
दख्ख:नच्या पठारावर वाहणार्या भीमा या कृष्णेच्या प्रमुख उपनदीला, घोड ही नदी, दौंड गावाजवळ येऊन मिळते. या घोड नदीच्या काठावर आणि पुण्यापासून सुमारे 85 किमी अंतरावर, ‘इनामगाव‘ या नावाचे एक गाव वसलेले आहे. या इनामगावापासून सुमारे 3 मैल अंतरावर असलेल्या साधारण 65 एकर (500 X 500 m) एवढ्या पसार्याच्या अर्धवर्तुळाकार आवारात, मातीच्या 5 छोटेखानी टेकड्या किंवा उंचवटे दृष्टीस पडतात. 5 उंचवट्याचाहा परिसर, पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा असा आहे. पुण्यातील डेक्कन कॉलेज या संस्थेतील पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांनी,या परिसरात मोठे विस्तृत प्रमाणातील उत्खनन, 1968 ते 1982 या 14 वर्षाच्या कालखंडात केलेले आहे.
इनामगाव येथील उत्खनन झालेले हे स्थळ मोठे वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. इतिहासकार भारताच्या गत कालाचे दोन भाग मानतात. यापैकी शाक्यमुनी सिद्धार्थ गौतम बुद्ध याच्या कालापासून (इ.स.पूर्व 563 to 486 ) पुढच्या कालखंडाचे, ऐतिहासिक खंड असे नामानिधान केले जाते तर या पूर्वीच्या कालखंडाला,पूर्व-ऐतिहासिक कालखंड या नावाने ओळखले जाते. याचे कारण असे आहे की गौतम बुद्धाच्या कालापासूनच्या पुढच्या इतिहासाबद्दल,कोणत्या ना कोणत्या स्वरूपातला,लिखित पुरावा उपलब्द्ध झालेला आहे. मात्र या आधीच्या कालखंडाच्या इतिहासाबद्दल कोणताच लिखित पुरावा उपलब्ध नाही. इनामगाव या स्थळाचे वैशिष्ट्य हे आहे की ऐतिहासिक कालखंड आणि त्या आधीचा,पूर्व-ऐतिहासिक कालातील सिंधू-सरस्वती संस्कृतीचा कालखंड,या दोन्हीना जोडणार्या कालात(bridges the pre-historic and historic periods), इनामगाव उत्खनन स्थळ, हे सातत्याने एक मानवी वसतीस्थान राहिलेले आहे.
कच्छ मधील धोलावीरा येथील उत्खननात मिळालेले इ.स.पूर्व 1600 मधील वर्तुळाकार आकाराच्या घराचे अवशेष
इनामगाव येथील उत्खननावरून दिसून येते की या स्थानी,इ.स.पूर्व 1600 ते इ.स.पूर्व 700 या कालखंडात सातत्याने मानवी वस्ती होती. त्यामुळे असे म्हणता येते की इ.स.पूर्व 1600च्या सुमारास विलयास गेलेली भारताच्या वायव्य भागातील सिंधू-सरस्वती संस्कृती आणि गौतम बुद्धांचा (इ.स.पूर्व 600) काल यामधील कालखंडाचा इनामगाव हा एक दुवा आहे. आता सर्वसाधारणपणे असे मानले जाते की मूर्तीपूजक सिंधू-सरस्वती संस्कृतीची जागा,अग्नीपूजक वैदिक संस्कृतीने इ.स.पूर्व 1900 ते इ.स.पूर्व 1600 या कालखंडात निदान उत्तर भारतात तरी घेतली होती. त्यामुळे इनामगाव येथील उत्खनन या दृष्टीनेही महत्त्वाचे मानले जाते.
डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी इनामगाव मधील मानवी वस्तीचे तीन कालखंडात विभाजन केलेले आहे. यापैकी पहिल्या कालखंडाला ((1600-1400 इ.स.पूर्व) ‘माळवा संस्कृती‘, 1400-1000 इ.स.पूर्व या कालखंडाला ‘पूर्व जोरवे संस्कृती‘ आणि 1000-700 इ.स.पूर्व या कालखंडाला ‘उत्तर जोरवे संस्कृती‘ या नावाने ते ओळखतात.

