20 डिसेंबर 2011 च्या संध्याकाळी एका निराळ्या पण थोड्याशा रम्य अशा
अनुभवाला सामोरे जावे लागले. गतकालामध्ये प्रवास करून यावा असेही थोडे
वाटले खरे! माझ्या घराजवळच भारत सरकार चालवत असलेली ‘फिल्म ऍन्ड टेलेव्हिजन
इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ ही संस्था आहे. या संस्थेशी तसा माझा जवळचा संबंध
एके काळी होता. मी या संस्थेच्या ध्वनी अभियांत्रिकी विभागात हंगामी
प्राध्यापक म्हणून 2 किंवा 3 वर्षे इलेक्ट्रॉनिक्स हा विषय, या विषयाच्या
पदविका विद्यार्थ्यांना शिकवत असे. त्यामुळे या संस्थेचे आवार तसे मला नवीन
होते असे नाही. तरीही आलेल्या एका निमंत्रणामुळे या संस्थेत जाण्याचा योग
आला व थोडा गतकालात शिरलो. फिल्म इन्स्टिट्यूटचे हे आवार म्हणजे 1955
सालापर्यंत पुण्याचे एक भूषण मानणार्या प्रभात फिल्म कंपनीच्या स्टुडियोचे
आवार होते. इतकी वर्षे ही सरकारी संस्था येथे आहे पण या संस्थेच्या
पदाधिकार्यांचे कौतुकच केले पाहिजे की या आवाराला असलेला प्रभात लूक
त्यांनी एक वारसा म्हणून जपला आहे. या आवाराच्या मध्यभागी असलेल्या मुख्य
रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या इमारती, जशाच्या तशा जपल्या गेल्या आहेत.
फिल्म इन्स्टिट्यूटमधे शिरले की साठ सत्तर वर्षाचा काल मागेच पडल्यासारखा
वाटतो. मी लहान असताना प्रभातचे हे आवार व माझे घर यामध्ये फक्त एक माळरान
होते. त्यामुळे आमच्या घराच्या गच्चीमधून आऊटडोअर शूटींग चालू असले तर दिसत
असे. कोणी प्रसिद्ध व्यक्ती स्टुडिओमध्ये चित्रीकरण करत असली तरी ते
बघायला जाण्याची संधी मिळत असे. आचार्य अत्र्यांना एका चित्रपटाचे शूटींग
करताना मी येथे बघितले होते.
प्रभात फिल्म कंपनीच्या आद्य संचालकांपैकी एक असलेले विष्णूपंत दामले,
यांना मी कधी बघितल्याचे काही मला आठवत नाही. पण त्यांच्या कुटुंबियांशी
मात्र माझा बराच जवळचा संबंध होता. माझ्या एक आत्याबाई या दामले
कुटुंबाच्या घरात भाड्याने बरीच वर्षे रहात असत. त्यामुळे दामल्यांच्या
घरात माझे बरेच जाणे येणे असे. विष्णूपंत दामल्यांचे धाकटे चिरंजीव माझे
मित्र होते व अजून आहेत, तर सर्वात मोठ्या चिरंजीवांशी, रोटरी किंवा इतर
काही संस्था यांच्यामुळे बराच घनिष्ठ संबंध आला. या सगळ्या कारणांमुळे,
दामले कुटुंबीयांबद्दल माझ्या मनात जिव्हाळा आहे व त्यामुळे या
कुटुंबियांनी विष्णूपंत दामल्यांवर एक डॉक्यूमेंटरी चित्रपट बनवला असून
त्याच्या पहिल्या शो ला येण्याचे निमंत्रण मला पाठवल्यावर मी नाही म्हणणे
शक्यच नव्हते व म्हणूनच मी फिल्म इन्स्टिट्यूटमधे गेलो होतो.
1 तासभर चालणार्या या डॉक्युमेंटरी चित्रपटाचा विषय आहे विष्णुपंत
दामले व प्रभात फिल्म कंपनी! पण तो चित्रपट बघताना मला तर परत एकदा प्रभात
समयच उगवल्यासारखे वाटत राहिले. रायगड जिल्ह्यातल्या पेण सारख्या आडगावी
जन्माला आलेल्या विष्णुपंतांनी किती जिद्दीने व परिश्रमाने चित्रपट
बनवण्याचे सर्व तंत्र शिकून घेतले व 11 एकरांच्या प्लॉटवर प्रभात फिल्म
नगरी कशी उभारली याचा प्रवास मोठा हृदयंगम वाटला. त्यांच्याजवळ जे संचालकीय
कौशल्य होते त्यामुळेच ही संस्था त्यांना भरभराटीस आणला आली. वयाच्या
पन्नाशीत झालेल्या त्यांच्या अकाली मृत्यूमुळे प्रभात कंपनीचे तर भरून न
येणारे नुकसान झालेच पण त्या बरोबर पुण्याचे आणि महाराष्ट्राचेही नुकसान
झाले.
हा सर्व इतिहास या डॉक्युमेंटरी चित्रपटात मोठ्या सुंदरतेने चित्रित
केला आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात हा चित्रपट सहजतेने आपल्याला
फिरवून आणतो आहे.
विष्णूपंत दामल्यांच्या तिसर्या पिढीने हा चित्रपट निर्माण करून
महाराष्ट्रातील चित्रपट उद्योगाच्या भरभराटीच्या कालाचे एक चित्रण स्थायी
स्वरूपात करून ठेवले आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच
आहेत.
मला मात्र कालच्या संध्यासमयी अनुभवता आलेला हा प्रभात समय मोठा अविस्मरणीय वाटला हे खरे!
21 डिसेंबर 2011


