Sunday, 30 November 2014

गोत्यातली सासू!


रोज सकाळी वर्तमानपत्र वाचताना, “आज पुण्यातया सदराकडे मी एखादा तरी दृष्टीक्षेप नक्की टाकतो. या सदरामधे, पुण्यामधे त्या दिवशी काय कार्यक्रम आहेत याची माहिती असते. हे कार्यक्रम बहुतांशी विनामूल्य असतात व चांगलेही असतात. कार्यक्रमांना जरी गेले नाही तरी कुठे काय चालले आहे हे समजावून घेण्यातही एक प्रकारची गंमत असते. या सदरात वाचूनच काही काही सुरेख कार्यक्रमांना मला हजर राहता आले आहे. अशाच एका दिवशी, बाबा आमटे यांचे चिरंजीव प्रकाश व त्यांचा पत्नी साधनाताई यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाची माहिती मिळाली होती. त्या कार्यक्रमाला मी गेलो आणि या दोघांच्या कार्याची माहिती ऐकून अक्षरश: स्तिमित झालो. याच प्रकारे पुण्यात असलेल्या अनेक समाजसेवी संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना जाऊन त्यांच्या कार्याची माहिती मला घेता आलेली आहे. नवोदित कलाकारांच्या अशाच कार्यक्रमांना मी हजेरी लावली आहे. पुण्यातले वास्तव्य हे सांस्कृतिक दृष्टीने किती Rich व आनंददायी असते याची फक्त पुण्यात राहणार्‍यांनाच कल्पना करता येईल.
असे जरी असले तरी काही दिवशी अशा काही कार्यक्रमांची माहिती नजरेस पडते की हसावे की रडावे हेच कळेनासे होते. आज सकाळी माझे तसेच झाले. पुण्याच्या सहकारनगर भागातील कोण्या एका पुणे महिला मंडळनावाच्या संस्थेने, एक परिसंवाद आयोजित केलेले मी वाचले. या परिसंवादाचा विषय होता, ‘ नवजात बालकाच्या संगोपनाची जबाबदारी अहो आईवरसोपवणे योग्य की अयोग्य? ‘ परिसंवादाचा हा विषय वाचून मी उडालोच. क्षणभर माझा स्वत:च्या नजरेवरही विश्वास बसेना म्हणून मजकूर परत परत वाचून बघितला. पण मजकूर तोच होता. ज्या वाचकांना हा अहो आई प्रकार काय आहे हे माहिती नसेल (बहुदा 99.99% वाचकांना माहीत असणारच) त्यांच्या माहितीसाठी सांगतो, अहो आई म्हणजे सासू किंवा नवर्‍याची आई. खरे तर नवीन पिढीत मुले, आईला मम्मी किंवा मम्मा म्हणतात त्यामुळे या अगदी नवीन पिढीच्या भाषेत बोलायचे तर अहो मम्मा या व्यक्तीवर ही जबाबदारी टाकणे योग्य की अयोग्य अशी चर्चा या परिसंवादात होणार आहे.
काही दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीला भेटायला गेलो होतो माझ्या समोरच्या टीपॉयवर एका वर्तमानपत्राचे एक दोन कागद पडले होते. बाकी नजर फिरवता येईल असे त्या हॉलमधे दुसरे काहीच नसल्याने मी तेच दोन कागद उचलले. Pune Mirror या वर्तमानपत्राचे ते कागद होते. त्या कागदांवर काही जाहिराती व मागच्या बाजूस वधू-वर संशोधनासाठी, इच्छूक वधु-वरांच्या स्थळांची माहिती होती. त्यापैकी वर शोधत असलेल्या काही वधूंनी आपल्या अपेक्षा काळ्यावर पांढर्‍या केल्या होत्या. त्या अपेक्षांत एक प्रमुख अपेक्षा अशी दिसत होती की विवाह झाल्यावर त्या, आपल्या नवीन नवर्‍याच्या, आई-वडीलांशी कोणतेही संबंध ठेवण्यास तयार नव्हत्या. इतकेच नाही, तर आपल्या नवर्‍यानेही ते ठेवू नयेत अशीच त्यांची अपेक्षा होती. त्या वेळेस मला काही अचरट मुलींचा तो मूर्खपणा आहे असे वाटले होते. पण आज या परिसंवादाची बातमी वाचून, त्या वधु-वर संशोधनाच्या यादीतील मुलींच्या अपेक्षाच कालानुरूप असून माझ्या डोक्यातल्या संकल्पना व माहिती हीच कालबाह्य झालेली आहे ही एक नवीनच जाणीव मला झाली.