इनामगाव येथील उत्खननात मिळालेले माळवा संस्कृतीकालीन वर्तुळाकार आकाराचे व जमीनीखाली तळ असलेले घर
पुरातत्त्व शास्त्रज्ञ आता असे मानतात की सिंधू-सरस्वती
संस्कृतीतील वस्त्या तेथे उपलब्ध असलेले जलस्रोत हळूहळू आटत गेल्याने
पूर्वेकडे व दक्षिणेकडे सरकू लागल्या व यापैकी काही वस्त्या मध्य प्रदेशातील माळवा भागात स्थिरावल्या होत्या. इनामगाव मध्ये सर्वात प्रथम वस्ती करण्यास आलेले माळवा संस्कृतीतील मानव,हे या माळवा भागाकडून आलेले होते. या वरून असा निष्कर्ष काढणे फारसे चूक ठरणार नाही की मूळ सिंधू-सरस्वती खोर्यातून आलेल्या लोकांच्या वस्त्यांपैकी काही वस्त्या पुढे आणखी दक्षिणेला म्हणजे दख्खनच्या पठारावर सरकल्या व इनामगाव सारख्या अनेक ठिकाणी येऊन स्थिरावल्या,किंबहुना इनामगाव मधील माळवा संस्कृतीतील वस्ती ही मूलत: सिंधू-सरस्वती संस्कृतीतील लोकांची होती. इनामगाव येथे उत्खनन झालेल्या माळवा संस्कृती घरांमध्ये सापडलेल्या आणि स्त्रीफलोधारणेचे प्रतीक असलेल्या स्त्री मूर्तींचे याच प्रकारच्या सिंधू-सरस्वती संस्कृतीमधील वस्त्यांमध्ये सापडलेल्या मूर्तींशी असलेले साधर्म्य लक्षात घेतले तर हा निष्कर्ष योग्य आहे असेच वाटते.

इनामगाव येथे सापडलेले पूर्व जोरवे संस्कृतीतील चौकोनी आकाराचे व जमीनीखाली तळ असलेले घर
इनामगाव मध्ये यानंतर म्हणजे 1400-1000 इ.स.पूर्व मध्ये किंवा पूर्व जोरवे संस्कृती कालखंडात स्थायिक झालेले लोक, प्रवरा-गोदावरी खोर्यांतून आलेले किंवा स्थानिक लोक होते. पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी इनामगाव
मधील उत्खननावरून काढलेला सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की मालवा
संस्कृती आणि पूर्व जोरवे संस्कृती या दोन्ही इनामगावमध्ये बर्याच मोठ्या
कालखंडासाठी एकत्रपणे नांदत होत्या.
पुरातत्त्व
विभागाचे शास्त्रज्ञ उत्खनन करत असलेल्या बहुसंख्य स्थानांवर भूतकाळातील
एका पाठोपाठ एक होऊन गेलेल्या सांस्कृतिक कालांचे अवशेष हे बहुधा उभ्या
पातळीमध्ये, एकाच्या डोक्यावर एक या पद्धतीने साठत गेलेले असतात. त्यामुळे जितके खोल खणत जावे तितके आपण जास्त जास्त गतकालात पोचत असतो. परंतु इनामगावचे वैशिष्ट्य हे आहे की येथे होऊन गेलेल्या तिन्ही संस्कृतींचे अवशेष हे एकाच पातळीवर विखुरलेले आढ्ळतात. त्यामुळे एका ठिकाणी घेतलेल्या खड्ड्यात फक्त एकाच संस्कृती कालाचे अवशेष आढळतात.
