलेल्या
मोकळ्या जागांच्यात वाढलेली हिरवाई यामुळे झाली आहे.
मात्र अरुणाचल प्रदेश व इशान्येकडील इतर राज्ये यांचा 75%
प्रदेश व्यापणार्या जंगलांच्यात 627 किमीची झालेली घट ही एक काळजीची बाब आहे. या
शिवाय आंध्र,
मध्य प्रदेश आणि छत्तिसगढ राज्यातील जंगलांतही घट झाली आहे तर झारखंड आणि बिहार
राज्यांतील जंगलात वृद्धी झाली आहे.
या पाहणीमधे आणखी एक बाब लक्षात आली आहे. अतिशय घनदाट
जंगलांमध्ये 31 किमीची वृद्धी झाली आहे. मध्यम दाटीच्या जंगलांत 1991 चोरस किमी घट
तर विरळ वृक्षछाया असलेल्या जंगलांत 7891 चोरस किमी वृद्धी झाली आहे. या तिन्ही
प्रकारच्या जंगलांत मिळून वर सांगितल्याप्रमाणे एकूण 5871 चोरस किमी एवढी एकूण वृद्धी झाली आहे.
16 फेब्रुवारी 2015

