
काही दशकांपूर्वी मराठीमध्ये ‘पाचके‘ किंवा डायजेस्ट या प्रकारच्या मासिक प्रकाशकांना बरीच लोकप्रियता लाभली होती. आता ही निघतात की नाही हे मला माहिती नाही. इंग्रजीमधील रीडर्स डायजेस्ट या प्रकाशनावर आधारित असलेल्या या पाचकांमध्ये, मूळ इंग्रजी प्रकाशनाप्रमाणेच काही सदरे असत. त्यापैकी “मुद्राराक्षसाचा विनोद” व “उपसंपादकाच्या डुलक्या” ही दोन सदरे मला अजूनही आठवतात. इतर मासिके व वृत्तपत्रे यांच्या छपाई मधील आणि संपादनातील चुकांमुळे निर्माण होणारे विनोद या दोन्ही सदरांत दिलेले असत.
एस. चांद आणि कंपनी यांना उत्तर हिंदुस्थानामधील एक मोठे पुस्तक प्रकाशक म्हणून मानले जाते. या कंपनीच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीप्रमाणे, पुस्तकांच्या व्यापारात गेली 70 वर्षे तरी ही कंपनी उत्तर भारतात अग्रस्थानी आहे. या शिवाय हे संकेतस्थळ स्वत:बद्दल आणखी बरेच काही सांगते. उदाहरणार्थ या संकेतस्थळाचे म्हणणे आहे की:
“एस. चांद या ग्रूपच्या ध्येयांप्रमाणे माहिती, ज्ञान व जनसामान्य यांना एकत्र आणणे हे या ग्रूपचे मध्यवर्ती कार्य आहे व हेच कार्य आता मनोशक्ती प्रबळ करण्याच्या स्वरूपात रुपांतरीत झाले आहे.” (“Bringing people and knowledge together” is core to the mission of S. Chand Group and this has translated into ‘Empowering Minds’.)
मला खरे तर त्यांना या वाक्यातून काय सांगायचे आहे ते कळलेच नाही पण संकेतस्थळावर दिले आहे म्हणून मी त्याचा येथे उल्लेख केला आहे व माझे भाषांतर कदाचित चुकीचे असेल म्हणून मूळ इंग्रजी मधूनही दिले आहे. या शिवाय या संकेतस्थळावर दिलेल्या आणखी काही गोष्टी मी येथे देतो आहे.
” भारतातील सुशिक्षित समाजाच्या 3 पिढ्यांचा एस. चांदच्या पुस्तकांशी संपर्क आलेला आहे. आज एस. चांद यांची ओळख कोणासही करून देण्याची गरज नसते. अगदी प्राथमिक पातळीच्या पुस्तकांपासून ते उच्च शिक्षणातील अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वाणिज्य, मूल शास्त्रे आणि इतर अनेक विषयांवरील पुस्तके प्रसिद्ध करण्याची त्यांची बांधिलकी व प्रयत्न यामुळे त्यांनी स्वत:चे अजोड असे भाग भांडवल (?) जुळवले आहे.
एस. चांद आणि कंपनी ही स्व-गृही प्रकाशनातील अडचणी एकत्रितपणे सोडवू शकणारी (?) भारतातील एकमेव प्रकाशन संस्था आहे. या कंपनीला एक भारतीय प्रकाशन संस्था म्हणून सर्वप्रथम प्रमाणपत्र ISO 9001:2008 या मानकाखाली मिळालेले असून देशभरातील 24 स्थानांवर असलेल्या वितरकांचे जाळे त्यांच्या प्रकाशनांचे वितरण करत असतात व यामुळे एस. चांदची पुस्तके सर्वांसाठी व सर्व ठिकाणी उपलब्ध असतात.
प्रकाशनांच्या निर्यातीच्या व्यवसायात एस. चांद आघाडीवर असून एस. चांद यांची पुस्तके दक्षिण एशिया, आग्नेय एशिया, मध्यपूर्व आणि आफ्रिका येथील 21 देशांमध्ये उपलब्ध आहेत.
गेली अनेक वर्षे देशभरच्या प्रकाशनाच्या व्यवसायात अग्रेसर असलेल्या एस. चांद यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.”
या कंपनीच्या संकेतस्थळावरील ही माहिती अशासाठी मी येथे मुद्दाम उद्धृत केली आहे कारण या कंपनीच्या व्यवसायाची एकूण व्याप्ती, स्वरूप आणि उलाढाल याची वाचकांना थोडीफार कल्पना यावी.