अमेरिकन लोक खूप वेळा त्यांच्या म्हणजे अमेरिकन संस्कृतीला, वितळवून एकवटणार्या हंड्याची (melting pot) उपमा देत असतात. त्यांच्या मताने अमेरिकेत बाहेरून सतत येत असलेल्या नाना वंशांच्या, खंडांमधल्या आणि जातीधर्माच्या स्थलांतरितांच्या एकत्रीकरणामुळे अमेरिकेची अशी खास आणि वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती निर्माण झाली आहे. येणारा
प्रत्येक स्थलांतरित या संस्कृतीच्या हंड्यातील उकळणार्या रसायनाला आपले
खास असे वैशिष्ट्य बहाल करत त्या रसायनात वितळून जात असतो. इनामगाव
येथील उत्खननावरून शास्त्रज्ञांनी काढलेला आणि वर उल्लेख केलेला निष्कर्ष
बघता मला असे कुतूहल वाटते आहे की इनामगावला असेच काहीसे झाले असेल का? सिंधू-सरस्वती
खोर्यांतून येणारी उत्तर भारतीय संस्कृती व या भागात आधीच स्थायिक
झालेल्या दक्षिण भारतीयांची संस्कृती या अशाच एकमेकात मिसळून गेल्या असतील
का? काही कालापूर्वी CSIR या भारतीय संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासात, दख्खनच्या पठारावर आणि दक्षिणेकडे स्थायिक झालेले लोकांनी मूलतः मलै द्वीपकल्पावरून तेथे स्थलांतर केले असावे असा अंदाज बांधलेला होता. हे लोक आणि सिंधू-सरस्वती संस्कृती मधून आलेले लोक हे इनामगाव सारख्या अनेक स्थानांवर एकत्र मिसळून गेले असतील, का त्यांनी आपापल्या संस्कृती अलग ठेवल्या असतील?
गेल्या हजार पंधराशे वर्षांमध्ये रचल्या गेलेल्या काही ग्रंथांचा आधार घेतला (महाभारत, कौटिल्य अर्थशास्त्र, मनुस्मृती), तर असे दिसते की वैदिक किंवा नंतर हिंदू धर्माचे पालन करत असलेला भारतीय समाज, सर्वव्यापी असणार्या एका ‘जातीव्यवस्था‘ किंवा चतुर्वर्ण या नावाने ओळखल्या जाणार्या सामाजिक बंधात संपूर्णपणे जखडून गेला होता व आहे. या जातीव्यवस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे रोटीबेटी व्यवहार, फक्त आपल्या जातीपुरता मर्यादित ठेवणे (endogamous) हे होते किंवा आहे. मग असे जर असले तर इनामगाव सारख्या स्थानावर या जात किंवा वर्ण व्यवस्थेचे पालन होत असेल? का उत्तर भारतीय आणि दख्खनच्या पठारावरील स्थायिक लोक यांच्यात रोटीबेटीचे व्यवाहार चालू होऊन एक नवा भारतीय समाज निर्माण झाला असेल?
या प्रश्नांची उत्तरे देणे कोणाला शक्य होईल असे मला तरी वाटले नव्हते, परंतु हैद्राबाद येथील CSIR-Centre for Cellular and Molecular Biology आणि Harvard Medical School या
दोन संशोधन संस्थांमध्ये कार्यरत असणार्या शास्त्रज्ञांच्या एका गटाने
एकत्रपणे किंवा सहकार्याने केलेल्या एका अभ्यास उपक्रमाच्या निष्कर्षांवरून
हे उत्तर देणे आता शक्य झाले आहे. प्रिया मूरजानी, कुमारसामी थांगराज, निक पॅटरसन, मार्क लिपसन, पो-रु-लोह, पेरियासामी गोविंदराज, बॉनी बेर्जर, डेव्हिड राइच आणि लालजी सिंह (
Priya Moorjani, Kumarasamy Thangaraj, Nick Patterson, Mark Lipson,
Po-Ru Loh, Periyasamy Govindaraj, Bonnie Berger, David Reich and Lalji
Singh) या शास्त्रज्ञांनी आपल्या अभ्यास उपक्रमाचे निष्कर्ष, ‘Genetic Evidence for Recent Population Mixture in India’ या नावाने लिहिलेल्या संशोधन प्रबंधात‘American Journal of Human Genetics.‘ या मासिकात प्रसिद्ध केले आहेत.
