भारताच्या
व मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने निर्णायक ठरलेल्या पानिपतच्या लढाईचा
एकूण खर्च किती आला असेल असे वाटते? आतापर्यंत, या लढाईत किती शूर वीर
मराठ्यांनी गमावले याची माहिती आपण इतिहासात नेहमीच वाचतो. परंतु ही एवढी
मोठी व दीर्घ काल चाललेली मोहिम करण्यासाठी पेशवे दरबारला एकूण किती खर्च
आला याचा निश्चित आकडा कोणासच माहीत नव्हता.
अहमद शाह अबदाली दिल्लीवर चालून येत आहे हे समजताच मार्च 19 1760 रोजी
सदाशिव राव भाऊ यांना दारूगोळा, सैन्य व आवश्यक तेवढे धन देऊन नानासाहेब
पेशवे यांनी दिल्लीचे संरक्षण करण्यासाठी पाठ्वले होते. 1 ऑगस्ट 1760 ला
मराठे दिल्लीला पोचले होते व दुसर्या दिवशी त्यांनी दिल्लीचा ताबा घेतला
होता. 14 ऑगस्ट रोजी त्यांनी लाल किल्ला ताब्यात घेतला होता.
अहमद शाह अबदाली आणि मराठी फौज यांच्यातील युद्ध 14 जानेवारी 1761 ला
पानिपत येथे लढले गेले होते व या लढाईमध्ये मराठ्यांचा दारूण पराभव झाला
होता. युद्धक्षेत्रावर मराठ्यांचा पराभव झाला असला तरी नंतरच्या काळात या
मोहिमेवर पेशवे दरबारचा खर्च चालूच होता. पेशवे दरबारच्या हिशोबनीसांनी या
युद्धावर झालेल्या खर्चाचा हिशोब अगदी बारीक तपशीलासह लिहून ठेवलेला आहे.
या खर्चामध्ये कोणत्या प्रकारचा दारूगोळा मराठ्यांनी वापरला होता? ऊंट,
हत्ती यावर किती खर्च झाला होता? याची नोंद आहे. मराठ्यांनी 18 कारखाने
युद्धक्षेत्रात उभे केले होते. या कारखान्यात लोहार, सुतार, मिस्त्री आणि
मजूर यांच्यावरचा खर्च, सैन्यासाठी गुप्त हेर, न्हावी,शिंपी आणि पहारेकरी
यांच्यावरचा खर्च, या सर्व खर्चांची नोंद या हिशोबनीसांनी ठेवलेली आहे.
पेशवे दरबारने या युद्धावर एकूण 92,23,242 रुपये आणि 9 आणे (बाण्णव लाख
तेवीस हजार दोनशे बेचाळीस रुपये व नऊ आणे) एवढा खर्च केला होता. या खर्चात 2
ऑगस्टला दिली ताब्यात घेतल्यावर पुढचे साडेतीन महिने शिबंदीवरील खर्च,
दिल्लीतील देवळे व मशिदी यांना दिलेल्या देणग्या, संत ,फकिर, मौलवी यांना
दिलेली बिदागी यावरील खर्च निराळा दाखवलेला आहे. हा खर्च 14,71,326 रुपये
(चवदा लाख एकात्तर हजार तीनशे सव्वीस रुपये) एवढा झाला होता.
1761 ते 2011 या कालातील रुपयाच्या किंमतीतील फरक लक्षात घेतला तर
आजच्या रुपयाच्या किंमतीनुसार मोहिमेचा एकूण खर्च 900 कोटी रुपये व
दिल्लीतील खर्च 150 कोटी रुपये येतो. पुण्यातील एक इतिहास संशोधक पांडुरंग
बलकवडे यांनी नुकतेच काही नवीन मोडी कागदपत्रांचे वाचन केले असता ही माहिती
उजेडात आली. हे पैसे मराठ्यांनी कसे उभे केले असतील याची कल्पना या
कागदपत्रांवरून येते असे श्री. बलकवडे यांचे मत आहे.
श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कालात मराठी सत्ता किती वैभवसंपन्न असली पाहिजे याची एक चुणूक या हिशोबामुळे उजेडात आली आहे.
17 डिसेंबर 2011
