Saturday, 29 November 2014

आजीचं बरोबरच असतं!


कोणत्याही तरुण पिढीला ज्येष्ठ पिढीतले लोक काय सांगतात ते कधीच पटत नाही. हे लोक प्रत्येक गोष्टीचा उगाच बाऊ करतात. त्याला काय होते? वगैरे वाक्ये नेहमीच तरुण पिढीच्या तोंडातून ऐकू येतात. तर शोभतं का असं वागणं. अगदी ताळ तंत्र सोडला आहे.” किंवा पडतील आता आजारी, असं वागल्यावर दुसरे काय होणार?” या सारखी वाक्ये ज्येष्ठ पिढीच्या तोंडात पेरलेलीच असतात. आणि या ज्येष्ठ व्यक्ती सासू-सासरे असल्या आणि समोरची तरुण व्यक्ती जर सून असली तर मग विचारायलाच नको. ठिणग्या पडायला वेळच लागत नाही.
सासू-सून, आई-मुलगी, बाप-मुलगा या नात्यांत निदान समोरची व्यक्ती काय म्हणते आहे? हे पटत नसले तरी ऐकून तरी घेतले जाते. पण हेच संभाषण जर आजी-नात किंवा आजोबा-नातू यांच्यात घडण्याची नुसती शक्यता जरी असली तर एकतर तरूण पिढी, काहीतरी सबब सांगून तिथून गायब तरी होईल किंवा ते जमलेच नाही तर समोरचा माणूस बडबडतो आहे. त्याला बडबडू देमला काय त्याचे? अशा वृत्तीने थंड डोक्याने सर्व बडबड ऐकून घेईल. दोन किंवा तीन पिढ्यांच्या विचारांमधील या फरकाला जनरेशन गॅप असे नाव आहे. प्रत्येक पिढीला ही जनरेशन गॅप आपल्यापेक्षा मोठ्यांच्यात आणि लहानांच्यात ही जाणवतेच.
मी लहान होतो तेंव्हा उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर निघालो की घरातले कोणीतरी टोपी घालण्याबद्दल सुचवल्याशिवाय रहातच नसत. टोपी घालून गेले तर बाकीची मुले, काय नाजुक नार आहे? म्हणून चिडवतील या भितीने मला टोपी घालून जायचे नसे. मग घरातून निघताना टोपी घालायची व नंतर काढून खिशात ठेवायची अशी युक्ती मी करत असे. माझा मुलाला मी अठरा वर्षे पूर्ण झालेली नाहीत म्हणून स्कूटर चालवू देत नसे. पण तो मित्राची स्कूटर नेहमीच चालवायचा हे त्याने मला नंतर एकदा सांगितले होते. आता नातवंडे आपले काहीही ऐकणार नाहीत हे माहिती असूनही मला त्यांना काहीतरी सल्ला दिल्याशिवाय राहता येत नाही. व तीही कोरड्या पाषाणासारखा माझा उपदेश ऐकून घेऊन आपल्याला काय पाहिजे तेच करतात.
किरकोळ आजार, समाजातील इतर लोकांशी कसे वागावे?, कोणते कपडे घालावे व कोणते घालू नयेत? हे नातवंडाना सांगणे आपले जन्म कर्तव्य आहे असे आज्यांना वाटत असते. आणि आपली आजी सांगते ते तद्दन जुनाट, बुरसटलेले आणि अनावश्यक आहे असे नातवंडांना वाटते. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन या विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर रिचर्ड निस्बेट व त्यांचे सहकारी यांनी या विषयाबद्दलचा एक अभ्यास करून त्याबद्दलचे आपले निष्कर्ष नुकतेच प्रसिद्ध केले आहेत.
या अभ्यासाच्या निष्कर्षांबद्दल बोलताना डॉक्टर निस्बेट म्हणतात की आज जुन्या पिढीतल्या लोकांना संगणकांबद्दलचे आणि इतर तांत्रिक ज्ञान, तरूण पिढीच्या मानाने कमी असते. त्यांना तरुण पिढीच्या मानाने कदाचित अनेक नवीन गोष्टी माहिती नसतात व अनेक नवीन उपकरणेही त्यांना वापरता येत नाहीत. परंतु त्यांना एक गोष्ट फारच जास्त चांगली समजते. दोन किंवा अधिक व्यक्तींमधे असलेले मतभेद कसे हाताळायचे हे या ज्येष्ठांना, तरुणांच्या मानाने फार जास्त चांगले उमजते. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. प्रत्येक व्यक्तीच्या व्हॅल्यूज भिन्न भिन्न असतात. ही सत्ये, ज्येष्ठ अनुभवाने चांगलीच जाणतात. आयुष्यात अनिश्चितता मोठ्या प्रमाणात असते आणि प्रत्येक गोष्ट कालानुसार बदलतच रहाते हे त्यांना पक्के ठाऊक असल्याने ते दुसर्‍याच्या भावना किंवा मते जास्त चांगल्या प्रकारे मान्य करू शकतात.

डॉक्टर निस्बेट यांच्या अभ्यासाप्रमाणे, ज्येष्ठ व्यक्ती खरोखरच जास्त शहाण्या असतात आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा हा शहाणपणा खूपच उपयुक्त ठरू शकतो. या अभ्यासावरून आणखी एक गोष्ट मिस्टर. निस्बेट यांना आढळून आली. वयानुसार आलेला हा शहाणपणा, भिन्न सामाजिक वर्ग, भिन्न सुशिक्षितता आणि भिन्न बुद्धीमत्ता असलेल्या ज्येष्ठांच्यात त्यांच्याच वर्गातील तरूणांच्यापेक्षा अधिक प्रमाणात नक्कीच आढळतो. तसेच कोणत्याही एका विशिष्ट शिक्षण पातळी पर्यंत शिक्षण घेतलेल्या ज्येष्ठांचा अभ्यास केला तर बौद्धिक क्षेत्रात कार्य करणारे ज्येष्ठ, इतरांच्या पेक्षा जास्त शहाणे असतात असे काही आढळले नाही.

आपल्या या अभ्यासानंतर, डॉक्टर निस्बेट तरुण वर्गाला एकच सल्ला देऊ इच्छितात. ते म्हणतात की तुमच्या आजी-आजोबांचे ऐका. आयुष्यातले संघर्ष कसे सोडवायचे व आयुष्यातील अनिश्चितता व बदल कसे हाताळायचे हे तुमच्या पेक्षा ते जास्त चांगले जाणतात.”
हे सगळे वाचल्यावर मला डॉक्टर निस्बेट यांच्याबद्दल जास्त माहिती मिळवण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांची स्वत:ची वेब साईट आहे त्याचा हा दुवा. त्यांच्या बद्दल विकी मधे एक पान आहे. त्याचा हा दुवा.
8 एप्रिल 2010