जनुकशास्त्राच्या आधाराने केलेल्या या अभ्यास उपक्रमाचा हा अहवाल हे स्पष्टपणे सांगतो:
“भारतात
आढळणारे बहुतेक जनुकीय गट हे दोन एकमेकापासून भिन्न असलेल्या मानवी
जनसमुदायांच्या मिश्रणातून निर्माण झालेल्या जनुकीय गटाचे वंशज असल्याचे
दिसते: मध्य एशिया, मध्यपूर्व, कॉकेशस पर्वत रहिवासी आणि युरोपियन यांच्या वंशमिश्रणातून आलेले “पूर्वज उत्तर भारतीय (ए एन आय)” आणि भारतीय उपखंडाबाहेरील कोणत्याही जनुक गटाशी साधर्म्य नसलेले “पूर्वज दक्षिण भारतीय (ए एस आय)” हे ते दोन भिन्न जनुकीय गट आहेत.”
“ Most
Indian groups descend from a mixture of two genetically divergent
populations: Ancestral North Indians (ANI) related to Central Asians,
Middle Easterners, Caucasians, and Europeans; and Ancestral South
Indians (ASI), not closely related to any groups outside the
subcontinent.”
या अभ्यास प्रकल्पावर कार्य करणार्यांना असे आढळून आले की त्यांनी रक्त चाचणी केलेल्या प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या जनुकीय भूतकालाचा सर्वात पूर्व संबंध, एकतर युरोप-एशिया
मधून आलेला पहिला गट किंवा मूळ आफ्रिकेतून आलेला दुसरा गट यांच्याशी
निर्विवादपणे जोडता येत असला तरी नंतर या दोन्ही गटांचे आपापसात रोटीबेटी
व्यवहार झाल्याने एकमेकाशी जनुकीय मिश्रण होऊन जो एक नवीन एकात्मक जनुकीय गट झाल्याचे लक्षात येते त्याच्याशी सुद्धा या सर्व भारतीय व्यक्तींचा स्पष्ट जनुकीय संबंध असल्याचे सिद्ध होते. मात्र गतकालातील एका अज्ञात क्षणापासून पुढे,याच भारतीय व्यक्तींचे जनुकगट, भाषा, धर्म आणि अदिवासी समाज गट यांच्यावर आधारित असे भिन्न भिन्न गट होत जाऊन आता त्यांचे 4635 भिन्न जनुकीय गट तयार झाले आहेत.

याचा
अर्थ असा होतो की इनामगाव सारख्या अनेक मानवी वस्तींमध्ये उत्तर भारतीय व
दक्षिण भारतीय यांच्यामध्ये वाढत गेलेल्या रोटीबेटी व्यवहारामुळे निर्माण
झालेले भारतीय एकवटणार्या हंड्यातील उकळते जनुकीय रसायन, गतकालातील या अज्ञात क्षणापासून पुढे एकदम गोठून गेले व भारतीय समाजाचे भाषा, धर्म,जात आणि अदिवासी संस्कृती यांच्यानुसार विभाजन होत राहिले. आता प्रश्न असा उभा राहतो की हा अज्ञात क्षण गतकालात कधी आला असेल? तो इनामगावमध्ये मानवी वस्ती होती त्या कालाच्या आधी आला की नंतर?
या प्रकल्पावर कार्य करणार्या शास्त्रज्ञांना या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर मिळू शकलेले आहे. ते म्हणतात की पूर्वज उत्तर भारतीय व पूर्वज दक्षिण भारतीय यांच्यातील जनुकीय मिश्रण हे सुमारे 4200 वर्षांपूर्वी (इ.स.पूर्व 2200) किंवा उत्तर हडप्पा संस्कृतीकालात सुरू झाले. या कालापासून पुढची 2100 वर्षे म्हणजे 1900 वर्षांपूर्वीपर्यंत (इ.स.पहिले शतक) हे जनुकीय मिश्रण अबाधितपणे चालू राहिले. या सामाजिक बदलाबद्दल हा अहवाल म्हणतो:
” हा 2100 वर्षांचा काल हा एक महत्त्वाचा संक्रमणकाल होता. या कालात सिंधू संस्कृतीतील नागरीकरण विलयास गेले. गंगा खोर्यातील जनसंख्या सतत वाढत राहिली आणि भारतीय-युरोपियन भाषागट आणि वैदिक धर्म हे उदयास आले.”
“It
was a time of profound change, characterised by the de-urbanisation of
the Indus civilisation, increasing population density in the Gangetic
system, and the likely appearance of Indo-European languages and Vedic
religion.”
