Thursday, 18 December 2014

चक्र 2.0 (Chakra 2.0)


1988 या वर्षी रशिया कडून भारताने ‘ चार्ली- 1′ या प्रकारची एक आण्विक पाणबुडी भाड्याने घेतली होती. ‘चक्र’ असे नामाभिधान केलेली ही पाणबुडी 1991 सालापर्यंत भारतीय नौदलात होती. या काळात भारतीय नौदलाचे अधिकारी व सैनिक यांना आण्विक पाणबुडी चालवण्याचा उत्तम अनुभव मिळाला होता. परंतु 1991 सालानंतर भारतीय नौदलात कोणतीच आण्विक पाणबुडी न आल्याने या पाणबुडीवर मिळवलेल्या अनुभवाचा पुढे काहीच उपयोग झाला नाही. या पाणबुडीवर तैनात अधिकारी व सैनिक नंतर निवृत्तही होऊन गेले. त्यामुळे हा सगळा उद्योग कशासाठी करण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर कोणाजवळ असेल असे वाटत नाही.
आता परत एकदा हाच सगळा प्रयोग परत एकदा करण्याचे भारतीय नौदलाने ठरवलेले दिसते. आता. ‘अकुला 2′ या प्रकारची एक नवीन पाणबुडी 10 वर्षाच्या भाडे कराराने रशिया कडून भारतीय नौदल घेणार आहे. या पाणबुडीचे रशियन नाव ‘K-152 NERPA’ असे असले तरी भारतीय नौदल या पाणबुडीला ‘चक्र’ हेच नाव देणार आहे.
ही पाणबुडी तशी बांधणी चालू असल्यापासूनच प्रकाशात आहे. 2004 सालीच भारताने या पाणबुडी साठी रशियाला 650 मिलियन अमेरिकन डॉलर्स दिले होते. परंतु या पाणबुडीच्या बांधणीत बर्‍याच अडचणी आल्या व या प्रकल्पाला विलंब होत गेला. नोव्हेंबर 2008 मध्ये या पाणबुडीमध्ये विषारी वायूची गळती झाल्याने 20 रशियन नौसैनिक मृत्यूमुखी पडले होते. आता ही पाणबुडी सैनिकी कार्यासाठी योग्य झाली असल्याचे रशियाचे म्हणणे आहे व ही पाणबुडी चालवण्याचे शिक्षण 50 भारतीय नौदल सैनिकांना देण्यात आलेले आहे. डिसेंबर 2012 मध्ये या पाणबुडीचे हस्तांतरण भारताकडे केले जाईल असे दिसते आहे. या पाणबुडीवर टॉर्पेडोज व 300 क़िमी परत मारा करण्याची क्षमता असलेली ‘क्लब-एस’ ही क्रूझ क्षेपणास्त्रे बसवलेली असती तरी आंतर्राष्ट्रीय निर्बंधांमुळे आण्विक क्षेपणास्त्रे भारताला या पाणबुडीवर बसवता येणार नाहीतच. म्हणजेच भारताला त्याची ‘आण्विक त्रिमिती क्षमता’ ( जमीन, हवा व पाणी या तिन्ही ठिकाणाहून आण्विक हल्ल्याची क्षमता) या पाणबुडीद्वारे अंमलात आणता येणार नाहीच.
नौदलाची अशी कल्पना दिसते आहे की ‘अरिहन्त’ ही भारतीय बनावटीची आण्विक पाणबुडी सैनिकी कार्यासाठी सज्ज होईपर्यंत या ‘चक्र’ पाणबुडीवर सैनिकी अनुभव प्राप्त करावा.
कागदावर ही कल्पना ठीक दिसत असली तरी मागे प्राप्त केलेला अनुभव जसा वाया गेला तसे या वेळी नक्की होणार नाही असे कोणीही सांगू शकणार नाही. भारतात बनवलेल्या शस्त्रास्त्रांची उपयुक्तता सैन्याला न होता ती शस्त्रास्त्रे पांढरे हत्ती बनून राहतात असा अनुभव आहे. भारतीय बनावटीचा अर्जुन रणगाडा, किंवा तेजस हे लढाऊ विमान जसे वर्षानुवर्षे तयारच होते आहे व ते प्रत्यक्ष सैनिकी कामगिरीसाठी उपयुक्त नाहीत, तसेच ‘अरिहन्त’चे कशावरून होणार नाही? या प्रश्नाचे कोणाजवळही उत्तर नाही. दुर्दैवाने असे झाले तर चक्र 1.0 प्रमाणेच चक्र 2.0 होईल अशी भिती वाटते.
16 डिसेंबर