Sunday, 7 September 2014

आभाळाएवढे स्वप्न



आज एका सर्वसामान्य भारतीयाचे एक मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे. हा माणूस तुमच्या आमच्या सारखाच आहे. थोडासा शिकलेला, स्वकष्टाने पण स्वाभिमानाने जगणारा, परिस्थितीने गांजलेला पण तरीही आपली जिद्द न सोडणारा, रोज गर्दी, घाम आणि धूळ यांचा सामना करत, सार्वजनिक वाहनाने जाणारा किंवा सायकल वा कदाचित स्कूटीने कामाला जाणारा येणारा. हा कदाचित एखाद्या छोट्याश्या गावात रहाणारा चाकरमान्या असेल किंवा एखाद्या मोठ्या कारखान्यात काम करणारा कामगार असेल. तो शेतकरीही असू शकेल किंवा त्याचे एखादे छोटेसे दुकानही असेल. तुमच्या आमच्या सारखेच त्याचेही छोटेसे कुटुंब असेल आणि तोही आपल्या मुलांच्या भविष्याची स्वप्ने रोज बघत असेल.

तरीही तो निराळा आहे. त्याच्या मनात नक्कीच आभाळाएवढी स्वप्ने बघण्याची ताकद आहे. आपल्याला हे काय झेपणार? आपण असेच राहणार हे तत्वज्ञान त्याला कधीच पटलेले नाही. त्यामुळेच बहुदा, बॅंकेचे भले थोरले कर्ज त्याने आपल्या स्वप्नपूर्तीसाठी घेतले आहे. पुढच्या वर्ष, सव्वा वर्षात, तो आणि त्याच्यासारख्याच आणखी एक लाख स्वप्नात रमणार्‍या भारतीयांची, स्वत:च्या मालकीची मोटरगाडी असणार आहे. तो कामाला आपल्या स्वत:च्या गाडीतून जाऊ शकणार आहे. शनिवार रवीवार तो आपली पत्नी-मुलांना बाहेर घेउन जाऊ शकणार आहे. अडीअडचणीला डॉक्टरकडे किंवा खरेदीसाठी जाणे आता त्याला खूपच सोपे जाणार आहे. थोडक्यात त्याचे जीवनमान एका फटक्यात प्रचंड वर जाणार आहे. ते जीवनमान आता जगातल्या इतर प्रगत देशांतल्या, त्याच्यासारख्याच सर्वसामान्य माणसांच्या, तोडीचे होणार आहे.

टाटा उद्योगसमुहाचे प्रमुख श्री रतन टाटा आज आपल्या या पहिल्या ग्राहकाला त्याच्या नॅनोच्या किल्ल्या सुपुर्त करणार आहेत. या सर्वसामान्य माणसासाठी आणि टाटा उद्योगसमुहासाठी सुद्धा हा एक निर्णायक क्षण असणार आहे. कांही वर्षांपूर्वी रतन टाटा या माणसाने एक स्वप्न बघितले होते. सर्वसामान्य माणसासाठी चौचाकी बनवण्याचे आणि त्याचे जीवनमान उंचावण्याचे. पण स्वप्न बघणे आणि ते सत्यात आणणे यात जमीन अस्मानाचे अंतर असते. पण टाटांच्या पुण्यातल्या अभियंत्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि स्वप्न प्रत्यक्षात आणले. हे करताना त्यांनी वाहनांच्या इंजिनीयरिंगमधे काही क्रांतीकारक सुधारणा घडवून आणल्या. नवीन जागतिक पेटंट्ससाठी अनेक अर्ज केले, ‘बॉश’ सारख्या अनेक जगप्रसिद्ध कंपन्यांना आपल्या आराखड्याप्रमाणे उत्पादने तयार करून देण्यास त्यांनी भाग पाडले. आतापर्यंत अशी प्रथा होती की या कंपन्या त्यांनी इतरत्र केलेली डिझाइन्सच आपल्याला देत असत व भारतीय अभियंते ही उत्पादने वापरून स्वत:चे आराखडे बनवत. यात त्यांच्या डिझाइनवर साहजिकच खूप मर्यादा येत असत. टाटा अभियंत्यांनी हे सर्व आता बदलूनच टाकले आहे.

