Friday, 5 September 2014

ही वाट दूर जाते!




या वर्षीच्या जानेवारीमधे, एक जरा निराळीच बातमी प्रसार माध्यमांनी दिली होती. अफगाणिस्तानचे राष्ट्रपति हमिद करझाई व त्या वेळचे भारताचे परराष्ट्रमंत्री प्रणब मुखर्जी यांनी अफगाणिस्तानमधल्या ‘निमरोज’ प्रांताची राजधानी ‘डेलाराम’ येथे संयुक्तरित्या एका रस्त्याचे उदघाटन केले होते. या रस्त्याबद्दल थोडी जास्त माहिती गोळा केल्यावर असे लक्षात आले की हा रस्ता म्हणजे भारताची आंर्तराष्ट्रीय राजकारणातली एक जबरदस्त व्ह्युहात्मक खेळी आहे. 218 किलोमीटर लांबीचा हा रस्ता, ‘निमरोज’ शहरापासून इराणच्या सरहदीवर असलेल्या ‘झरंज’ या शहरापर्यंत जातो. निमरोज हे शहर अफ्गाणिस्तान मधील महत्वाची सर्व शहरे म्हणजे हेरात,कंदाहार,काबुल व मझारे-ई-शरीफ यांना जोडणार्‍या गळाहार (Necklace) रस्त्यावरच, हेरात आणि कंदाहार यांच्या मध्ये असल्याने, सरहद्दीवरील झरंज शहर सर्व महत्वाच्या शहरांशी जोडले गेले आहे. झरंज गावाच्या शेजारून इराणमधील हिरमांड नदी वाहते. या नदीवरचा पूल व तिथून चबाहर या इराणमधील बंदरापर्यंतचा रस्ता इराणने बांधला आहे.

zaranj-delaram


हा रस्ता बांधणे हे भारतासाठी मोठे आव्हानच होते. बॉर्डर रोड्स ओर्गनायझेशनचे सुमारे 300 लोक व इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसचे 400 संरक्षक यांच्या अथक परिश्रमांनीच हा प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पाचे संचालक ब्रिगेडियर पी.के,सेहगल यांनी हा प्रकल्प पूर्ण करताना आलेल्या अडचणींची कल्पना एका मुलाखतीत दिली होती. सततची वाळूची वादळे व 55 डिग्री सेल्सस पर्यंत चढणारे तापमान यामुळे कामगारांना रोज 4 ते 5 तासच काम करणे शक्य होत असे. तसेच कामासाठी लागणारे पाणी आणि कामगार यांची खूप लांबच्या अंतरावरून कामाच्या ठिकाणी ने आण करावी लागे. या प्रकल्पासाठी लागणारे सर्व साधन साहित्ये पाकिस्तानच्या अपेक्षित नकारामुळे, इराण मधील बंदर अब्बास येथे समुद्र मार्गे नेऊन, बर्‍याच लांबच्या मार्गाने अफगाणिस्तानमधे न्यावी लागली. तालिबानच्या सतत कारवायांच्यामुळे सुरक्षा ही सुद्धा एक महत्वाचीच परिक्षा होती.

Afghanistan2


हा रस्ता एवढा का महत्वाचा आहे? अफगाणिस्तान हा लॅन्ड लॉक्ड देश असल्याने त्या देशाचा सर्व व्यापार दुसर्‍या कोणत्या तरी देशामधून चालतो. उत्तरेला अतिशय डोंगराळ भाग असल्याने बहुतांशी व्यापार सद्ध्या कराची-पेशावर-खैबर खिंड-काबुल असा चालतो. काहीतरी फालतू कारणे देऊन माल बंदरातच अडवून ठेवणे, पुरेशी सुरक्षा न दिल्याने मालाची वाटेतच चोरी होऊन तो पेशावरमधेच विकला जाणे, जीवनास अतिआवश्यक गोष्टींची टंचाई अफगाणिस्तानात निर्माण करणे वगैरे गोष्टी पाकिस्तान नेहमीच करत आलेला आहे. या रस्त्यामुळे, व्यापारासाठी, एक लांबीला कमी असलेला, पर्यायी मार्ग अफगाणिस्तानला प्राप्त झाला आहे.

135213


2003 मधे, भारत, इराण आणि अफगाणिस्तान यांच्यात एक करार झाला. या करारामुळे भारत व अफगाणिस्तान आणि भारत व मध्य एशिया यांच्यामधील व्यापारासाठी चबाहर बंदर कमी दरात उपलब्ध करून देण्यात आले. हा नवीन रस्ता इराणच्या मध्य एशियाबरोबरच्या व्यापारासाठीही खुला केला गेला. या कराराप्रमाणे अफगाणी निर्यातदाराना चबाहर बंदराच्या फी मधे 90% तर गोदामांच्या फीमधे 50% सूट देण्यात आली आणि अफगाणिस्तानच्या वाहतुकदारांना इराणमधल्या रस्त्यावर वाहतुक करण्यास पूर्ण हक्क देण्यात आले. पाकिस्तानने याचा परिणाम म्हणून कराची बंदराच्या फीमधे लगेच कपात केली आहे. चबाहार बंदराला भविष्यात येणारे महत्व लक्षात घेऊन भारताने बंदर व जोडरस्ते यांच्या विकासासाठी तंत्रज्ञान व भांडवल दोन्ही पुरवले आहे. चबाहर बंदराचा परिसर आता इराणने मुक्त व्यापारी विभाग म्हणून घोषित केला आहे. चबाहर बंदराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पाकिस्तान, चीनच्या मदतीने विकसित करत असलेल्या ग्वाडर बंदराचे ते एक जबरदस्त प्रतिस्पर्धी आहे. पाकिस्तानमधे हे लक्षात येऊ लागले आहे की चबाहरपुढे ग्वाडरचा, त्याच्या परिसरात असलेल्या बलूची विरोधाने, निभाव लागणे जरा कठिणच आहे.

भारताच्या दृष्टीने तर ही एक अतिशय महत्वाची घटना आहे. अफगाणिस्तान आणि मध्य एशिया बरोबरचा व्यापार आता पाकिस्तानच्या मर्जीवर अवलंबून न रहाता कितीही प्रमाणात वाढवणे शक्य आहे. हे सर्व शक्य झाले आहे एक तर भारत सरकारच्या ज्या कोणी शासकीय अधिकार्‍यांनी हा प्रकल्पाची संकल्पना केली ते व दुसरे म्हणजे हा रस्ता करणारे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनचे लोक व त्यांचे संरक्षण करणारे जवान. या सर्वांचे कौतुक करावे तेवढेच आहे. दुर्दैवाने बीआरओ’ चे सहा कामगार, एक वाहनचालक व इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांचे चार जवान या प्रकल्पासाठी शहीद झाले. त्यांचेही आपण स्मरण ठेवले पाहिजे.

9 जुलै 2009