या प्रकाशकांनी शालेय पाठ्यपुस्तक म्हणून ” आरोग्याचा नवीन मार्ग” ( “New Healthway.”) या नावाचे, आरोग्य, वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छता या विषयांवरील एक नवीन पुस्तक 11 किंवा 12 वर्षांच्या बालकांसाठी म्हणून प्रसिद्ध केले आहे. मात्र या पुस्तकात उपसंपादकांबरोबरच संपादक, प्रकाशक यांना डुलक्याच काय तर काळ झोप तर लागली नाहीये ना? अशी शंका मनात उपस्थित व्हावी एवढ्या मोठ्या प्रमाणातील घोड्चुका जागोजाग करून ठेवल्या आहेत. या चुकांचे स्वरूप पाहता या पुस्तकाला कचर्याच्या टोपलीचा मार्ग दाखवणे हा एकच शहाणासुरता उपाय वाचकांसमोर उरला आहे असे मला तरी वाटते.

या घोडचुकांपैकी काहीं उदाहरणे बघूया.
” सामिष भोजन करणारे लोक, दुसर्यांना फसवणारे, खोटारडे, आपली वचने विसरणारे व लैंगिक गुन्हे करणारे असतात.”
” या विश्वाच्या निर्मात्याने अदम व ईव्ह यांना दिलेल्या मूळ अन्नपदार्थांत मांस या पदार्थाचा अंतर्भाव केला नव्हता ही गोष्ट, मांसभक्षण हे मानवाला आवश्यक अन्नापैकी नसते हे सिद्ध करण्यासाठी देता येणारे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. विश्वनिर्मात्याने अदम व ईव्ह यांना फळे, भाज्या आणि सुकवलेली फळे आहारासाठी दिली होती.”
वरील वाक्य हे “आपल्याला मांसावर आधारित अन्नपदार्थांची गरज आहे का?” असा मथळा असलेल्या एका प्रकरणातील आहे.
सामिष भोजन करणार्यांच्या “काही वृत्ती विशेष.” सांगताना हे पुस्तक म्हणते की “असे लोक इतरांना सह्जपणे फसवतात. खोटे बोलतात. आपली वचने विसरतात. ते अप्रामाणिक असून शिव्यागाळी करतात, चोर्या करतात, मार्यामार्या करतात, लैंगिक गुन्हे करतात व सहजपणे दंगाधोपा करतात.”
उत्तर धृवीय प्रदेशात राहणारे एस्किमो लोक (Eskimos (Inuit)) हे ” मुख्यत्वे करून मांसभक्षण करत असल्याने ते आळशी, अनुत्साही व अल्पायुषी असतात.”
” सुएझ कालव्याच्या बांधकामावरील अरब लोक हे गव्हाचे पदार्थ आणि खजूर यांचा आहार घेत असल्याने त्याच कामावर असलेल्या परंतु गो-मांस भक्षण करणार्या इंग्लिश लोकांपेक्षा कितीतरी वरचढ होते.”
हे सगळे विचार मोठे क्रांतिकारी आहेत नाही का? मुंबईच्या जाहिराती करणार्या निरनिराळ्या एजन्सी मधील, गोरेपणा किंवा साबण यांच्या जाहिराती लिहिणारी कॉपी रायटर मंडळी हा मजकूर वाचून नक्की शरमेने माना खाली घालतील असे मला वाटते. मला त्यातल्या त्यात, एस्किमो, खजूर खाणारे अरब व गो-मांस भक्षण करणारे इंग्लिश यांच्या बद्दलचे उद्गार तर फारच आवडले.
आपले नशीब बलवत्तर म्हणून फारशा कोणी शाळांनी हे पुस्तक पाठ्यपुस्तक म्हणून पुरस्कृतच केले नाही. एका शिक्षणतज्ञांच्या मताप्रमाणे तर या पुस्तकासारखी पुस्तके ही मुलांसाठी विषसमान आहेत असे म्हणता येईल. या पुस्तकातील घोडचुकांची सर्व जबाबदारी ही एस. चांद आणि कंपनी या प्रकाशकांवरच, त्यांनी असला चुकीचा मजकूर प्रसिद्ध करण्यास अनुमती दिली यावरून, आहे. हे उघड आहे की या कंपनीमध्ये काम करणार्या नोकरवर्गापैकी काही मंडळी बरीच निष्काळजी असली पाहिजेत. प्रकाशकांना या पुस्तकाच्या सर्व प्रति नष्ट करून पुन्हा असल्या मूर्ख चुका असलेला मजकूर आपल्या पुस्तकात छापला जाणार नाही याची काळजी घेणे, हे त्यांच्या संकेत स्थळावर ते मोठ्या फुशारकीने ज्या प्रतिमेचा दावा करत असतात त्या प्रतिमेला तडा जाऊ नये म्हणून तरी घेणे आवश्यक आहे.
1 जानेवारी 2013