Showing posts with label चंद्रयान -1. Show all posts
Showing posts with label चंद्रयान -1. Show all posts

Friday, 19 September 2014

चंद्रयान आणि अमेरिकन लाल फीत

भारताच्या चंद्रयानावर अमेरिकन शास्त्रज्ञांनी बसवलेल्या एका उपकरणाद्वारे, चंद्रावर असलेला पाण्याच्या अस्तित्वाचा शोध हा अतिशय महत्वाचा मानता येईल. पाण्याच्या मॉलेक्यूल्सचा प्रत्यक्ष शोध जरी अमेरिकन उपकरणाच्या निरिक्षणांद्वारे लागला असला तरी हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागाजवळून पाहिजे तसे नेणे, वळवणे ही कामे तर चंद्रयानानेच पार पाडली. त्यामुळेच या यशाचे श्रेय अमेरिकन शास्त्रज्ञ व भारतीय शास्त्रज्ञ या सर्वांना मिळून देणे आवश्यक आहे व शास्त्रज्ञांच्या जागतिक समुदायाने ते दिलेही आहे. चंद्रयान-2 वर आपली उपकरणे बसवण्यासाठी सर्व जगातून भारताकडे इतक्या विनंत्या आल्या आहेत की त्यापैकी कोणती उपकरणे बसवायची हे ठरवणे अवघड बनले आहे. चंद्रयान-1 च्या यशाची ही खरी पोच पावती आहे.

_46295776_launch3ap226


चंद्रयान-1 वर बसवलेले अमेरिकन बनावटीचे उपकरण हे भारतीय व अमेरिकन शास्त्रज्ञांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांचे जरी द्योतक असले तरी अमेरिकन लाल फितीच्या सागरात हा एकत्रित प्रयत्न, गटांगळ्या खाऊन बुडण्याच्या स्थितीला आला होता ही वस्तुस्थिती आहे. इ.स. 2004 मधे भारतीय व अमेरिकन शास्त्रज्ञ या प्रयोगाची रूपरेखा आखत असताना अमेरिकेतील निर्यात नियंत्रण विभागाने या प्रयत्नांत सुरवातीपासूनच मोडता घालण्याचा प्रयत्न केला होता. हे उपकरण अमेरिकेतून बंगलोरला पाठवण्यासंबंधीचे कागदपत्र या विभागातून पुढे सरकतच नव्हते. या विभागाने आपल्या अख:त्यारीत असलेल्या सर्व उचापती करून हा प्रयोग थांबवण्याचे शक्य तितके प्रयास करून बघितले होते. त्या वेळचे अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी प्रत्यक्ष हस्तक्षेप केल्यावर हे उपकरण बंगलोरला येण्याचा मार्ग खुला झाला होता.

चंद्रयान-1 या प्रकल्पाचा खर्च 100 मिलियन यू.एस डॉलर्स एवढा होता व तो संपूर्ण भारतानेच केला आहे. हा प्रकल्प आंर्तराष्ट्रीय व्हावा म्हणून भारताने या यानावरील सर्व प्रायोगिक उपकरणे, पूर्णपणे मोफत घेऊन जाऊ म्हणून आंर्तराष्ट्रीय समुदायाला सांगितले होते. लेसर प्रिंटरच्या आकाराचे व 9 के.जी. वजन असलेले एक अमेरिकन उपकरण या उपकरणांपैकी  असेल असे भारतीय व अमेरिकन शास्त्रज्ञांनी मिळून ठरवले होते. भारताची अट एवढीच होती की या उपकरणाकडून आलेली संदेशरूपी माहिती दोन्ही देशांच्या शास्त्रज्ञांना उपलब्ध व्हावी. अमेरिकन नोकरशाहीला,  भारताने देऊ केलेली 400000 किलोमीटरच्या मोफत  राईडची कल्पना मान्य होती परंतु त्या उपकरणाचे संदेश भारताला उपलब्ध व्हावेत ही अट काही मान्य होत नव्हती.
1974च्या अणू चाचण्यांनंतर भारतातील बहुतेक शास्त्रीय प्रयोगशाळांना अमेरिकन सरकारने बहिष्कृत केले होते. त्या जुन्या पुराण्या नियमांचा आधार घेऊन अमेरिकन नोकरशाही या शास्त्रीय प्रयोगात खीळ घालण्याचा शक्य तितका प्रयत्न करत होते. इ.स 2006 पर्यंत अमेरिकन नोकरशाहीने हे उपकरण बंगलोरला जाऊ देण्यास नकार दिला होता. चंद्रयान-1 च्या सर्व आराखड्यांना अंतीम स्वरूप , केवळ अमेरिकन उपकरण येणार की नाही हे न ठरल्याने, भारतीय शास्त्रज्ञांना देता येत नव्हते. केवळ या अमेरिकन उपकरणासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी हे आराखडे तसेच अपूर्ण अवस्थेत ठेवले होते. अमेरिकन उपकरणासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी बघितलेली ही वाट, चंद्रावरच्या पाण्याच्या शोधाशी भारताच्या चंद्रयानाचे नाव आता कायमचे जोडले गेल्याने सार्थ ठरली आहे.