या 2100 वर्षाच्या संक्रमण कालानंतर अकस्मातपणे ही जनुकीय मिश्रण प्रक्रिया संपूर्णपणे थांबली किंवा एकवटणारा हा हंडा गोठून गेला. या अहवालाप्रमाणे जनुकीय प्रक्रिया थांबण्याचा हा क्षण इ.स. पहिल्या शतकामध्ये आला.
ग्रीक इतिहासकार मेगॅस्थेनिसने साधारण इ.स.पूर्व 300 मधे
लिहिलेल्या आपल्या इंडिका या ग्रंथात भारतातील जाती किंवा वर्ण व्यवस्थेचा
उल्लेख केलेला आहे त्याचप्रमाणे यानंतरच्या कालात लिहिल्या गेलेल्या
कौटिल्याच्या अर्थशास्त्रात आणि लेखन काल अचूक रित्या ज्ञात नसलेल्या
महाभारतात सुद्धा चतुर्वर्ण व्यवस्थेचा उल्लेख आहे. हे सर्व ग्रंथ वर उल्लेख केलेल्या जनुकीय मिश्रण प्रक्रिया थांबण्याच्या कालाच्या 200 ते 300 वर्षे आधी लिहिले गेले असल्याने आपल्याला एक अत्यंत रोचक असा निष्कर्ष काढणे शक्य आहे. या निष्कर्षाप्रमाणे जरी चतुर्वर्ण व्यवस्थेला अधिकृतता इ.स.पूर्वी
काही शतके प्राप्त झालेली असली तरी सर्वसाधारण भारतीय समाज हा अजूनही
एकसंध होता व त्यांच्यात रोटीबेटीचे व्यवहार पुढे काही शतके तरी चालूच
राहिले होते. ( आपण असे मानतो की मनुस्मृती या ग्रंथात चतुर्वर्ण व्यवस्थेचे नियम प्रथम लिहिले गेले. या अहवालाप्रमाणे मनुस्मृती हा ग्रंथ ही जनुकीय मिश्रण प्रक्रिया थांबल्याच्या किंवा इ.स. पहिले शतक या कालानंतर लिहिला गेलेला आहे.)
जनुकशास्त्राचा कोणताही अभ्यासक आपल्याला सांगू शकेल की वर उल्लेख केलेला एकवटणारा जनुकीय हंडा गोठून जाणे ही बाब कोणत्याही समाजाच्या भविष्यकालाच्या दृष्टीने हितावह अशी बाब असू शकत नाही. या बाबतीत हा अहवाल म्हणतो:
” भारतातील सध्याच्या पिढीत जे अनुवंशिक आणि जनुकीय रोग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत त्यांचे वाढलेले प्रमाण मागच्या 1900 वर्षे सतत झालेल्या जाती अंतर्गत विवाहांमुळे (endogamous) असले पाहिजे.”
“An
important consequence of these results is that the high incidence of
genetic and population-specific diseases that is characteristic of
present-day India is likely to have increased only in the last few
thousand years when groups in India started following strict endogamous
marriage.”
इनामगावकडे आपण परत वळूया. इनामगाव येथील मानवी वस्ती ही भिन्न असलेल्या मानवी संस्कृतीचे एकत्रीकरण करणारा एक खराखुरा ‘वितळवणारा हंडा‘ होता आणि अशा शेकडो इनामगावांच्या आधारावर एकत्रीकरण झालेली नवीन आधुनिक भारतीय संस्कृती आणि लोक उदयास आले असे म्हणणे वावगे ठरू नये.
शेवटी आपल्याला माहीत असलेल्या ऐतिहासिक आणि पूर्व-ऐतिहासिक घटनांचा संबंध या अहवालाशी कसा लावता येतो ते आपण पाहूया.
