
गंगा नदी व तिच्या उपनद्या या मिळून जगातील सर्वात मोठ्या नद्यापैकी एक नदी प्रवाह तयार होतो. उत्तराखंड या राज्यातील पश्चिम हिमालय पर्वतराजीमध्ये उगम पावत असलेली ही नदी प्रथम दक्षिणेकडे व नंतर उत्तर हिंदुस्थानातील गंगेच्या खोर्यातून 2525 किमी प्रवास पूर्वेकडे करून, ही नदी बांगलादेशात प्रवेश करते व पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. भारतातील नद्यांत ही नदी सर्वात मोठी आहेच पण नदीतून वहाणारे एकूण पाणी लक्षात घेतले तर ही नदी जगातील दुसर्या क्रमांकाची नदी ठरते. गंगेचे खोरे हे जगातील सर्वात जास्त लोक रहात असलेले नदी खोरे आहे. आहे.या खोर्यत 40 कोटीपेक्षा जास्त लोक रहात असल्याने या खोर्यातील प्रत्येक चौरस किमी क्षेत्रफळात 390 लोक राहतात असे म्हणता येते.

हिंदू धर्मीय गंगेला दैवी माता या स्वरूपात बघतात. ही माता भक्ताची आत्मशुद्धी करून त्याला जीवनाविषयी नवीन आशा प्राप्त करून देते असे समजले जाते. मृत्यूसमयी गंगाजलाचे 4 थेंब ओठावर घातले की त्या व्यक्तीकडून त्याच्या आयुष्यात त्याने केलेल्या पापांपासून मुक्तता होते असा समज आहे. परंतु आत्यंतिक शुद्धतेचे प्रतीक समजली जाणारी ही नदी प्रत्यक्षात मात्र मृत होण्याच्या मार्गावर आहे. आपल्याला कल्पना करता येणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा व घाण या नदीमध्ये वहात येत असल्याने व पाण्यात विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण अत्यंत अल्प झाल्याने या नदीच्या अस्तित्वालाच आता धोका निर्माण झाला आहे.

गंगा नदीमध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात प्रदुषणाचे प्रभाव दिसू लागण्यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत. यात कारखान्यांनी त्याज्य म्हणून बाहेर टाकून दिलेली विषारी रसायने, शेतीमध्ये वापरली जाणारे खते व कीटकनाशके विरघळलेले पाणी, मोठ्या प्रमाणातील त्याज्य अशा घन पदार्थांचा नदीमध्ये केलेला निचरा, खेडी व शहरे यातून निचरा झालेले सांडपाणी, मृत जनावरांचे नदीत फेकून दिलेले देह आणि शेकडो अर्धवट दहन झालेले मानवी देह या सर्वांचा तर समावेश आहेच परंतु याशिवाय गंगा नदीच्या किनार्यावरील भागात वास्तव्य करणार्या लाखो स्त्री पुरुषांकडून निर्मित मलमूत्राचा निचरा सुद्धा या नदीतच केला जातो. गंगेच्या खोर्यात रहाणार्या बहुसंख्य लोकांसाठी स्वच्छता गृहे उपलब्धच नसल्याने नसल्याने हे लोक आपल्या दैनिक विधींसाठी नदी किनार्याचाच वापर करत असतात. या सतत वाहणार्या मलमूत्रामुळे गंगा नदीचे पाणी दूषित होते व त्यामुळे रोगराईचा प्रसार होण्यास फारसा वेळ लागत नाही. 2011 सालच्या जनगणनेनुसार भारतातील 13 कोटींहून अधिक घरांमध्ये स्वच्छतागृहे बांधलेलीच नाहीत. यापैकी फक्त 80 लाख घरांतील रहिवासी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करत असतात उरलेले सर्व 12 कोटी 20 लाख लोक उघड्यावरच शौचविधी करत असतात. या आकड्यांवरून या प्रश्नाचे गांभीर्य वाचकांच्या लक्षात येऊ शकेल.