2006 मध्ये अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज बुश भारत भेटीसाठी येणार होते. त्या वेळी अखेरीस, त्यांच्याच हस्तक्षेपानंतर भारतीय व अमेरिकन अंतराळ शास्त्रज्ञांना, Technology Safeguards Agreement (TSA) आणि Technology Assistance Agreement (TAA) for space co-operation. हे दोन करार पूर्ण करून घेता आले व या एकत्रित प्रयत्नांचा मार्ग खुला झाला.

भारतातील शास्त्रीय प्रगतीला खीळ घालण्याचा अमेरिकन नोकरशाहीचा हा काही पहिला प्रयोग नव्हे. 2006 मधे भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने बोइंग कॉर्पोरेशन या कंपनीबरोबर सहकार्याचा एक करार केला होता. या कराराच्या कार्यवाहीमधे अमेरिकन नोकरशाहीने इतक्या अडचणी निर्माण केल्या की शेवटी हा करार रद्द करावा लागला. अजूनही अमेरिकन नोकरशाही, भारताबरोबरच्या अंतराळ संशोधनाच्या कोणत्याही प्रकल्पात, जर फक्त शास्त्रीय संशोधन असेल तर अडथळे निर्माण करत नाही. परंतु यात काहीतरी व्यापारी संशोधन आहे व नफा मिळू शकेल, अशा प्रयत्नांचा त्यांना थोडा जरी वास आला तरी मान्यता देण्यास तयार नसते.
चंद्रयानाच्या यशाची बातमी देताना, पाश्चात्य व अमेरिकन माध्यमांनी, मनाचा जो कोतेपणा दाखवला तो सुद्धा कोणत्याही भारतीयाला खटकल्याशिवाय रहाणार नाही. वास्तविक पाहिले असता, चंद्रावरील पाण्याचा शोध, हा केवळ चंद्रयानाच्या मोहिमेमुळेच लागला आहे. आधीच्या दोन मोहिमांतून मिळालेली माहिती अपूर्ण होती व फार फार तर पूरक होती. असे असूनही सर्व पाश्चात्य माध्यमांनी ही बातमी देताना फक्त अमेरिकन शास्त्रज्ञांना यशाचे क्रेडिट दिले होते व नाईलाजास्तव इतर दोन जुन्या मोहिमांबरोबर चंद्रयानाचे नाव घातले होते.

अर्थात जगभरचा शास्त्रीय समुदाय, माध्यमांच्या बातम्या वाचून आपले मत ठरवत नाही. भारताच्या चंद्रयानाचा या शोधात किती महत्वाचा सहभाग आहे याची या समुदायाला योग्य कल्पना आली आहेच. पाश्चात्य माध्यमांनी चंद्रयानाला कितीही गौण लेखल्याचा प्रयत्न केला असला तरी हा शास्त्रज्ञांचा समुदाय व जगातील इतर राष्ट्रे यांनी या मोहिमेचे महत्व योग्य रित्या जाणले आहे ही एक मोठी आनंदाची गोष्ट आहे.


9 ऑक्टोबर 2009