Thursday, 11 September 2014

पावसासाठी वेदाचार्यांचा पिंप यज्ञ

शुक्ल यजुर्वेदाच्या एकविसाव्या अध्यायाच्या सुरवातीसच, वरूण किंवा  पावसाच्या देवाची एक मोठी सुरेख प्रार्थना केलेली आहे. “हे वरूणा तू आमच्यावर त्वरित कृपावंत होऊन तुझ्या दयेला आम्हाला पात्र कर” अशी काहीशी सुरवात असलेली ही प्रार्थना, यजुर्वेद हा यज्ञाच्या वेळी म्हणण्याचा वेद असल्याने, यज्ञाच्या प्रसंगी केली जात असे.

आपल्यावर कोणतेही संकट येऊ घातले आहे असे वाटल्यावर, सर्व श्रद्धाळू जन आपल्या आपल्या श्रद्धास्थानांची प्रार्थना करतात. यात नवल असे काहीच नाही. पाऊस न पडणे हे तर सर्व जनांसाठी महासंकट आहे. मुंबईमधले, वेदमंत्रात पारंगत असलेले वेदाचार्य आणि वेद अभ्यासक, यांनी हे संकट लवकरात लवकर टळावे म्हणून, दोन दिवसांपूर्वी असेच एक यज्ञकर्म, वरूणराजाने कृपा करावी म्हणून संपन्न केले.

for rain


मुंबईत माटुंग्याला असलेल्या व कांची शंकराचार्यांच्या भक्तगणांनी स्थापन केलेल्या, ‘शंकर मठम’ या संस्थेत हे यज्ञकर्म करण्यात आले. नवलाची गोष्ट म्हणजे हे यज्ञकर्म करण्यासाठी या वेदाचार्यांना यज्ञाची वेदी, अग्नि वगैरे सामुग्रीची काहीच आवश्यकता भासली नाही. हे यज्ञकर्म करण्यासाठी या मंडळींनी ऍल्युमिनियम धातूची 10 मोठी पिंपे पाण्याने भरली व त्यात गळ्यापर्यंत येईल एवढे पाणी भरून हे वेदाचार्य त्यात स्थानापन्न झाले. नंतर तब्बल चार तास यजुर्वेद आणि ऋग्वेदातील वरूणाच्या स्तुतीपर ऋच्यापठण केले.

हे यज्ञकर्म, ऍल्युमिनियम धातूच्या पिंपातच का केले? असा प्रश्न कोणाच्याही मनात येईल. यजुर्वेदाच्या काली ऍल्युमिनियम धातूचा शोध नकीच लागलेला नव्हता. या धातूचा शोध तर एकोणिसाव्या शतकात लागला होता. मग हे यज्ञकर्म कोणत्या तर्काने या धातूची भांडी वापरून केले? याचे काहीच स्पष्टीकरण या वेदाचार्यांनी दिले नाही. पण त्यांचे “वेदमंत्रांच्या उच्चाराने कंपने निर्माण होऊन, पाऊस पडत असल्याने, पर्जन्य वृष्टी साठी वेद शास्त्रात सांगितलेला हा उत्तम उपाय आहे” हे विधान वाचून मात्र हसावे की रडावे हेच मला कळेनासे झाले.
वेद अभ्यासकांची वेदांबद्दल श्रद्धा असणे साहजिकच आहे. त्या श्रद्धेच्या पोटी हे यज्ञकर्म या वेदाचार्यांनी, समाजाच्या भल्यासाठी केले, यात कोणालाच काही गैर वाटण्यासारखे नाही. परंतु काहीतरी अशास्त्रीय व भोंगळ विधाने केल्यामुळे त्यांच्या श्रद्धेबद्दल इतरांना आदर वाटण्याऐवजी ते फक्त उपहासासच पात्र होतील अशी भिती आहे. त्यांच्या या यज्ञकर्माने, पाऊस पडेल की नाही ते मला माहिती नाही. पण या दहा वेदाचार्यांना सर्दी पडसे होण्याची शक्यता मात्र जास्त वाटते.


28 ऑगस्ट 2009