tata_nano_03


या एप्रिल महिन्यात, ग्राहकांना पहाता यावी म्हणून नॅनो प्रथम् शो रूम्समधे आली. मी ती गाडी बघायला मुद्दाम गेलो होतो. माझ्या दृष्टीने ती गाडी खूप लहान आहे, तिची अश्वशक्ती कमी आहे वगैरे टीकांना काही अर्थ नाही. सर्वात महत्वाची ही गोष्ट आहे की ती एक खरीखुरी गाडी आहे. ती खेळण्यातली गाडी नाही किंवा रिक्षाला दारे बसवून केलेले हास्यास्पद वाहन नाही. नॅनो एखाद्या आधुनिक, 2009 सालच्या कार मॉडेलसारखीच दिसते आणि प्रसिद्ध झालेल्या चांचण्यांप्रमाणे, चार मोठ्या लोकांना घेउन, व्यवस्थित धावते. अगदी खरे सांगायचे तर माझ्या डोळ्यात ती गाडी बघून पाणी आले. अनेक शतकांच्या वैचारिक पारतंत्र्यावर भारताने शेवटी मात केल्याचे ही गाडी म्हणजे एक चिन्ह आहे असे मला प्रामाणिकपणे वाटले.

nano-interior-photo-3


चौचाकी किंवा कार ही नुसते एक वाहन नसते. वैयक्तिक स्वातंत्र्याला (Individual Freedom) मिळालेली ती एक नवीन मिती किंवा डायमेन्शन असते. कुठेही, कोणत्याही हवामानात, कोणत्याही वेळी आणि कोणालाही बरोबर घेउन जाण्या येण्याचे ते स्वातंत्र्य असते. कारचे हे महत्व तीन लोकांनाच खरे म्हणजे ओळखता आले. पहिला अर्थातच हेनरी फोर्ड, ज्याच्या मॉडेल टी ने अमेरिकन लोकांना हे स्वातंत्र्य मिळवून दिले. दुसरा ऍडॉल्फ हिटलर, ज्याच्या फोक्सवागेन या गाडीने जर्मन लोकांना हे स्वातंत्र्य उपभोगता आले. माझ्या मताने तिसरी व्यक्ती म्हणजे श्री रतन टाटाच आहेत. सर्वसामान्य भारतीयांना हे स्वातंत्र्य मिळावे याचे स्वप्न पहाणारे व त्यासाठी आपल्या अभियंत्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून नॅनो तयार करून घेणार्‍या या व्यक्तीला आपण सर्वांनी पूर्ण क्रेडिट दिले पाहिजे.

दुर्दैवाने या स्वातंत्र्याचे महत्व कधीही न ओळखू शकणारे राज्यकर्ते आपल्याला लाभले होते. गाडी ही सुखविलासी लोकांचे चैनीचे साधन आहे अशीच या मंडळींची धारणा होती. या मंडळींनी देशाचे अपरिमित नुकसान केले आहे असे मला वाटते. आहे ती साधनसंपत्ती सगळ्यांना सारखी वाटून द्यावी म्हणजे सगळे सारखेच गरिब राहतील व कोणालाच काही करावे असे न वाटता फक्त शासनाच्या हातात सर्व सूत्रे राहतील अशी या आंबट तोंडाच्या लोकांची बहुदा विचारसरणी असावी. लोकांना उपभोग घेता येतील व परवडतील अशी उत्पादने निर्माण करून देशातील उपभोगता (Consumption) वाढवायची. त्या योगे उत्पादनाला चालना मिळते व लोकांना व्यवसाय मिळतो. हे चक्र सुरू झाले की देशाचे प्रतिडोई उत्पादन व आर्थिक परिस्थिती सुधारते हे अर्थशास्त्रातले साधे सूत्र या सतत अपचन झाल्यासारख्या चेहर्‍यांनी वावरणार्‍या लोकांनी कधी (मुद्दाम किंवा कुवतीच्या अभावी) समजावूनच घेतले नाही.

काही दिवसांपूर्वी एका पाश्चिमात्य मासिकात प्रसिद्ध झालेला ‘जगातील 10 दिशा दर्शक गाड्या’ हा लेख वाचनात आला. या 10 गाड्यांत नॅनोचा समावेश न करता एका तळटीपेत करण्यात आला होता. यावर एका वाचकाची(पाश्चिमात्य) प्रतिक्रिया मोठी बोलकी होती. “जर रिलेव्हन्स बघितला तर या यादीत नॅनोचे नाव प्रथम आले पाहिजे. बाकी सगळ्या गाड्या नंतर आल्या तरी चालतील.”

भले! नॅनोचा आकार छोटा असला तरी असूदे. भारतीय लोकांच्या मनात तिने स्वप्ने नक्कीच निर्माण केली आहेत. अगदी आभाळाएवढी स्वप्ने!

17 जुलै 2009