दोन महिन्यापूर्वी, माझ्या नात्यातील एका तरूणाचे व त्याच्या पत्नीचे पटत नसल्याने ते विभक्त होणार आहेत अशी बातमी माझ्या कानावर आली होती. या तरूणाचे दोन वर्षापूर्वीच लग्न झाले होते. तो व त्याची बायको हे एका कॉल सेंटर कंपनीत कामाला आहेत व तिथेच त्यांचे जुळले होते. मुलीच्या घरची परिस्थिती अगदीच सुमार व तिला वडीलांचे छत्रही नसल्याने, या तरूणाच्या आई-वडीलांनी, लग्नाचा सर्व खर्च, दाग-दागिने, कपडेलत्ते यांचा खर्च पूर्ण उचलला व लग्न लावून दिले. लग्न झाल्यावर आपल्या सुनेची आई एकटी कशी राहणार? म्हणून एक भाड्याचा एक फ्लॅट घेऊन त्यात आपला मुलगा, सून व तिची आई यांची राहण्याची व्यवस्था केली. फक्त दर रविवारी या नवपरिणित जोडप्याने, या तरूणाच्या आई-वडीलांच्या बरोबर एक दिवस घालवावा असे ठरले. ही सर्व व्यवस्था जेमतेम एक वर्ष चालली. सुट्टीच्या दिवशी सासूच्या घरी जावे लागत असल्याने, आपल्या वाट्याला नवरा येत नाही असे या नवीन सूनबाईंना वाटू लागले. या कुरबुरीचे रुपांतर हळूहळू भांडण तंट्यापर्यंत गेले व आता तर ते दोघे विभक्त होण्याच्या मार्गावर आहेत.
अलीकडे लग्न करून नंतर परदेशी स्थायिक झालेली मुले व त्यांचे आई-वडील भारतात, असेच चित्र बहुतेक पांढरपेशा समाजात दिसते. सुट्टीवर जेंव्हा ही मुले भारतात येतात तेंव्हा मुलगा आपल्या आई-वडीलांकडे व मुलगी आपल्या आई-वडीलांकडे अशी वाटणी सरळ विमानतळावरून येतानाच होते. मुले असल्यास ती अर्थातच आई बरोबर जातात. मग बापाच्या आई-वडीलांना जेंव्हा केंव्हा नातवंडांची ओझरती भेट होईल त्यावरच समाधान मानावे लागते.माझ्या ओळखीच्या एका तरूण मुलीने तिचे लग्न होऊन आता नऊ वर्षे उलटून गेली असली तरी अजून एकही रात्र तिच्या सासरी घालवलेली नाही. पूर्वीच्या काळी घरातली तरूण सून ही मानाचा व कौतुकाचा विषय असे. ही मुलगी म्हणजे दोन घरांना जोडणारा दुवा मानला जात असे. आता हा दुवाच जर निखळला असला तर ही दोन घरे जोडली कशी जाणार व त्यांना एकमेकाविषयी आपलेपणा तरी कसा वाटणार? त्यामुळेच आता या व्याहीसंबंधात फक्त औपचारिकताच उरत चालली आहे.
आपल्या सासू- सासर्‍यांबरोबर, नवीन पिढीतल्या सुनांची जर ओळखच होणार नसली तर त्या सासू-सासर्‍यांच्या मनाला या सगळ्या परिस्थितीमुळे किती क्लेश होत असतील याची जाणीव फक्त त्या भूमिकेत ती सून जेंव्हा जाईल तेंव्हाच तिला होऊ शकेल. आणि त्या परिस्थितीत ही नवीन सून जाईपर्यंत फारच उशीर झालेला असल्याने, आधुनिक सासू सासर्‍यांचे अव्यक्त दुख:ही काळाच्या पडद्याआडच गेलेले असणार आहे.
या नवीन सुनेची मुले, नवजात असोत किंवा थोड्या मोठ्या वयाची असोत! तिच्या नवर्‍याच्या आईचीही नातवंडेच आहेत. त्या सासूसाठीही ही नातवंडे दुधावरची सायच आहेत हे या सुनेच्या बहुदा लक्षातच येत नसावे. स्वत:ला पूर्ण अनोळखी असलेल्या एका बाईच्या हातात आपले नवसाचे बाळ कसे द्यायचे असे तिला बहुदा वाटत असावे.
मग असे परिसंवाद, अशा परिचर्चा घडवल्या गेल्या तर नवल ते काहीच नाही. सासूकडे बाळ सोपवण्यापेक्षा सरळ चार पैसे मोजावे व पाळणाघरात ठेवावे हेच स्वाभाविक आहे. शिवाय पैसे दिलेले असले आणि आबाळ झालेली दिसली तर जाब विचारता येतो. सासूला तो कसा विचारणार? त्यामुळे पाळणाघरच केंव्हाही श्रेयस्कर असेच नवीन सुनांना वाटते असे दिसते आहे. सासूला या सगळ्या प्रकरणात काय वाटते? किंवा तिच्या मनाला किती क्लेश होत असतील याचा विचार कशासाठी करायचा? बोलून चालून ती तर एक अनोळखी व्यक्ती आहे.
23 जून 2010