Sunday, 14 September 2014

नवी जन्मकुंडली

मध्यंतरी, सिंगापूरच्या एका मोठ्या हॉस्पितळात, माझ्या पाच सहा फेर्‍या झाल्या. पहिल्या फेरीच्या वेळी, तिथल्या रिसेप्शनिस्टने, माझा केस पेपर तयार करण्यासाठी, पहिली पृच्छा कसली केली असेल तर माझ्या ओळख क्रमांकाची(Identification Numbar). तो क्रमांक एकदा दिल्ल्यावर बाकी कामे सुरळीतपणे पार पडली. नंतरच्या सर्व फेर्‍यांमधे, तेवढा क्रमांक दिल्याबरोबर पुढे आणखी काही माहिती द्यावी लागतच नसे. सर्व माहिती संगणकाच्या पडद्यावर लगेच उपलब्ध होत असे. ओळख क्रमांकाची शक्ती केवढी सर्वव्यापी आहे याची एक चुणुकच मला त्या वेळी दिसली. नवीन बॅन्क खाते उघडायचे असो, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरायचे असो, अनोळखी माणसाकडून चेक द्यायचा किंवा घ्यायचा असो, नवा चष्मा करायचा असो किंवा सरकारी ऑफिसमधे काही काम असो, तुम्ही हा क्रमांक दिलात की तुमची ओळख पटवण्याची दुसरी काही गरजच उरत नसे.हा क्रमांक असला की अनेक कामे संगणकावर आंतरजालातर्फे करणे शक्य असते. पर्यायाने पायपीट व अनावश्यक प्रवास टाळता येतो.

भारतात पण असा एकामेवाद्वितीय ओळख क्रमांक, प्रत्येक नागरिकाला देण्याचा, एक मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प भारत सरकारने हातात घेतला आहे. या प्रकल्पाची माहिती जेंव्हा लोकांना कळली तेंव्हा बहुतेकांची प्रतिक्रिया “ आता आणखी एक क्रमांक लक्षात ठेवायला लागणार! वैतागच आहे!” या स्वरूपाचीच होती. सध्या भारतातील लोकांना अनेक क्रमांक व त्यांची कार्डे संग्रही ठेवावी लागतात. इलेक्शन ओळख पत्र, रेशन कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स कार्ड, म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा प्रॉपर्टी कार्ड क्रमांक आणि पासपोर्ट क्रमांक असे अनेक क्रमांक आपल्याला घ्यावे लागतात. आपली ओळख पटवण्यासाठी किमान दोन क्रमांक तरी द्यावे लागतात. एवढे करूनही एखाद्या माणसाची शंभर टक्के ओळख या क्रमांकांनी पटतेच अशी खात्री देता येत नाही. त्यामुळे फसवा फसवी करणार्‍या भंपक लोकांचे चांगलेच फावते.

या प्रकल्पाची सुरवात तर सरकारने चांगली केली आहे. इन्फोसिस सारख्या प्रथम श्रेणीच्या कंपनीचे मुख्य संचालक श्री. नंदन निलेकणी यांच्याकडे या प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी नुकतीच, हा एकामेवाद्वितीय ओळख क्रमांक कसा असेल व त्याची सर्वगामी शक्ती कशी असणार आहे याची माहिती दिली.
या ओळख क्रमांकाचे मुख्य वैशिष्ट हे रहाणार आहे की ज्या व्यक्तीला तो दिला जाईल त्या व्यक्तीच्या शरीरवैशिष्ट्यांशी(Biometric) तो पूर्णपणे जोडला गेलेला असल्याने त्याची पुनरावृत्ती अशक्य होईल. उदाहरणार्थ हाताच्या बोटाचा ठसा हे असे एक शरीरवैशिष्ट्य आहे. एकदा ओळख क्रमांक, बोटाच्या ठशाशी, संगणक व आंतरजालामार्फत जोडला गेला की ती व्यक्ती आणि ओळख क्रमांक हे एकमेकास पक्के जोडले जातील व कोठल्याही क्षणी व कोठेही, जिथे संगणक व आंतरजाल उपलब्ध आहे तिथे त्या व्यक्तीची ओळख बोटाच्या ठशामार्फत पक्की करता येईल. डोळ्याच्या बाहुलीचा रंग हे असेच दुसरे एक व्यक्तीवैशिष्ट्य आहे.

xinsrc_bd0ee6862a644d5b803d5d2b5b002aaf_fingerprint


हा क्रमांक असलेले नवे कार्ड घेऊन ते स्वत:च्या संग्रही ठेवण्याची कोणतीही गरज असणार नाही. आपल्या प्रत्येक प्रकारच्या कार्डवर किंवा दस्तऐवजावर हा क्रमांक मुद्रित केलेला असेल. त्यामुळे कोणतेही कार्ड किंवा दस्तऐवज धारकाची ओळख संपूर्णपणे संगणक व आंतरजालामार्फत पटवून घेता येईल.

fingerprinting


या प्रकल्पाचे मूळ तत्व इतके सोपे आहे. या प्रणालीतील बहुतेक घटक ( उदाहरणार्थ आंगठ्याचा ठसा इलेक्ट्रॉनिक्सच्या सहाय्याने घेण्याचे उपकरण) सध्या वापरात आहेत. अमेरिकेत प्रवेश करताना प्रत्येक प्रवाशाच्या हाताचा ठसा आता या पद्धतीने घेऊन साठवला जातो. श्री. निलेकणी व त्यांचे सहकारी यांची खरी कसोटी या संपूर्ण प्रणालीचे महाविशाल स्वरूप हीच आहे. भारतातील 100 कोटी लोकांच्या हाताचे ठसे संग्रहीत करेल व कधीही व कुठेही आवश्यकता भासल्यास ते ठसे संगणकाच्या पडद्यावर त्या व्यक्तीच्या इतर माहितीसकट प्रग़ट केले जातील अशी महाविशाल संगणक प्रणाली या साठी विकसित करावी लागणार आहे. ही प्रणाली विकसित करणे ही या प्रकल्पातील खरी कसोटी आहे.

काही टीकाकारांच्या मते या प्रणालीवर अपेक्षित असलेला अनेक अब्ज रुपयांच्या घरात जाणारा खर्च भारताला परवडणारा नाही. श्री. निलेकणी म्हणतात की दरवर्षी भारत सरकार हजारो कोटी रुपये गरिबांना मदत देण्यासाठी खर्च करते या खर्चापैकी जेमतेम 40 टक्के रक्कमच या गरिबांपर्यंत पोचते. बाकीची रक्कम मधेच गहाळ होते. एकामेवाद्वितीय ओळख क्रमांकमुळे ही मदत मधे गहाळ न होता त्या व्यक्तीलाच मिळेल याची खात्री करता येईल. या प्रणालीवर होणारा खर्च वायफळ जाणार नाही याची आशा करण्याचे हे प्रमुख कारण वाटते.

एक प्रकाराने, हा ओळख क्रमांक, आपल्या सर्वांची एक नवी जन्मकुंडलीच आहे. एखाद्या व्यक्तीचा, त्याच्या जन्मकाली असलेली आकाशातील तारे व ग्रहांची स्थाने, यांच्याशी बादरायणी संबंध लावण्याचा प्रयत्न करणार्‍या कुंडलीपेक्षा, त्या व्यक्तीच्या शरीरवैशिष्ट्यांशी संबंधित असलेली ही नवी कुंडली त्या व्यक्तीची संपूर्ण ओळख आपल्याला देणार आहे.


15 सप्टेंबर 2009