इ.स.पूर्व 10000 वर्षांपासून वायव्येकडून भारतीय द्वीपकल्पात स्थलांतरितांचे आगमन सतत होत आलेले आहे. या स्थलांतरितांनी आपली संस्कृती सिंधू-सरस्वती खोर्यांत स्थापन केली. ही संस्कृती इ.स.पूर्व 2000 पर्यंत अबाधित राहिली. या लोकांचा दख्खनच्या पठारावर राहणार्या आणि मूलतः मलै द्वीपकल्प किंवा अंदमान-निकोबार बेटे येथून आलेल्या
लोकांशी फारसा काहीच संबंध न आल्याने त्यांच्यात रोटीबेटीचे व्यवहार झाले
नाहीत व त्यांची संस्कृती दख्खनच्या पठारावरील लोकांपेक्षा भिन्न राहिली. या
अहवालात ही गोष्ट स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे की पूर्वज उत्तर भारतीय व
पूर्वज दक्षिण भारतीय यांच्यामधील जनुकीय मिश्रण या कालापर्यंत झालेले
आढळून येत नाही.
सिंधू-सरस्वती खोर्यांतील जलस्त्रोत जसजसे आटू लागले तेंव्हा येथील रहिवाशांनी पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे स्थलांतर चालू केले. या कालात इनामगाव सारख्या अनेक वस्त्या निर्माण झाल्या असणार. इनामगाव मध्ये मालवा संस्कृती आणि पूर्व जोरवे संस्कृती या दोन्ही बर्याच मोठ्या कालखंडासाठी एकत्रपणे नांदत होत्या, हा पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी काढलेला निष्कर्ष या ठिकाणी म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. या
कालापासून हळूहळू या दोन संस्कृतींमध्ये रोटीबेटी व्यवहार सुरू होऊन एक
नवे जनुकीय भारतीय मिश्रण तयार झाले व हे मिश्रण इनामगावमधेच बौद्ध
कालापर्यंत (इ.स.पूर्व 600) अधिक अधिक दाट होत गेले.
या अहवालामुळे प्रकट झालेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाती वर्ण व्यवस्थेचे प्राबल्य हे इ.स.पहिल्या शतकानंतर भारतामध्ये रूढ झाले. हा शोध दोन कारणांसाठी विलक्षणच म्हणावा लागेल. प्रथम म्हणजे भारतात किंवा उत्तर-वायव्य भारतात तरी वैदिक संस्कृती, साधारणपणे सिंधू-सरस्वती संस्कृती विलयास गेल्यानंतरच, बहरात आली असली तरीही या अहवालाप्रमाणे त्या पुढची 2000 वर्षे तरी चतुर्वर्ण पद्धत भारतात मोठ्या प्रमाणात प्रचलित नव्हती. दुसरे कारण म्हणजे ज्या धर्माचे सर्व लोकांमधील समानता हे महत्त्वाचे सूत्र होते तो बौद्ध धर्म ऐन बहरात असताना,किंवा इ.स.पहिल्या शतकात,ही चतुर्वर्ण पद्धती संपूर्ण समाजात अतिशय कडक रित्या राबवली जाऊ लागली.
मला हा शोध अतिशय रोचक वाटतो आहे कारण अनेक लोकांची अशी समजूत नव्हे खात्रीच असते की 4000 वर्षे पूर्वी जेंव्हा वैदिक संस्कृती भारतात उदयास आली तेंव्हापासून चतुर्वर्ण पद्धत रूढ झालेली आहे. या अहवालाप्रमाणे ही गोष्ट सत्य नसून प्रत्यक्षात समानतेचा उपदेश करणारा बौद्ध धर्म जेंव्हा सर्वमान्य होता त्या वेळेपासून चतुर्वर्ण पद्धत समाजात रूढ झाली. सारांशाने असे म्हणता येईल की चतुर्वर्ण पद्धत फक्त मागच्या 1900 वर्षांपूर्वी रूढ झालेली आहे.
इनामगाव
येथील मानवी वस्ती आणि या सारख्या शेकडो अज्ञात जागा या भारताच्या जनुकीय
अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात कारण या अनेक
इनामगावांमध्येचएका 2000 वर्षांच्या कालखंडात,खरीखुरी भारतीय व्यक्ती व खरा भारतीय जनुकीय गट,जनुकीय मिश्रणाने निर्माण झाला. यानंतर जातीव्यवस्थेचा किंवा चार्तुवर्ण पद्धतीचा एक मोठाच अडसर या जनुकीय मिश्रणापुढे निर्माण झाला व हे जनुकीय मिश्रण आहे तेथेच गोठून गेले.
4 सप्टेंबर 2013