या गंभीर समस्येवर एक उपाय, संरक्षण मंत्रालयासाठी कार्य करणार्या भारतीय शास्त्रज्ञांच्या एका संशोधनामुळे उपलब्ध झाला आहे. भारताच्या उत्तरेस असलेल्या लडाख भागात 6300 मीटर ( 20800 फूट) उंचीवर असलेला सियाचीन नावाचा एक हिमनद वाहतो. या हिमनदावर हिवाळ्यात -50 अंश सेल्सस ( -58 अंश फॅरनहाइट) अढे न्यूनतम तपमान असते. या ठिकाणी वर्षभर भारतीय सैनिक तैनात केलेले असतात. या ठिकाणी कोणतीही ड्रेनेज व्यवस्था शक्य नसल्याने, भारतीय सैन्यदलाने या संशोधकांना 100% देखभाल करावी न लागणारी, परवडणारी किंमत असणारी व पर्यावरण पूरक असलेली अशी स्वच्छता गृहे निर्माण करण्यास सांगितले होते. सैन्याच्या या गरजेसाठी संरक्षण विभागातील शास्त्रज्ञांनी नवी पर्यावरणास पूरक असलेली ई-स्वच्छता गृहे निर्माण करण्यात यश मिळवले आहे. बायो डायजेस्टर या नावाने ओळखल्या जाणार्या व स्वत:ची संख्या द्विगुणित करू शकणार्या बॅक्टेरियांचा वापर या स्वच्छता गृहात केलेला आहे. मानवी विष्ठेबरोबर हे बॅक्टेरिया एका विशेष पद्धतीच्या मोठ्या टाकीत मिसळले जातात. या शास्त्रज्ञांनी या स्वच्छता गृहांचे ‘बायो डायजेस्टर स्वच्छतागृहे‘ असे नामकरण केले आहे.
बायो डायजेस्टर तंत्रज्ञान मानवी विष्ठेचे रूपांतर बायोगॅस आणि गंधविरहित काम्पोस्ट खतामध्ये रूपांतर करते. या तंत्रज्ञानात मानवी विष्ठा खाद्य म्हणून वापरणार्या बॅक्टेरियांना बायो डायजेस्टर टाक्यांमध्ये सोडले जाते. पुढच्या प्रक्रियेत मिथेन वायूची निर्मिती होते. बायो डायगेस्टर टाक्यांमध्ये हा वायू वातावरणात सोडला जाणार नाही याची काळजी घेतली जाते व या वायूचे गंधविरहित बायोगॅस मध्ये रूपांतर केले जाते. नंतर हा गॅस, स्वैपाक, प्रकाश योजना, हवामान उबदार करणे किंवा सेंद्रिय खत निर्मिती या सारख्या विविध उपयोगांमध्ये वापरता येतो.
भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाची, गंगेच्या खोर्यात हे निर्धोक व आरोग्यास हितकारक असे तंत्रज्ञान वापरून बनवलेली आणि एका जागेहून दुसरीकडे हलवता येण्याजोगी ही बायो डायजेस्टर किंवा हरित स्वच्छता गृहे बसवण्याची कल्पना आहे व यासाठी त्यांनी संरक्षण मंत्रालयाबरोबर अशी 1 लाख स्वच्छता गृहे पुढच्या काही वर्षात गंगा खोर्यात बसवण्यासाठी करार केला आहे. यापैकी सुमारे 5000 स्वच्छता गृहे 2500 किमी लांबीच्या गंगा खोर्यातील खेडेगांवात बसवण्याचा मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प या मंत्रालयाने हातात घेतला आहे. हा कार्यक्रम जर यशस्वी रित्या पार पाडण्यात आला तर गंगा मातेच्या प्रवाहावरचे हे मानवी विष्ठेचे व त्या बरोबर वहात येणारी इतर घाण व कचरा यांचे ओझे दूर करण्याच्या दिशेने टाकलेले ते एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. या शिवाय अशी स्वच्छता गृहे, हरिद्वार, गंगोत्री, जम्नोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ या सारख्या बहुतेक ठिकाणच्या धार्मिक स्थळांजवळ सुद्धा बसवण्याचा या मंत्रालयाचा विचार आहे. ज्या ठिकाणी लाखो किंवा कोट्यावधी भाविक जमा होतात अशा कुंभमेळ्या सारख्या धार्मिक स्थानांवरही ही स्वच्छता गृहे बसवली जाणार आहेत.
भारतातल्या काही जागांवर अजूनही मैला वाहतुक काही व्यक्तींकडून केली जाण्याची अत्यंत घृणास्पद अशी पद्धत अस्तित्वात आहे. अशी सुमारे 15 लाख शौचगृहे अजूनही अस्तित्वात आहेत. या नवीन हरित स्वच्छतागृहांचा वापर या जागी केल्यास ही अनिष्ट प्रथा संपुष्टात आणणे शक्य होणार आहे. या पद्धतीचा वापर केल्यास शहरांच्यामध्ये ज्या प्रकारे मानवी स्पर्श न होता मैला वाहून नेला जातो त्याच प्रकारे खेडेगावांमधील स्वच्छता गृहांत सुद्धा मानवी वाहतुक न केली जाता अत्यंत सुरक्षित व आरोग्यदायी पद्धतीने मैल्यावर प्रक्रिया करून त्यातून बायो गॅस व खते निर्माण करणे शक्य होणार आहे.
गंगा किनारी एक नवी आरोग्य क्रांती घडून येण्याची शक्यता आहे. ती यशस्वी झाली तर गंगेचा प्रवाह परत एकदा स्वच्छ आणि पवित्र होण्यास नदत होऊ शकेल.
2 मार्च 2013